कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्वच्छतेबाबत राज्यात खूप मागे आहे हे सत्य प्रशासनाने स्वीकारले असून पालिकेतील सत्ताधारी हा कलंक पुसण्यासाठी प्रयत्नांना दिखावा करत आहेत.
डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्वच्छतेबाबत राज्यात खूप मागे आहे हे सत्य प्रशासनाने स्वीकारले असून पालिकेतील सत्ताधारी हा कलंक पुसण्यासाठी प्रयत्नांना दिखावा करत आहेत.
शहरात स्वच्छतेचे आवाहन करणारे केवळ फलक लावले असून शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी, रस्ते काँक्रिटीकरणाची कामे केली जात आहे. मात्र, शहरातील मुख्य समस्या घनकचरा व्यवस्थापनीची असून त्याकडे पालिका सत्ताधारी व प्रशासानेचेही पुरेसे लक्ष नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छतेची मूळ समस्या बाजूला राहिली आहे.
शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी करून अस्वच्छतेचा प्रश्न सुटणारा नाही. २०१५ मध्ये केंद्र सरकारच्या स्वच्छता योजना आल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी सल्लागारपदी श्रीकृष्ण भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. त्याच्या मंजुरीसाठी ९ महिने वाया गेले.
आता उशिराने जाग आल्यानंतरही केवळ रंगरंगोटीवर भर दिला जात आहे. दुसरीकडे भागवत यांची जरी नियुक्ती करण्यात आली असली तरी मागील काही महिन्यांपासून त्यांचे मानधन दिले गेलेले नाही.
काही महिन्यांपूर्वी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात पालिकेने स्वच्छता अभियानाची माहिती देण्यासाठी विविध संस्थांना बोलावले होते. मात्र, यावेळी सल्लागार असलेल्या भागवत यांना बोलण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे घनकच-याचे व्यवस्थापन कसे होत आहे, याची माहिती समोर स्पष्ट झाली नाही.
प्रशासनाकडून अशी स्थिती असता पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडूनही स्वच्छतेच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात आहे. सत्ताधा-यांनीही श्रीकृष्ण भागवतांना आपले मत किंवा माहिती स्पष्ट करण्याबाबत संधी न दिल्याविषयी शांत बसणेच पसंत केले आहे.