तीन महिन्यांपासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याची प्रतीक्षा करावी लागत असतानाच त्यात आता रॉकेलच्या तुटवडय़ाची भर पडल्याने गरिबांना चूल पेटवणे कठीण झाले आहे.
मुंबई – तीन महिन्यांपासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याची प्रतीक्षा करावी लागत असतानाच त्यात आता रॉकेलच्या तुटवडय़ाची भर पडल्याने गरिबांना चूल पेटवणे कठीण झाले आहे. मुंबई व उपनगरांतील ९० टक्के दुकानांवर रॉकेल मिळत नसल्याने शिधापत्रिकांना खुल्या बाजारातून चढय़ा भावाने रॉकेल खरेदी करावे लागते आहे.
मुंबईतील झोपडपट्टय़ांतील ६५ टक्के रहिवाशांची चूल रेशनवर पेटते. मात्र तीन महिन्यांपासून मुंबई-ठाण्यातील रेशन दुकानांत केशरी शिधापत्रिकांना धान्यच मिळत नाही. आता केंद्र सरकारने रॉकेलमध्ये कपात केली आहे. अनेकदा रॉकेलही दुकानापर्यंत वेळेत पोहोचत नाही. मात्र, खुल्या बाजारात चढय़ा भावाने रॉकेलची विक्री करणा-यांची तेजी आहे, असा आरोप रेशन कृती समितीचे समन्वयक गोरख आव्हाड यांनी केला आहे.
गोवंडी- शिवाजी नगर, मानखुर्द,चेंबूर, कुर्ला, वडाळा, वांद्रे, धारावी, खार, सांताक्रुझ आदी विभागातील रेशन दुकानांमध्ये रॉकेलचा तुटवडा आहे. रॉकेल उपलब्ध झाले आहे का ? याच्या चौकशीसाठी रोज चकरा मारणा-या शिधापत्रिकाधारकांना दुकानदारांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या आहेत. रेशन दुकानात रॉकेलचा तुटवडा असताना बाजारात चढय़ा भावाने रॉकेलची विक्री केली जाते. हे रॉकेल कोठून येते? याचे उत्तर मात्र रेशन दुकानदार व रेशनिंग कार्यालयातील अधिका-यांकडून मिळत नाही. धान्याचा व रॉकेलच्या तुटवडय़ामुळे हैराण झालेल्या शिधापत्रिकाधारकांमध्ये संताप असून ‘हेच का ते अच्छे दिन’ अशा संतप्त प्रतिक्रिया आहेत. दरम्यान, या प्रश्नावर लवकरच रेशन कृती समितीच्या नेतृत्वाखाली रेशन पत्रिकाधारकांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रेशन कृती समितीचे आव्हाड यांनी सांगितले.