सातारा – साता-याचा गिर्यारोहक आशीष माने याने जगातील आठवे सर्वोच्च शिखर सर केले आहे. ८ हजार १६३ मीटर उंच माऊंट मनास्लू हे शिखर आशीषने मंगळवारी पहाटे चार वाजता सर केले. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आठ हजार मीटर्सपेक्षा जास्त उंच असणा-या चौदा शिखरांपैकी चार किंवा जास्त शिखरांवर यशस्वी चढाई करणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाने ही चढाई पार केल्याने सर्वत्र आश्चर्य आणि कौतुक केले जात आहे. ही बाब जेव्हा साता-यातील गियारोहकांना समजली तेव्हा अनेकांनी त्याच्या वडिलांचे घरी जाऊन अभिनंदन केले.
ही चढाई सुरु असताना ब्रिटनहून आलेल्या एका टीममधील गिर्यारोहकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह खाली आणण्याचे काम काही गिर्यारोहकांकडून सुरू आहे. या शिखरावर २०१२ मध्ये १८ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. तर नंतरच्या काळातही १२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.