ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (७७) यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (७७) यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना २०१४ या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय कामगिरी करणा-यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार दिला जातो.
शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ मध्ये कोलकाता येथे झाला असून त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वडिल पृथ्वीराज कपूर, भाऊ राजकपूर आणि शम्मी कपूर यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा शशी कपूर यांनीही जपला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना २०१४ चा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. गेली सहा दशके आपल्या मोहक दिसण्याने आणि अभिनयाने रसिकांवर गारूड करणा-या कपूर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शशी कपूर यांचा पाच दिवसांपूर्वीच ७७ वा वाढदिवस साजरा झाला. भारतीय सिनेमाला त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदान व विकासाबाबत हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला आहे. १६० चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांच्यानंतर शशी कपूर हे एकाच घरातील तिसरे व्यक्ती ठरले आहेत.
शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीची जणू प्रदीर्घ सेवा केली. एक बालकलाकार ते चरित्र अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, नाट्यसृष्टीला नवसंजीवनी देण्यासाठीचे प्रयत्न, भारतीय चित्रपटांना जााग्तिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न अशी ही कलेची एक र्सवकष सेवा त्यांनी केली.
आजही आपली ही बांधिलकी ते जपत असतात. वडील पृथ्वीराज कपूर व ज्येष्ठ बंधू राज कपूर व शम्मी कपूर यांच्या सानिध्यात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. १९४८ साली आलेल्या ‘आग’ व १९५१ साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला.
तरुणपणी इतर कपूरांप्रमाणे त्यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशीकपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. त्यानंतर त्यांचा नायक म्हणून असलेला प्रवास सुरू झाला. पुढे आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून ११६ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या.
आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत.
जब जब फुल खिले, शर्मिली, कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. एकेकाळी शशी कपूर व अमिताभ बच्चन यांची जोडीही विशेष गाजली होती. त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. शशी कपूर यांच्या दिवार, कभी कभी, सत्यम् शिवम् सुंदरम्, नमक हलाल, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले. अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग ३६ चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली.
हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे ठरले आहे. आपल्या वडिलांच्या नाटक संस्थेची त्यांनी पुर्नउभारणी केली. पृथ्वी थिएटर्सच्या माध्यमातून नव्या पद्धतीच्या नाटय जाणीवा जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही विलक्षण ठरले आहे. आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या सामाजिक बांधीलकीने व कलेविषयीच्या प्रेमानेही शशी कपूर यांनी केलेले कार्य हे विलक्षण आहे. त्यांना लाभलेल्या या सन्मानामुळे हिंदी चित्रपट सृष्टीनेच आनंद व्यक्त केला आहे.
शशी कपूर यांना २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.