शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिवळीअंतर्गत सावरोली गावासाठी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही स्मशानभूमी निरुपयोगी ठरणार असल्याची तक्रार गावक-यांनी केली आहे.
शहापूर – शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिवळीअंतर्गत सावरोली गावासाठी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही स्मशानभूमी निरुपयोगी ठरणार असल्याची तक्रार गावक-यांनी केली आहे. या तक्रारीकडे दुर्लक्ष करणा-या ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांच्यासह हे काम करणा-या उपअभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव दशरभ भालके यांनी शहापूर गटविकास अधिका-यांकडे केली आहे.
पिवळी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सावरोली खुर्द या गावात जनसुविधा योजनेतून साडेतीन लाख रुपये खर्च करून स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. त्यामुळे येथील गावक-यांची सोय होईल, असे वाटत होते. मात्र स्मशानभूमीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट साहित्य वापरून झाल्याचे पाहून गावक-यांचा भ्रमनिरास झाला आहे. याबाबत ग्रामविकास अधिका-यांकडे तक्रार केली व चौकशीची मागणी केली असता, ग्रामविकास अधिका-यांनी ग्रामस्थांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याविरोधात श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके यांनी गटविकास अधिका-यांकडे एका निवेदनाद्वारे संबंधित ग्रामविकास अधिकारी व उपअभियंत्यावर कारवाईची मागणी केली असून, याबाबत त्वरित निर्देश न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.