इरॉस, एक ऐतिहासिक वास्तु, चर्चगेट स्थानकाच्या बाहेर असलेल्या या वास्तुने आतापर्यंत भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावली आहे. या वास्तुत अनेक चित्रपटांचे प्रिमिअर पार पाडले.
इरॉस, एक ऐतिहासिक वास्तु, चर्चगेट स्थानकाच्या बाहेर असलेल्या या वास्तुने आतापर्यंत भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावली आहे. या वास्तुत अनेक चित्रपटांचे प्रिमिअर पार पाडले. या ठिकाणी अनेक चित्रपटांनी आपले सिल्व्हर ज्युबली साजरी केली. या इरॉस थिएटर बाहेर मंगळवारी संध्याकाळी तुडुंब गर्दी जमली होती. या महत्त्वाच्या रस्त्यावरुन चालणारे ट्रॅफिकही धीम्या गतीने चाललं होतं आपल्या उंची गाडयांमधून जाणारी मंडळीही मान वळवून वळवून या गर्दीकडे पाहात होती. इरॉस थिएटरच्या प्रवेशद्वारावर टाकलेला लाल गालिचा व सुरक्षारक्षकांची गर्दीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती. या गर्दीचं कारणही तसचं होतं. या सदीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्वागतासाठी हा सारा सरंजाम होता. निमित्त होतं त्याच्या आगामी शमिताभ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचचं.
शमिताभ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. पा व चिनीकम या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक आर बाल्की याचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट. सध्या या चित्रपटाच्या पिडली .. हे गाणं जबरदस्त गाजत आहे. सगळयाच सोशल मिडीयावरही या गाण्याची चांगलीच धूम आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचं लॉंचींगही तशाच भव्य दिव्य स्वरुपात साजर होणं तस समर्थनीयचं.
शमिताभ हा चित्रपट दोन पिढयातल्या दोन माणसांमधल्या इगोचं दर्शन घडवणारा असा चित्रपट आहे. वास्तविक पाहाता हे केवळ त्याच्या ट्रेलरवरुनचं जाणवत एवढचं. आर बाल्की याचं एक वैशिष्टय म्हणजे त्याच्या प्रत्येक चित्रपटात एक आश्चर्यकारक असा भाग असतोच, असतो. पा या चित्रपटाच्या सुरुवातीच्या प्रोमोंमध्ये ही एक आजाराने त्रस्त झालेल्या मुलाची कथा आहे इतकचं आपल्याला दिसून आलं होतं. त्या मुलाची भूमिका अमिताभ बच्चन करतोय हे तेव्हा कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. येऊ दिलं नव्हतं. तशाच प्रकारच्या धक्काचीच आर बाल्कीकडून अपेक्षा आहे. या चित्रपटात ज्या दोघांमधला संघर्ष दाखवण्यात आला आहे त्या भूमिका अमिताभ बच्चन व रजनीकांतचा जावई असलेला धनुष करताहेत. या दोघांच्या नावाचं मिश्रण करुनचं या चित्रपटाचं नाव शमिताभ असं ठेवण्यात आलेलं आहे. धनुष हा दक्षिणेतला एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीतही तो वेगवेगळया भूमिकांसाठी ओळखला जातो. नुकत्याच येऊन गेलेल्या त्याच्या रांजना या चित्रपटाचं जबरदस्त कौतुक झालं होतं. आपल्यासाठी दोन्ही चित्रपट सृष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मात्र दक्षिणेत मी काहीशा एका इमेजमध्ये अडकलेलो आहे हे तो मान्य करतो. अर्थात तिथेही काहीना काही वेगळं करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. हिंदीत मात्र कमी काम करत असल्यानं इथे मला निवडीला अधिक वाव असतो. त्यामुळे सहसा माझ्या हिंदीतल्या भूमिका या वेगळयाच असतात असंही तो या वेळी म्हणाला.
या चित्रपटाच्या बाबतीत व दिग्दर्शक आर बाल्की याच्या विषयी अमिताभ च्या मनात प्रचंड आदर आहे. त्याला कारणही तसचं आहे. पा सारखी जबरदस्त भूमिका अमिताभला केवळ त्यानेच दिली होती. आर बाल्की दर काही वर्षानी एखादी जबरदस्त कथा माझ्याकडे घेऊन येतो. त्यानंतर त्याला नाही म्हणणं मलाही जीवावर येतं असं अमिताभ म्हणतो. या चित्रपटासाठी तर त्याने एक वेगळीच पद्धत वापरली होती. या चित्रपटाचे सर्वच संवाद त्याने अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केले होते. त्यानंतर या संवादांच्या आधारावर या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. त्यानंतर जिथे जिथे आवश्यक वाटलं तिथे त्याचं डबिंग करण्यात आल्याचं अमिताभ बच्चन यांनी यावेळी सांगितलं. ही पद्धत किंवा यातून सांगायची गोष्टच या चित्रपटाचं वेगळेपण अधोरेखित करणारी आहे. असं अमिताभ यांनी यावेळी सांगितलं.
या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीला एक नवी नायिका मिळणार आहे. सारिका व कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसन ही या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. या आधी आपल्याला केवळ दिग्दर्शनातचं रस असल्याचं सांगणारी ही मुलगी सहज अभिनेत्री झाली. या चित्रपटाची ऑफर जेव्हा आर बाल्की यांनी मला दिली तेव्हा मी त्यासाठी तयार नव्हते. मात्र जेव्हा मी यावर विचार व काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्यात अभिनेत्रीचेही गुण आहेत हे मला जाणवलं त्यामुळे मग काम करतांना मी फारचं मजा केली असं ती म्हणते. या चित्रपटात तिच्या बरोबर दोन दोन दिग्गज नट होते. त्यांच्या बरोबर काम करत असतांना तूझ्यावर काही दडपण आले नाही का? असं विचारलं असता ती म्हणते की हो तसं खरोखरचं माझ्यावर दडपण आलं होतं. मात्र या दोघांनीही मला इतकं सहकार्य केलं की त्याच्या मुळे मी माझं काम सहज करू शकले.
या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ यांच्यातल्या गायकाचेही दर्शन होणार आहे. हे गाण्याचं सारं श्रेय मात्र तो या चित्रपटाचे संगीतकार इलायराजा यांना देतो. या चित्रपटाचे छायाकंन दणितेले आघाडीचे छायाचित्रकार पी.सी.श्रीराम यांनी केले आहे. एकंदरीतच या वर्षातल्या मोठय़ा चित्रपटामध्ये शमिताभ हा चित्रपट आपले नाव कोरेल हे मात्र निश्चित.