एटीएस राज्यातील शाळांशी समन्वय साधून शाळांच्या सुरक्षेसाठी विशेष ‘स्कूल ऑपरेशन प्लान’(एसओपी) आखण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई – पाकिस्तानातील पेशावर येथे आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यातील शाळांशी समन्वय साधून शाळांच्या सुरक्षेसाठी विशेष ‘स्कूल ऑपरेशन प्लान’(एसओपी) आखण्यास सुरुवात केली आहे.
[poll id=”875″]
‘एटीएस’च्या स्थानिक पथकांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, स्कूलबसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही राज्य सरकारने विशेष नियमावली तयार केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाळांची सुरक्षा व त्यांच्या अंतर्गत रचनेबाबत माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत गरज भासल्यास शाळा प्रशासन व प्राध्यापकांशी बैठका घेतल्या जाणार आहेत. पाकिस्तानात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
या ‘एसओपी’ अंतर्गत सरकारी व बिगर सरकारी शाळांच्या रचनेबाबतची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यास सांगण्यात येणार आहे. याशिवाय रचनेत काही बदल केल्यानंतर त्याची माहितीही देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पोलीस किंवा संबंधित सुरक्षा यंत्रणेला शाळांमध्ये सहज प्रवेश करता यावा, या दृष्टीने आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी एटीएसचे अधिकारी इंटरनेटच्या माध्यमातूनही शाळांच्या रचनेबाबतची माहिती घेत आहेत.
याशिवाय स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही काही नियमावली लवकरच लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यात बसमधील कर्मचा-यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक स्कूल बसमध्ये १५ दिवसांचे चित्रीकरण साठवता येईल, अशा क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बसचालक व क्लिनरचे पोलिसांमार्फत त्यांच्या संपूर्ण माहितीची पडताळणी करणे, बसचे रजिस्ट्रेशन क्रमांक, वाहतूक परवाना, चालकाचा परवाना आदींच्या प्रती शाळा प्रशासनाकडे ठेवणे, दर सहा महिन्यांनी चालकाच्या डोळ्यांची तपासणी करणे, मद्यपी चालकांना आळा घालण्यासाठी ‘सरप्राईज व्हिजिट’, बसमध्ये प्रथमोपचाराचे साहित्य ठेवणे, दर तीन वर्षानी परवान्यांची तपासणी करणे आदी विविध तरतुदी सूचवण्यात आल्या आहेत.