नांदेडसह हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांतल्या २०५ आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना सिनेअभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नांदेडमध्ये आर्थिक मदतीचे वाटप केले.
नांदेड- नांदेडसह हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांतल्या २०५ आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना सिनेअभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नांदेडमध्ये आर्थिक मदतीचे वाटप केले. या शेतक-यांशी संवाद साधताना, शेतक-यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, असे आवाहन नाना पाटेकर यांनी सरकारला केले आहे.
दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी सध्या आत्महत्येच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची दयनीय अवस्था आहे. त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि सोबतच आर्थिक मदतीसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे रविवारी नांदेडमध्ये आले होते. या वेळी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांनी आपल्या भावना या दोघांजवळ व्यक्त केल्या.
दुष्काळावर आत्महत्या हा पर्याय नाही. तुम्हा तसे करू नका. यावर उपाय म्हणजे प्रत्येक पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. त्यातूनच शेतकरी सधन होईल, असे मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. आपण इतर वस्तूंची एमआरपी मोजतो, मग शेतीमालाला हमीभाव का नको, भाजी आणि फळांचे भाव वाढल्यास आपण तक्रार का करतो, असा युक्तिवादही नानांनी केला.
सध्या दुष्काळाचे संकट सर्वच शेतक-यांसमोर आहे. शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलणे सोपे आहे, प्रत्यक्षात काम करणे अवघड आहे. पण शेतक-यांच्या समस्या जाणून घेऊन समाज म्हणून आपण त्यांचे काही देणे लागतो. त्यामुळे आपणच शेतक-यांना आधार द्यायचे काम केले पाहिजे. आपण करत असलेले काम ही माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ आहे, असे मकरंद अनासपुरे म्हणाले.
नाना आणि मकरंदसमोर भूमिहिनाचा आक्रोश
औरंगाबाद- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावलेल्या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासमोरच दुष्काळग्रस्तांनी अक्षरश: हंबरडा फोडला.
दु:ख अनावर झाल्यावर जेव्हा व्यथाही बोलू लागतात तेव्हा काय होते, याचा प्रत्यय औरंगाबादकरांना यानिमित्ताने आला. शेतक-यांना मदतीचा हात दिला जात आहे,
मात्र भूमिहीनांचे काय? अशी व्यथा एका भूमिहीन व्यक्तीने नानासमोर मांडली. त्यांचे दु:ख पाहून काही काळ नानाही निरुत्तर झाला. दुष्काळग्रस्त शेतक-याला किमान मदतीचा हात तर मिळणार आहे, मात्र ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत, त्यांनी कुणाकडे पाहायचे, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला.