शनि-शिंगणापूर येथील चौथ-यावर महिलांना चौथ-यावर जावू न देण्यात महिलांचा अपमान होतो, असे आपल्याला वाटत नाही, असे धक्कादायक वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मुंबई- शनि-शिंगणापूर येथील चौथ-यावर महिलांना जाण्यापासून रोखणे हा काही इतका महत्त्वाचा विषय नाही. महिलांना चौथ-यावर जावू न देण्यात महिलांचा अपमान होतो, असे आपल्याला वाटत नाही, असे धक्कादायक वक्तव्य ज्यांच्यावर महिला सक्षमीकरणाची जबाबदारी आहे, त्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नगर जिल्ह्यातील शनि-शिंगणापूर येथील शनि मंदिराच्या चौथ-यावर एका तरुणींने प्रवेश केल्यानंतर तेथील कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले. ते मंदिर दुधाने धुवून शुद्ध करण्यात आले. २१ व्या शतकातही महिलांना अशी दुय्यम वागणूक दिली जात असल्याबद्दल समाजातील सर्व स्थरावरून निषेध नोंदविला जात होता.
मात्र महिला सक्षमीकरणाची जबाबदारी असणा-या पंकजा मुंडे यांना हा विषय तितका महत्त्वाचा वाटत नाही. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना शिंगणापूर येथील घटनेबद्दल विचारले असता त्या म्हणाले, ‘‘महिलांना चौथ-यावर जाऊन दर्शन न घेऊ देणे, हा विषय मला फारसा महत्त्वाचा वाटत नाही. तसेच महिलांना शनिदेवाच्या चौथ-यावर जाऊ न देणे यात कोठेही महिलांचा अपमान आहे, असे आपल्याला वाटत नाही. कारण पौराणिक काळापासून ही प्रथा सुरू आहे. महिला स्वत:हून हनुमान मंदिर किंवा शनिमंदिरात जात नाहीत. त्यामुळे तेथे महिलांना जाऊ दिले नाही, तर त्यात महिलांचा अपमान होतो, असे आपल्याला वाटत नाही.’’ असे त्या म्हणाल्या.
[poll id=”1219″]
केवळ महिलेने दर्शन घेतले म्हणून शनिमंदिराचा चौथरा दुधाने धूवून शुद्ध करणे हे योग्य आहे का, असे विचारल्यावर मात्र त्या सावरल्या. मंदिर समितीने जे शुद्धीकरण केले आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही, असे सांगून त्या म्हणाल्या की, महिलांना शिक्षण घेऊ न देणे, घरात डांबून ठेवणे, चूल-मुल सांभाळ अशी बंधने घातली जात असतील तर त्याला आपला विरोध असेल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
महिला आणि बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे. त्यांना बौद्धिक, आर्थिक, आरोग्य, सामाजिक दृष्टय़ा सक्षम करणे हे या विभागाचे काम आहे. मात्र महिलांना मंदिरात प्रवेश नाकारून त्यांना दुय्यम स्थान देणे पंकजा मुंडे यांना गैर वाटत नसल्याबद्दल समाजातील सर्व स्थरावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.