दिल्लीत १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी आपल्याविरोधात खटला चालवण्यात येऊ नये अशी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
नवी दिल्ली- दिल्लीत १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी आपल्याविरोधात खटला चालवण्यात येऊ नये अशी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
दिल्लीतील शीख दंगलीच्या वेळी सज्जन कुमार यांचा संबंध सुल्तानपुरी येथील सहा लोकांच्या हत्येशी जोडला असून त्यांच्यावर आरोपही निश्चित केले होते. त्या निर्णयाला सज्जन कुमार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी सज्जन कुमार यांची याचिका फेटाळून लावली आणि त्यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले. कुमार व्यतिरीक्त या प्रकरणातील सहआरोपी वेद प्रकाश पायल उर्फ वेदू प्रधान आणि ब्रह्मानंद गुप्ता यांनीही अशाप्रकारे दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
दरम्यान, शीला कौर यांनी सज्जन कुमार यांच्यासह चार जणांच्या विरोधात दंगल घडवून आणने, हत्या करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, हत्येचा कट रचण्याचा आरोप करत अपिल दाखल केले होते. मात्र न्यायालयाने हे अपिल फेटाळून लावले आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या करण्यात आली. त्यानंतर दिल्लीत उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत सज्जनकुमार यांच्यासह गुप्ता, पेरु,कौशल सिंग आणि पायत या चार जणांवर दोन धर्मियांमध्ये दंगल भडकवण्याचा आणि सहा जणांची हत्या केल्याचा आरोप आहे.
दुस-या एका प्रकरणात जगदीश कौर या महिलेचा पती आणि मुलग्यासह तीन भावांची हत्या करण्यात आली होती. या खटल्यात जगदीश कौर या प्रत्यक्षदर्शी होत्या, त्यांनी सज्जनकुमार यांच्या विरोधात साक्ष दिली होती. दिल्ली पोलिसांनी २००५ मध्ये या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सुपूर्द केला होता. नानावटी आयोगाच्या शिफारशीनंतर २००५ मध्ये सज्जनकुमार यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयाने २०१० मध्ये सज्जनकुमार यांच्यावर हत्या, दरोडा आणि अन्य घरातील साहित्याचे नुकसान केल्याचे आरोप निश्चित केले. पोलिस आणि सज्जनकुमार यांनी मिळून हा दंगलीचा कट रचल्याचा आरोप सीबीआयने केला होता. दंगलीकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली, असे सीबीआयचे म्हणणे होते. मात्र या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने २०१० मध्ये सज्जनकुमार यांना निर्दोष ठरवले. तर बलवान खोक्कर, माजी नगरसेवक महेंद्र यादव, माजी आमदार किशन खोक्कर, गिरधर लाल आणि कॅप्टन भागमाल या पाच जणांना दोषी ठरविले.