आता आदित्य ठाकरेंची लोणकढी थाप
अहमदनगर – शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सत्तेतून पायउतार होण्याच्या वल्गना केल्या आहेत. प्रत्यक्षात त्यांना सत्तेची ऊब काही सोडवत नाही. त्यांचाच कित्ता आता त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी गिरवायला सुरुवात केली आहे. ‘शिवसेना याच वर्षी सत्तेवर लाथ मारणार’, अशी लोणकढी थाप त्यांनी मारली आहे. पण ही थाप मारताना त्यांनी काहीशा सावधपणे, ‘याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत,’ असे सांगून चेंडू वडिलांच्या कोर्टात भिरकावून दिला.
सावेडीत आदित्य ठाकरे यांचा रोड शो आणि सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, भाजपवर नाव न घेता टीका केली. गुजरातमधील सभांमध्ये खुच्र्या रिकाम्या दिसतात. तसे शिवसेनेच्या कोणत्याही सभेत होत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. शिवसेना विरोधी पक्षात नाही, पण सत्तेत पहारेकरी म्हणून काम करते. चांगल्या कामांचे कौतुक करतो, पण चुकीच्या कामांना रोखण्याचे काम केले जाते, असेही ते म्हणाले. विद्यार्थी, महिला, व्यापारी कोणीही सत्ताधा-यांवर खूश नाही.
नोटाबंदीच्या काळात एकही श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर दिसली नाही. काळा पैसा बाहेर निघाला नाही, पण महिलांनी बचत करून ठेवलेले पैसे काळे धन म्हणून दाखवले गेले. शेतक-यांना कर्जमुक्ती हवी आहे, पण कर्जमाफीही धड दिली जात नाही, त्यामुळे याचवर्षी शिवसेना सत्तेला लाथ मारणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पुढील काळात सत्ता सेनेचीच येणार, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, सत्ता सोडू, हे पालुपद उद्धव ठाकरे नेहमी लावत असतात. प्रत्यक्षात त्यांना सत्ता हवी आहे. त्यामुळेच की काय मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. ‘उद्धव हे सत्तेला फेव्हिकॉलसारखे चिकटलेले आहेत,’ असे त्यांनी मिश्लिकपणे सांगितले होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनीही अनेक सभांमध्ये उद्धव ठाकरे हे सत्ता सोडणार नाहीत. कारण सत्ता सोडण्याचा विचार जरी बोलून दाखवला तर शिवसेनेचे आमदार अस्वस्थ होतात. हे आमदार भाजपमध्ये जाऊ नये, म्हणून ते सत्तेत चिकटून असल्याचा आरोपही राणे यांनी केलेला आहे.