व्यसनामुळे केवळ एका व्यक्तीचे नुकसान होत नाही, तर कुटुंब, समाज आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान होते. व्यसन हे साक्षर-निरक्षर, खेडी-शहरे असे सर्वव्यापी आहे, असे मत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे – व्यसनामुळे केवळ एका व्यक्तीचे नुकसान होत नाही, तर कुटुंब, समाज आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान होते. व्यसन हे साक्षर-निरक्षर, खेडी-शहरे असे सर्वव्यापी आहे, असे मत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंगळवारी व्यक्त केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले, यावेळी शंकरनारायणन बोलत होते. महात्मा गांधीजींच्या जयंती दिनानिमित्त व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आयोजित केले, हे कौतुकास्पद आहे. व्यसनमुक्ती धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याने आपल्याला अभिमान असल्याचे के. शंकरनारायणन यांनी सांगितले.
‘एक-दोन-तीन-चार.. व्यसनमुक्तीचा करू प्रचार’ अशा घोषणाच्या निनादात सकाळी शनिवारवाडा येथून व्यसनमुक्त प्रचार दिंडीला सुरुवात झाली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते ग्रंथ ठेवलेल्या पालखीचे पूजन करून ग्रंथदिंडीस सुरुवात झाली. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्रे डॉ. अनिल अवचट उपस्थित होते. या दिंडीत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, भारती विद्यापीठाचे समाज विज्ञान केंद्र, व्यसनमुक्त युवक संघ, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती सहभागी झाले होते.
नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा येथील झलसिंग पावरा यांच्या संघाचे आदिवासी कलाकारांचे पथक दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. दिंडीत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनी ‘व्यसनमुक्त समाज हाच खरा समाजसुधारक’, ‘व्यसनमुक्त जीवन, सुखी जीवन’, ‘गुटखा खाओ, गाल जलाओ’, अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक हाती धरले होते. वारकरी वेशातील शाळकरी विद्यार्थ्यांचे पथकही दिंडीत सहभागी झाले होते.
स्वागताध्यक्ष मोघे यांनी या साहित्य संमेलनाची भूमिका स्पष्ट करताना, पुणे हे सांस्कृतिक केंद्र आहे. पुण्यातूनच फुले-आगरकर-टिळकांनी आपले कार्य
देशभर विस्तारले. पुण्यात सुरुवात केली की त्याचा प्रसार सर्वदूर होतो, म्हणूनच व्यसनमुक्तीचे पहिले साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले. हे साहित्य संमेलन व्यसनी लोकांच्या मानसिक परिवर्तनासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मोघे यांनी व्यक्त केला. व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीमुळे अभ्यासक्रमातून व्यसनमुक्तीचे वगळलेले धडे पुन्हा समाविष्ट करून घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.