शेतक-यांच्या अंगावर जाऊ नका, त्यांनी जर हातात औताचे लुमणं घेतले तर मंत्र्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.
मुंबई – राज्यावर दुष्काळाचे संकट असताना त्यांना मदत देण्याऐवजी मंत्र्यांचे पीए शेतक-यांच्या अंगावर धावून जात आहेत. शेतक-यांच्या अंगावर जाऊ नका, त्यांनी जर हातात औताचे लुमणं घेतले तर मंत्र्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. राज्यात पाण्याचा दुष्काळ आहे आणि सरकारमध्ये इच्छाशक्तीचा दुष्काळ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातील दुष्काळावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चा सुरू झाली. विधान परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढताना राज्यातील शेतक-यांच्या दुष्काळाचे वास्तव मांडले. ते म्हणाले की, ‘राज्यावर दुष्काळ असताना सरकारने शेतक-यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज होती. मात्र सरकारने शेतक-यांची थट्टा चालवली आहे. दुष्काळ दौ-यावर गेलेल्या मंत्र्यांचे पीए शेतक-यांना मारहाण
करत आहेत.
धनंजय मुंडे म्हणाले, बीडमधील केज तालुक्यात राजाभाऊ जाधव या शेतक-याने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबाला विहीर मंजूर झाली. आता प्रशासनाने सांगितले की, ‘तुम्ही विहिरीचे काम करून घ्या, नंतर पैसे देऊ. त्या शेतक-याचा मुलाचा मला फोन आला. तो म्हणाला, ‘भाऊ मला प्रशासन सांगते की, विहिरीचे काम करून घ्या, नंतर पैसे देऊ. विहीर खोदायला तीन लाख रुपये लागतात.
माझ्या बापाकडे २० हजार रुपये असते तरी माझ्या बापाने आत्महत्या केली नसती. शेतक-यांची मानहानी करू नका हो!.. असे सांगत मुंडे यांनी त्या प्रसंगाचे वर्णन केल्याने सभागृह हेलावले. सावकारी कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली, मात्र त्याचा फायदा दुष्काळग्रस्त भागातील एकाही शेतक-याला झाला नाही, असे सांगून धनंजय मुंडे म्हणाले की, ‘माझ्याकडे आत्महत्या केलेल्या शेतक-यांची यादी आहे. मात्र त्यात एकाही शेतक-याचे नाव मुथा, संचेती नाही. कर्जमाफ केलेल्या शेतक-यांच्या यादीमध्ये मात्र असे अनेक शेतकरी आहेत की, ज्यांचे जगणे शेतीशी संबंधित नाही तर इतर व्यवसाय आहे. पण हे पैसे त्यांनीच लाटले. एका जिल्हाधिका-याने चारा उपलब्ध असल्याचा अहवाल दिल्याने सरकारने चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला.