शेतक-यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय आहे. मात्र सध्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे असा दावा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला आहे.
नवी दिल्ली – शेतक-यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय आहे. मात्र सध्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे असा दावा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला आहे. सरकारने सध्या कृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याशिवाय शेतक-यांचे उत्पनात वाढ व्हावी यासाठी पिंकाना रास्त दर देण्यात येत आहेत, असे शरद पवार मंगळवारी आर्थिक परिषदेत बोलताना म्हणाले.
शेतक-यांच्या आत्महत्या हा आमच्यासमोरील गंभीर विषय आहे पण सध्या हे प्रमाण कमी होत आहे. शेतक-यांच्या आत्महत्यांना पिक नष्ट होणे, दुष्काळ, आजारपण अशी अनेक कारणे असल्याचे पवार म्हणाले.
पिकांना रास्त दर तसेच अन्य निर्णयांमुळे शेतक-यांची स्थिती सुधारण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपला मुद्दा पटवून देताना त्यांनी आकडेवारीचा दाखल दिला. २००६ मध्ये महाराष्ट्रात १०३५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. तेच प्रमाण २०११ मध्ये ४८० असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्नधान्य उत्पादनात घट
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २०१२-१३ मध्ये अन्नधान्य उत्पादनात घट होईल. मात्र देशाची गरज भागेल इतपत पुरेशाप्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होईल असे पवार म्हणाले. गेल्यावर्षी अन्नधान्याचे अनुमानापेक्षा जास्त रेकॉडब्रेक उत्पादन झाले होते. पाऊस विलंबाने झाला असला तरी, मोठया प्रमाणात अन्नधान्य उत्पादनात घट होणार नाही. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकात झालेला कमी पाऊन आणि ३६० तालुक्यात दुष्काळ असल्याने गेल्या महिन्यात कृषी मंत्रालयाने खरीप पिकात दहा टक्के घट होईल असा अंदाज वर्तवला होता.