‘‘केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे.
मुंबई- ‘‘केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. या सरकारचे दुष्काळाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्यासाठी मी आज १४ ऑगस्ट रोजी निवेदन दिले आहे.
१४ सप्टेंबपर्यंत शेतक-यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केल्या नाहीत, तर जनावरांसह देशभर जेलभरो आंदोलन केले जाईल,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी उस्मानाबाद येथे दिला. प्रत्येक भाषणाची सुरुवात ‘भाईयों और बहिनों’ अशी करणा-या नरेंद्र मोदी यांना शेतकरी भाऊ-बहीण दिसत नाहीत का, असा सवालही पवार यांनी केला.
दुष्काळात होरपळणा-या मराठवाडयातील जनतेला दिलासा देण्याऐवजी पंचतारांकित पाटर्य़ाच्या आयोजनात मग्न मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उस्मानाबाद येथे शेतक-यांचा भव्य मोर्चा आयोजित केला होता. यावेळी दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा न देणा-या केंद्र आणि राज्य सरकावर पवार यांनी जोरदार हल्ला चढविला.
ते म्हणाले की, आज संकटाच्या काळी शेतक-यांच्या हितासाठी आपण एकत्र आलो आहोत. गेल्या वर्षी अतिवृष्टी होती, दुष्काळ होता, त्यावेळी मी कृषिमंत्री होतो. दिल्लीत बसून काही कळत नाही. त्यासाठी बांधावर जावे लागते. तेव्हा मी तुमच्या जिल्ह्यात येऊन तुम्हाला मदत केली. आताच्या सरकारला शेतक-यांसाठी काही करण्याची इच्छा दिसत नाही. पण आम्ही शेतक-यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
सत्तेवर आलेल्या नव्या सरकारला वर्ष पूर्ण झाले, परंतु देशातील प्रश्नांचे गांभीर्य त्यांना कळलेले नाही. शिवसेना-भाजपाचे लोकप्रतिनिधी केवळ भगवे कपडे घालून येतात असे सांगून पवार म्हणाले की, मराठवाडयातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्याबाबत आज १४ ऑगस्ट रोजी आपण सरकारला निवेदन दिले आहे.
१४ सप्टेंबर पर्यंत थांबूया. सरकार या पुढेही तसेच वागत राहिले तर नुसता मोर्चा काढून चालणार नाही. जर उपाययोजना झाल्या नाहीत तर १५ सप्टेंबर पासून देशभर जेलभरो आंदोलन करावे लागेल. मग या सरकारला माणसे ठेवण्यासाठी तुरुंग पुरणार नाहीत. सध्या पाणी आणि चा-याचा प्रश्न सर्वात बिकट झालेला आहे. सरकारने चारा छावण्या काढल्या नाहीत तर आम्ही जनावरं घेऊन जेलमध्ये जाऊ, असा इशाराही पवार यांनी दिला. येत्या तीन दिवसांत पवार परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.