दिल्ली सरकारने इंडिया गेटजवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
नवी दिल्ली – दिल्ली सरकारने इंडिया गेटजवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. देश विदेशातून येणा-या पर्यटकांच्या पर्यंटनासाठीचं इंडिया गेट हे प्रमुख आकर्षण आहे. इकडे स्मारक बांधल्यानंतर सुरक्षेत वाढ करावी लागेल. त्यामुळे इथे भेट देणा-या पर्यटकांची संख्या रोडावेल असं मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्मारकासाठी दुसरी जागा पहावी असे त्यांनी सांगितले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के.एन्टोनी,गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, कमलनाथ यांना पत्र लिहून स्मारकाच्या जागेसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. त्यात त्यांनी इंडिया गेट आणि आजूबाजूच्या परिसराला ऐतिहासिक महत्व असल्याने शहिद जवान स्मारकासाठी दुसरी जागा निवडावी अशी विनंती केली होती.
मात्र संरक्षणमंत्री ए.के. एन्टोनी यांनी स्मारकासाठी हीच जागा योग्य असल्याचे ठासून सांगितले आहे. भारत पाकिस्तान युद्धाला ४१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी इंडिया गेटवर पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवादही साधला.
कारगिल युद्धानंतर शहीदांचे स्मारक बांधावे असा प्रस्ताव चर्चेत होता. त्या प्रस्तावाअंतर्गत इंडिया गेटच्या केनेपीच्या जवळ शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी एक स्मारक बांधण्यात येणार आहे. त्या स्मारकाच्या भिंतीवर स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या जवानांसह आतापर्यंत आपल्या प्राणाची आहुती देणा-या तमाम जवानांची नावे लिहिण्यात येणार आहेत. शीला दिक्षीत यांच्या या भूमिकेमुळे आता शहिद जवान स्मारक बांधायला आणखीन अवधी लागणार आहे.