आता शाळा व शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात ‘योग’ हा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली- यापुढे केंद्र सरकारच्या सर्व शाळांमधून इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘योग’ हा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमातही योग विषय सक्तीचा करणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.
तसेच दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी ‘योग स्पर्धा’ आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेतील उत्कृष्ठ विद्यार्थ्याला पाच लाख रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येईल, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.
या विषयामुळे अन्य अभ्यासक्रमावर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून या विषयाच्या प्रॅक्टिकलसाठी ८० गुण राखीव ठेवण्यात आले आहेत, असे त्या म्हणाल्या. तसेच या विषयात विद्यार्थी आत्मीयतेने सराव करतील अशी आशा व्यक्त केली. तसेच प्रत्येक राज्य ‘योग’ हा विषय आपल्या राज्याच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यास मोकळे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
एनसीईआरटीची पुस्तके आता अॅपवर
येत्या १७ जुलै रोजी सरकार एक नविन अॅप सुरु करत असून त्यावर एनसीईआरटीची पहिली ते बारावी पर्यंतची सर्व पुस्तके मोफत उपलब्ध होणार आहेत.