लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकीय नेत्यांनी उद्योग उभारले तर त्यात वावगे काय,’’ असा सवाल विचारत शरद पवार यांनी नितीन गडकरी यांची पाठराखण केली.
पुणे- ‘‘महाराष्ट्राची उभारणी करत असताना अनेकांनी समाजकारणाबरोबरच औद्योगिकीकरणावरही भर दिला आहे. लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकीय नेत्यांनी उद्योग उभारले तर त्यात वावगे काय,’’ असा सवाल विचारत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची पाठराखण केली.
पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या’वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात पवार बोलत होते. अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे आर्थिक हितसंबध असल्याचा आरोप केला होता. त्याचा पवार यांनी या वेळी समाचार घेतला.
‘लवासा’प्रकरणी माजी पोलिस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी केलेल्या आरोपाबद्दल मात्र पवार यांनी मौन बाळगले.
‘‘सध्या माझे भाजप नेत्यांशी व्यावसायिक संबंध आहेत, असा सवाल काही लोक उपस्थित करत आहेत. पण लोकहितासाठी राजकारण्यांनी उद्योग उभारणे आवश्यक आहे. उद्योगांमुळे परिवर्तन घडवून आणण्याचे काम होत आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या उद्योगांवर टीका का, असा सवाल उपस्थित करत पवार यांनी गडकरींची पाठराखण केली.