नळपाणी योजनेतून पाणी दिले जात असून ते अपुरे पडत असल्यामुळे वेंगुर्लेतील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या युवाशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विलास गावडे यांनी शहरात मोफत पाणीपुरवठा सुरु केल्याने अनेकांची तहान भागत आहे.
वेंगुर्ले शहरामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. नगरपालिकेकडून एक दिवस आड नळपाणी योजनेतून पाणी दिले जात असून ते अपुरे पडत असल्यामुळे वेंगुर्लेतील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या युवाशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विलास गावडे यांनी शहरात मोफत पाणीपुरवठा सुरु केल्याने अनेकांची तहान भागत आहे.
दरवर्षी पाणीटंचाईचा मुद्दा वाढत असून त्यावर कायम स्वरुपी उपाययोजना करण्याकडे न. प. कडून फारसे लक्ष दिले जात नाही. निकृष्ट कामामुळे कोसळलेला वेंगुर्ले येथील नारायण तलाव कोरडा आहे. तर निशाण तलावातील पाण्याची पातळीही गतवर्षीपेक्षा यावर्षी कमी कमी होत चालली आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून हे दोन्ही तलाव सुस्थितीत करण्याकडे न. प. ने लक्ष देणे काळाची गरज आहे.
नेमीच येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे वेंगुर्लेतील निषाण तलावाची उंची वाढविणे हे काम या वर्षीही न झाल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा साठा यावर्षी एवढाच होऊन पुढील वर्षीही वेंगुर्लेवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
वेंगुर्ले शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी निशाण तलावानंतर नारायण तलावावर पूरक नळपाणी योजना करून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपालिकेचा होता. मात्र गेली सहा-सात वर्षानंतरही नारायण तलावाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
वेंगुर्लेवासीयांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची काही प्रमाणात झळ सोसावी लागते. ती रोखण्यासाठीच नारायण तलावावर सुमारे १ कोटी १७ लाख रुपयांची पूरक नळयोजना आखली होती. परंतु शासनाकडून प्राप्त झालेला हा पैसा पाण्यासारखा कुठे जिरला हे कळलेच नाही. तलावाचे काम मात्र पूर्ण होऊ शकले नाही.
ते जर पैसे व्यवस्थित त्याच कामावर खर्च झाले असते तर आज पाणी टंचाईची वेळ आली नसती. जीवन प्राधिकरण विभागाकडून हे काम केले असून त्या निकृष्ट कामामुळे तीन-चार वेळा तलावाच्या भिंती कोसळल्या आहेत. परंतु त्यानंतर जीवन प्राधिकरणचे अधिकारी या तलावाकडे फिरकलेच नाहीत.
शहरातील सुमारे ९६७ नळपाणी ग्राहकांना नगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा निशाण तलावावरील पाणीपुरवठा योजनेवरुन केला जातो. परंतु यावर्षी भरपूर पाऊस मुबलक पडला नसल्याने पाणी साठले नाही.
परंतु दिवसेंदिवस पाण्याचा वाढता वापर लक्षात घेता व आज तलावातील पाण्याची घटती पातळी लक्षात घेता शहराला पाऊस पडेपर्यंत दोन दिवस आड पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला कसरत करावी लागणार आहे. कारण या तलावात पाण्याची कमतरता तर नारायण तलावातील कोरडेपणा या गोष्टी प्रकर्षाने समोर येऊन नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांच्या दृष्टीने जीवनावश्यक असलेला पाण्याचा प्रश्न यावर्षी गंभीररुप धारण करण्यापूर्वी पाणीटंचाईच्या नियोजनासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरु करणे गरजेचे होते. केवळ फेब्रुवारी महिन्यानंतर तलावातील पाण्याचा अंदाज घेऊन पाणी नळधारकांना एक दिवस आड, दोन दिवस आड सोडण्याचे नियोजन केले म्हणजे उपाययोजना होत नाही.
विद्यमान नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी निषाण तलावाच्या उंची वाढविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरु केले जाईल असे जाहीर केले होते. परंतु या कामाला मे महिना संपत आला तरी सुरुवात झालेली नाही.
यावर्षी जर या तलावाची उंची वाढविण्याचे काम झाले असते तर पावसाळ्यात मुबलक पाणी तलावात साठवता आले असते व पुढील वर्षी वेंगुर्लेवासीयांना पाण्याच्या टंचाईची समस्या भासली नसती. परंतु यावर्षीही हे उंची वाढविण्याचे काम सुरु न झाल्याने वेंगुर्ले वासीयांना पुढील वर्षीही मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे.
नगर परिषद शहरवासीयांना पिण्याचे पाणी पुरविण्यात असमर्थ असल्याचे लक्षात येताच लोकांच्या सोयीसाठी युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने शहरात चार टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरु केला आहे. या उपक्रमामुळे वेंगुर्लेवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे आत्तापासूनच लक्ष देणे काळाची गरज आहे.