मागील काही वर्षात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी काही धंदेवाईक मंडळींमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे.
मुंबई – माणूस घडवण्यासाठीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया शिक्षकांच्या माध्यमातून पार पाडली जाते. मात्र मागील काही वर्षात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी काही धंदेवाईक मंडळींमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. एका शिक्षकाच्या नियुक्तीसाठी सुमारे २५ लाखांपर्यंतची रक्कम घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोप शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केला आहे.
दादर येथील शिवाजी नाटय़मंदिरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या २४व्या वार्षिक अधिवेशनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाणार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी आमदार संजीवनी रायकर, परिषदेचे सरदार महेंद्रसिंह सोहल, शरद यादव आदी उपस्थित होते. शिक्षक हा समाजासाठी सन्मानाचे स्थान असल्याने त्यांच्या नियुक्तीतील भ्रष्टाचार संपलाच पाहिजे. यासाठी सरकारने सीईटीसारख्या परीक्षा घेऊन प्रत्येक शिक्षकांची गुणवत्तेवर नियुक्ती करावी, यामुळे भ्रष्टाचार संपेल, अशी सूचनाही गाणार यांनी केली.
समाजमनात शिक्षकांसाठीचा सन्मान कायम राहावा, यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यातील शालेय शिक्षण विभाग ६ मंत्रालयाच्या विभागांतर्गत येतो. यामुळे अनेकदा ताळमेळ न जमल्यामुळे शिक्षण क्षेत्राची परवड होते. यामुळे या विभागासाठी एकच मंत्रालय असावे. एकूण अर्थसंकल्पाच्या ३० टक्के रक्कम शिक्षणासाठी ठेवण्यात यावी आणि यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प ठेवण्यात यावा, त्याने सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे मतही गाणार यांनी व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रात राबवण्यात येत असलेली सरकारची धोरणे, त्यांचा शिक्षणावर होणारा परिणाम यावर संजीवनी रायकर यांनी आपले मत व्यक्त केले. या वेळी शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मुंबईतील २५ शिक्षकांना देण्यात आला.
शिक्षकांना हवी दोन वर्षाची बालसंगोपन रजा
केंद्रीय शिक्षकांना देण्यात येणारी दोन वर्षाची बालसंगोपन रजा राज्यातील शिक्षकांनाही द्यावी, अशा मागणीचा ठराव या अधिवेशनात मांडण्यात आला. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक आमदारांनी ही मागणी सरकारकडे लावून धरावी, असे आवाहन करण्यात आले. तर माध्यमिक शाळेतील तंत्रशिक्षकांना नियमित वेतनश्रेणी, अपंग शाळेतील शिक्षकांना समायोजित शिक्षक योजनेंतर्गत वेतनेतर तरतुदी देण्यात
याव्यात आदी मागण्यांचे ठरावही यावेळी करण्यात आले.