देशभरातील चार लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा विद्वान-साहित्यिकांना शेतकरी का दिसला नाही.
पुणे- देशभरातील चार लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा विद्वान-साहित्यिकांना शेतकरी का दिसला नाही. तेव्हा पुरस्कार परत का नाही केले? कुठे गेली होती त्यांची सहिष्णुता? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला आहे. राजकारण ही कुणा एकाची वतनदारी नाही. ही वतनदारी मोडून काढण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यात आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात खोत बोलत होते. या वेळी संस्थापक खासदार राजू शेट्टी, जया शेट्टी, रविकांत तुपकर, पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढवाण, कैलास वाणी, पांडुरंग शिंदे, योगेश पांडे आदी उपस्थित होते. मेळाव्यात जया शेट्टी यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.
देशात सहिष्णुता धोक्यात आली आहे, असे म्हणत शास्त्रज्ञ, साहित्यिक, विद्वान लोक पुरस्कार परत आहेत. ज्या वेळी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशावेळी याच विद्वान-साहित्यिकांच्या संवेदना कशा काय जाग्या झाल्या नाहीत? त्यावेळी त्यांना आत्महत्या करणारा शेतकरी दिसला नाही का? तेव्हा कुठे गेली होती यांची सहिष्णुता? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.
मोठया कलाकाराने, क्रिकेटपटूने सरकारला पत्र लिहिताच सरकार गंभीर होते. सरकारच्या संवेदना जाग्या होतात, मात्र त्याच वेळी सरकारला पत्र लिहून एखादा शेतकरी आत्महत्या करतो; त्या वेळी सरकारच्या संवेदना कोमात कशा काय जातात? असा प्रश्नही खोत यांनी विचारला.
सध्या शेतकरी संकटात सापडला आहे. सुरक्षितता नाही. त्यामुळे किमान एक वेळचे तरी पोटाला खायला मिळेल, या आशेने शेतकरी गाव सोडून शहराचा रस्ता धरत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी व्यवस्थेत बदल केला पाहिजे.
शेतमालाला भाव व शेतक-यांच्या मुलांच्या हाताला काम दिले पाहिजे. गांधीजींनी खेडयाकडे चला, म्हटले होते; आता मात्र ‘शहराकडे चला’ अशी परिस्थिती ओढवली आहे. हे चित्र बदलायला हवे, असेही ते म्हणाले.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी हा शोषण करत नाही, तर नवनिर्मिती करतो. कोटय़वधी लोकांचे पोट भरण्याचे समाजकार्य करतो. एकप्रकारे समाज उभा करतो, मात्र आदर्श समाजनिर्मितीची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. त्यामुळे राजकारणात लायक लोक राजकारणात आले तर समाजाची प्रगती होण्यास खूप मदत होईल.
राजकारण वाईट नाही, तर राजकारणी वाईट आहेत. धोरण तयार करण्यात राजकारण्यांचा मोठा वाटा असतो. ते चुकले तर त्याचा समाजावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे तरुणांनी स्वच्छ प्रतिमा ठेऊन राजकारणात यावे, असेही ते म्हणाले.