होळी सुरू झाल्यापासून भिक्या, शित्या चौकेकर आणि दत्त्या मालपेकराला होळी चांगलीच गेली होती. होळीसाठी बांबरवाडीत मुंबईचे चाकरमानी आल्यामुळे होळीत गेले दोन-तीन दिवस त्या तिघांनाही स्वत:चा पैसा काढावा लागला नव्हता. शक्यतो स्वत:च्या खिशातील पैसा काढायचा नाही असं त्यांनी ठरवलं होतं. पण धुळवडीच्या दिवशी दुपार होत चालली तरी कोणीही चाकरमानी गळाला लागला नव्हता. एका-दोघांनी दहा-वीस रुपये दिले. पण ते किरकोळ पैसे तिघांच्या विडी, पान, गुटखासारख्या किरकोळ व्यसनासाठीच संपले.
पिंपळाच्या कट्टयावर बसून विचार करत असताना सूर्य वर चढत चालला होता. ऊन तापत चाललं होतं. आज धुळवड! शिमग्यातील मोठा सण! फु ल टाईट झाल्याशिवाय धुळवड साजरीच होऊ शकत नाही अशा या तिघांची श्रद्धा! विचार करत असतानाच बाबी नारकराचा मोठा पोरगा इश्वास आपल्या मित्राबरोबर कट्टयावर आला. हा विश्वास ऊर्फ इश्वास गेली सहा वष्रे मुंबईला राहात होता. गणपतीला आणि शिमग्याला तो आजवर न चुकता गावात येत असे. येताना भरपूर पैसा आणायचा आणि जाताना बापाकडून तिकिटाला पैसे घ्यायचा. दोन दिवसापूर्वीच होळीसाठी तो आपल्या एका मित्राला घेऊन गावात आला होता. अर्थात अजूनपर्यंत त्याचा खिसा गरम होता. मुंबईवरून आणलेली दारू संपली म्हणून कट्टयावर आल्या-आल्याच त्याने भिक्याला गाठलं आणि म्हणाला,
‘भिक्या, एक काम होतं रे!’
‘मेल्या, तुजा काम आमी नाय करायचा तर कोनी करायचा?’ भिक्या समझून गेला की, सावज स्वत:हून जाळयात मिळतंय.
‘बोल काय करू तुज्यासाठी?’
‘तुला तर माहीतच आहे की, मी रॉयल स्टॅगशिवाय दुसरं काही पित नाही.’
‘ता काय मेल्या माका म्हायती नाया? उंची लोग उंची पसंद! आमी आपले हातभट्टीवाले!’
‘अरे झालं काय की, मी एका माणसाला हाफ बॉटल आणण्यासाठी कणकवलीला पाठवलंय. पण तो येणार संध्याकाळी. आणि आता आम्हाला जेवणापूर्वी एक- एक पेग मारायचा आहे. तेव्हा तुझ्या माहितीने एक रॉयल स्टॅगची क्वार्टर मिळाली तर बघ.’ यावर भिक्या म्हणाला,
‘खरा सांगाचा तर इश्वासा, गावात गावठीशिवाय कायव मिळना नाय. डाक्टर म्हंजे एकदम फालतू झाली. त्येच्यामुळा..
‘हे बघ भिक्या, तू काहीही करून एक तरी क्वार्टर बघून दे. पैसे कितीही लागूदे. त्याची काळजी करू नको.’
‘ठीक हा. बाजूच्या गावात भारीतली दारू मिळतली. पन थंयसर तुजी रॉयल-बियल मिळाची नाय. आरशी चालतली?’
‘अरे मग आर. सी. तर आर. सी. आण. ती तर रॉयल स्टॅगपेक्षा भारी आहे.’
‘दोनशे चाळीस दी.’
‘दोनशे चाळीस? एवढे पैसे?’
‘अरे बाबा, आरशी क्वार्टर दोनशे चाळीसाकच मिळता. खरा सांगाचा तर मी जेच्याकडसून हाडतंय तो सोताक पिव्क आरशीच हाडता. पन मी तुज्यासाठी त्येच्यातली एक क्वाटर भरून हाडतंय.’ अगदी उपकार केल्यासारखा भिक्या बोलला. गरजवंताला अक्कल नसते हेच खरं! विश्वासाने शंभराच्या तीन नोटा भिक्याकडे दिल्या. यावर भिक्या म्हणाला,
‘उरलेले साठ रुपये आमका तिघांका शिमग्याचा पॉस म्हणान घेतव. चलतला ना?’
‘पण अध्र्या तासात नानू पोवाराच्या घरी ये. मी थम्स-अप घेऊन जातो.’
तिनशे रुपये घेऊन भिक्या, शित्या चौकेकर आणि दत्त्या मालपेकर डायरेक्ट मारुतीच्या अड्डयावर गेले. मारुतीकडून पिव्वरची गावठी क्वार्टर घेऊन आपल्याकडे असलेल्या आर. सी.च्या क्वार्टरमध्ये भिक्याने ती पाऊण क्वार्टर ओतली आणि बाकी थम्स-अप मिसळून बुच घट्ट लावून विश्वासाला देण्यासाठी ती क्वार्टर शित्याकडे पाठवून दिली.
‘अरे पन भिक्या, इश्वासाक संशय नाय ना येवचो?’ दत्त्याने शंका उपस्थित केली.
‘कसो येतलो? इश्वास काय ती रॉयल पिता. त्येका गावठीची पन चव म्हायती नाय आनी आरशीची पन नाय. शिवाय त्येच्यात तो थम्स-अप मिसळणारच हा. आता प्रश्न ऱ्हवलो तो म्हंजे क्वाटर सीलबंद नाया. पन तो प्रश्न मी अगोदरच सोडवलंय. खंब्यातना क्वाटर भरून हाडतय असा अगोदरच त्येका सांगितलंय. त्येच्यामुळा संशयाक कायच जागा नाया. तीस रुपयात इश्वास भागलो.
आता उरलेल्या दोनशे सत्तर रुपयात आपली धुळवड!’ असं म्हणून त्याने मारुतीला अगोदर एक खंब्याची ऑर्डर दिली. दरम्यान शित्या चौकेकरही विश्वासकडे वस्तू पोच करून अड्डयावर आला होता. रात्रीपर्यंत तिघांची जोरात धुळवड साजरी झाली. रोंबाट सुरू कधी झालं आणि कधी संपलं ते शेवटपर्यंत तिघांनाही कळलं नाही.