शिवसेनेचे मंत्री आपल्याच आमदारांची कामे करीत नाहीत. तीन-तीन वेळा सांगूनही कामे होत नाहीत.
मुंबई- शिवसेनेचे मंत्री आपल्याच आमदारांची कामे करीत नाहीत. तीन-तीन वेळा सांगूनही कामे होत नाहीत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही छोटय़ाशा कामासाठी याचना करावी लागते, अशा शब्दांत शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी घरचा आहेर दिला आहे. हे करीत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मात्र तोंडभरून कौतुक केले आहे.
चेंबूर घाटला येथील शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी पक्षा विरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी चक्क शिवसेना मंत्र्याबाबत आहे. मात्र, आपण नाराज असलो तरी भाजपमध्ये जाणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
काते यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर आगपाखड करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना काम सांगितले तर ते होत नाही. मुख्यमंत्री मात्र जलदगतीने काम करत असल्याचे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गणपतीला बोलावले तर ते लगेच आले. आमच्या ज्येष्ठ मंत्र्याना आमंत्रण देऊनही ते फिरकले नाहीत. मी तीन वर्षापासून शिवसेनेच्या मंत्र्यांकडे माझ्या कामासाठी दरवाजे झिवत आहे. पण कामे होत नाहीत.
मुख्यमंत्र्यांना एखादे काम सांगितले तर लगेच केले जाते. मी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले तर ते माझ्या गणपतीला येतात. हे त्यांचे मोठेपण आहे. मुंबई महापालिकेत सत्ता असतानाही आमच्या मतदारसंघातील कामे होत नाहीत. महापालिकेच्या कामगार वसाहतीच्या समस्या सोडवल्या जात नाही. या कामगारांना घरातून बाहेर काढले तर मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री माझ्या घरी गणपतीला आले म्हणून मी भाजपात जाणार असा अपप्रचार केला जात आहे. मुख्यमंत्री मिलिंद नार्वेकर यांच्याही घरी गेले होते. मग तेही भाजपात चालले आहेत काय, असा खोचक सवालही काते यांनी विचारला आहे.