राजकारणात शिक्षणाची गरज असते का? या प्रश्नाची उत्तरे निरनिराळी असू शकतात. पण जास्तीत जास्त लोकांचे उत्तर शिक्षणाची गरज असतेच, असे असू शकेल.
नेरळ – राजकारणात शिक्षणाची गरज असते का? या प्रश्नाची उत्तरे निरनिराळी असू शकतात. पण जास्तीत जास्त लोकांचे उत्तर शिक्षणाची गरज असतेच, असे असू शकेल. अंगठेबहाद्दर किंवा शैक्षणिक अर्हता कमी असलेल्या उमेदवारांच्या हाती आपल्या आयुष्याची दोरी असूच नये, यावर सगळय़ांचेच एकमत होईल हे नक्की! पण कर्जत विधानसभा मतदारसंघातील केवळ एक उमेदवार सोडला तर सगळय़ांची शैक्षणिक अर्हता ‘शिक्षणाच्या आयचा घो!’ म्हणण्यासारखी आहे. हे सगळेच उमेदवार दहावीच्या पुढे गेले नसल्याचे ऐकून आपले भविष्य काय, हेही या मतदारसंघातील जनतेला कळले असेल.
कर्जतच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच सर्व पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि एक अपक्ष असे सगळे मतदानाला सामोरे जात आहेत. या सगळय़ांचा भर आहे, तो शैक्षणिक बदल घडवून आणण्यावर! पण यातील कित्येकांचे स्वत:चेच शिक्षण जेमतेमही झालेले नाही. यावर या सगळया उमेदवारांनी आपल्याला राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आपण हे शिक्षण पूर्ण केल्याचे म्हणणे आहे. शिवाय उच्च शिक्षण घेतले म्हणजेच राजकारणी घडतो, असेही कुठे लिहून ठेवलेले नाही, अशी मल्लीनाथीही त्यांनी जोडली आहे. कमी शिक्षण असलेल्या नेत्यांनीही चांगला राज्यकारभार केल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. पण शैक्षणिक हब होऊ पाहात असलेल्या कर्जतचा आमदार अल्पशिक्षित असून कसा चालेल? असा प्रश्न खुद्द कर्जतकरांना पडला आहे.
दरम्यान, निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल करताना आपली शैक्षणिक अर्हता नमूद केली आहे. यात केवळ भाजपचे उमेदवार राजेंद्र येरुणकर हे वकील आहेत. त्यांचे बीए/एलएलबी इतके शिक्षण झाले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय वकिली हा आहे. विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश लाड यांचे शिक्षण जुनी अकरावीपर्यंत झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे दहावी नापास आहेत. खोपोली जनता शाळेत असताना ते नापास झाले होते. त्यानंतर ते पुढे शाळेतच गेले नाहीत. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. आजिवली शाळेत त्यांचे दहावीचे शिक्षण पूर्ण झाले.
काँग्रेसचे उमेदवार शिवाजी खारीक यांनी, त्यांच्या शेलू गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. तर अपक्ष आणि एकमेव महिला उमेदवार असलेल्या लीला ढुमने यांचे १२वीपर्यंतचे शिक्षण पाली येथील शाळेत झाले आहे.