राज्यातील शाळांना त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभी करण्यासाठी सरकारला निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याची स्पष्ट कबुली, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
मुंबई- राज्यातील शाळांना त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभी करण्यासाठी सरकारला निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याची स्पष्ट कबुली, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी दादर येथील एका शाळेत पाचवीत शिकणा-या अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर उच्च न्यायालयाने राज्यातील अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर किरण पावसकर आदींनी उपप्रश्न उपस्थित केले होते.
यावर तावडे यांनी सांगितले की, सर्व शाळांना सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे शक्य नसले तरी, आमदार निधीतून काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येतील काय, याचा विचार आम्ही करत असल्याचे सांगितले. यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केवळ आमदारांच्याच नाही, तर खासदारांच्याही निधीतून यासाठी काही निधी वापरता येईल का हे पाहून त्यावर कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
—–
धनगरांना आरक्षण द्या.. मुख्यमंत्री मुर्दाबाद..
मुंबई- ‘धनगर समाजाला आरक्षण द्या, जय मल्हार जय मल्हार. मुख्यमंत्री मुर्दाबाद, अशा घोषणा देत चार धनगर युवकांनी विधानसभा प्रेक्षक गॅलरी दणाणून सोडत खळबळ उडवून दिली. सभागृह सुरू असतानाच हा प्रकार झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब केले.
सभागृहातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. विरोधी सदस्यांनी मुस्लीम, मराठा व धनगर आरक्षणासंबंधी सरकारने आपली आश्वासने पाळावीत, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी टाटा इन्स्टिटय़ूट संस्थेने धनगर आरक्षणासंबंधी अहवाल मागवून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. गॅलरीतून घोषणा देणा-यांना ज्या आमदारांनी पास दिल्याचे उघड होईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे निर्देश देण्यात आले.
विधानसभेत सोमवारी दुपारी औचित्याचे मुद्दे सुरू होण्यापूर्वी प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या चार युवकांनी अचानक धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे, मुख्यमंत्री मुर्दाबाद, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात खळबळ उडाली. मात्र सुरक्षारक्षकांनी त्या युवकांना तातडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले.
मात्र या घटनेचे पडसाद सभागृहातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे म्हटले. सरकारने विशेषत: मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फसविले अशी भावना निर्माण झाल्यामुळेच हे चार युवक इथपर्यंत येऊ लागले आहेत. जनतेमध्ये अशाप्रकारे भावना वाढीस लागल्या तर उदया हेच युवक येथे सभागृहात देखील येतील, असा इशाराही पाटील त्यांनी यावेळी फडणवीस सरकारला दिला.
ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी धनगर समाजाची दखल घेतली जात नाही. सरकार निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळत नाही. त्यामुळे या तरुणांचा राग बरोबर आहे, असे मत व्यक्त केले.
विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा, मुस्लीम आरक्षणाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात येईल, असे जाहीर केले होते. याकडे लक्ष वेधले.
हे सरकार फक्त घोषणा देणारे, असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी उद्या मंत्र्यांना धनगर समाज राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. अध्यक्षांनी यासंदर्भात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.