काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांची अखेर विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांची अखेर विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशमुख यांच्या सभापतीपदाचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला, त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अनुमोदन दिले. विरोधकांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने देशमुख यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
सलग तिस-यांदा विधान परिषदेचा सभापती होण्याची संधी मिळाल्याने त्यांनी सभागृहाचे आभार मानले. विधान परिषद हे वरिष्ठांचे सभागृह आहे. देशातील प्रत्येक राज्यात ते असावे, त्यासाठी घटनेत बदल करण्याची गरजही त्यांनी या वेळी व्यक्त केली. देशातील केवळ सहा राज्यांतच विधान परिषद अस्तित्वात असून काही राज्यांनी विधान परिषद विसर्जित केली आहे. महाराष्ट्राने विधान परिषदेत चांगले काम करून देशासमोर एक आदर्श ठेवला असल्याचे ते म्हणाले. विधान परिषद सदस्यांची निवड ही राज्यसभा सदस्यांच्या निवडीप्रमाणे व्हावी, अशी सूचना त्यांनी केली. सभापतींच्या कारकिर्दीत शेतकरी आणि कष्टकरी कामगारांवर अन्याय होणार नाही, यासाठी सतत प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, विरोधीपक्षनेतेपदी भाजप नेते विनोद तावडे यांची दुस-यांना निवड करण्यात आली.
काँग्रेस विधान परिषदेच्या पाचही जागा लढवणार
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचही जागा लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. या निवडणुका १९ जुलै रोजी होतील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या ३ पदवीधर आणि पुणे व अमरावती या २ शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.