मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांतील अस्थिर आणि वरिष्ठ नेत्यांची शिकार ठरत असलेल्या नगरसेवकांनी दुस-या पक्षात जाण्याचा विचार केला आहे.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांतील अस्थिर आणि वरिष्ठ नेत्यांची शिकार ठरत असलेल्या नगरसेवकांनी दुस-या पक्षात जाण्याचा विचार केला आहे. त्यामुळे कधी एकदा वॉर्ड रचना होते अणि आरक्षण जाहीर होते यावरच सर्वाची नजर आहे. त्यामुळ वॉर्ड रचना व आरक्षण जाहीर होताच अनेक पक्षांतील फुटीरवाद्यांचा खरा चेहरा समोर येणार आहे.
मुंबई महापालिकेतील सत्तेवरून शिवसेनेला खाली खेचून आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने निवडून येणा-या आजी-माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याची रणनीती आखली आहे.
भाजपाकडून या सर्वाना तिकीट देण्याचे आश्वासन दिले जात असेल तर वॉर्डाचे आरक्षण बदलले तर काय, असा प्रश्न अनेकांपुढे आहे. त्यामुळे पक्षाच्या कामावर नाराज असूनही सध्या शांत बसून वॉर्ड आरक्षणानंतरच थेट निर्णय घेत पक्षांतर करायचे असा निर्धार गटबदलू नगरसेवक आणि पक्षांच्या पदाधिका-यांनी केलेला आहे.
निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून सूत्रे हललेली नाहीत. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांऐवजी २५२ प्रभाग करून संख्या वाढवण्याचा विचार होता. परंतु महापालिका सभागृहात एवढय़ा सदस्यांना बसवण्यास जागाच उपलब्ध नसल्यामुळे यावर यंदा तरी कोणताही निर्णय होणार नाही. त्याऐवजी वॉर्ड पुनर्रचित केले जाणार आहेत.
यामध्ये लोकसंख्येनुसार वॉर्डाची रचना केली जाणार आहे. या वॉर्ड पुनर्रचनेत शहरातील सहा वॉर्ड कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील चार आणि पूर्व उपनगरातील दोन अशा प्रकारे उपनगरात सहा वॉर्ड पुनर्रचनेत वाढतील, असा अंदाज आहे. मात्र जूनच्या पहिल्या आठवडय़ात वॉर्ड रचना अपेक्षित होती. पण राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना महापालिकेला अथवा नगरविकास खात्याला प्राप्त झालेल्या नाहीत.
प्रथम वॉर्ड रचना, त्यानंतर आरक्षण आणि यावर हरकती व सूचना जाणून घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून संगणकीय सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याद्वारे या प्रक्रियेला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात वॉर्ड रचना जाहीर होण्याची शक्यता असल्याचे समजते.
काँग्रेसचे ते २५ नगरसेवक किती प्रामाणिक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पक्षाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला. अवघे दहा ते बारा समर्थक नगरसेवक असताना सुमारे २५ नगरसेवक राजीनामा देत असल्याची आवई उठवली जात आहे.
परंतु कामत यांच्या समर्थकांपैकी बहुतांश नगरसेवक हे भाजपा, शिवसेनेच्या संपर्कात आहेत. हे सर्व नगरसेवक वॉर्ड आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपा, शिवसेनेत प्रवेश करून काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. त्यामुळे ‘बॉस’ची निष्ठा राखत राजीनाम्याची नौटंकी केली जात आहे.
या नौटंकीचा काहीच उपयोग नसून जे भविष्यात आपले नाही ते आजचे गेले तरी त्याचे दु:ख नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या गोटात चर्चा आहे. सध्या काँग्रेसचे केसरबेन पटेल आणि माजी नगरसेवक अण्णा मलई यांनी अनुक्रमे भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.