मागील दोन महिन्यांपासून अविरत बरसणा-या पावसाने शनिवार आणि रविवारी विश्रांती घेतली असली तरी, सोमवारपासून पुन्हा झोडपणे सुरू केले आहे.
भंडारा – मागील दोन महिन्यांपासून अविरत बरसणा-या पावसाने शनिवार आणि रविवारी विश्रांती घेतली असली तरी, सोमवारपासून पुन्हा झोडपणे सुरू केले आहे. दोन दिवस पाऊस पडला नसल्याने सुटकेचा नि:श्वास टाकत कामकाजाला लागलेल्या जिल्हावासीयांना पुन्हा धो.. धो पावसाचा सामना करावा लागला. तसेच तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावी वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला.
मागच्या दोन महिन्यापासून उसंत न घेता कोसळणा-या पावसाने जिल्ह्यात कमालीचे नुकसान केले आहे. हजारो हेक्टर शेतीची हानी झाली. पावसामुळे दोन हजाराच्या वर घरे कोसळली तर सहा जणांना प्राणाला मुकावे लागले. दरम्यान, शनिवार आणि रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच, सोमवारपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारच्या दुपारपासून कोसळणा-या पावसाने भंडारा शहरासह अनेक भागात प्रचंड नुकसान झाले आहे. भंडारा शहराच्या खात रोडवरील वैशालीनगर, रुख्मिनी नगर, शिवनगरी, म्हाडा वसाहत, शक्तीनगर, किसन नगर तसेच म्हाडा कॉलनीमागच्या हनुमाननगर, समतानगर अशा अनेक वसाहतींना पावसाचा प्रचंड फटका बसला़ या वसाहतींमधील सुमारे दीडशे घरांमध्ये पावसाचे पाणी घुसून मोठय़ा प्रमाणात हानी झाली़ शेकडो नागरिकांनी खात रोडवरील दुभाजकावर आश्रय घेतला़ वैशालीनगरच्या प्रवेशद्वारापासून ते शिवनगरीपर्यंत चार फुट पाणी साचले होत़े पावसाचे पाणी सुमारे दीडशे घरात शिरून धान्य, कपडेलत्ते व साहित्याची प्रचंड नुकसान झाले अनेकांच्या घरात समोरचा पोर्च व हॉलमध्ये तीन फुटापर्यंत पाणी घुसल़े विहिरीवरील मोटारपंपच्या सहाय्याने नागरिक घरातील पाणी काढत होत़े. या मार्गावरील वाहतूक सायंकाळी सात नंतर पूर्णत: बंद पडली होती़. मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ़ माधवी खोडे व अन्य अधिका-यानी वसाहतींना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली़ पावसाने शहरातील तकीया वॉर्ड, टप्पा मोहल्ला, आंबेडकर वॉर्ड व इतर काही भागांतही मोठे नुकसान झाले.
सोमवारपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे तुमसर तालुक्यात २४ गावे प्रभावित झाली असून, ४०० हेक्टर शेतीचे नुकसान झाले. तर ९४८ घरांची पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कोष्टी, बोरी, उमरवाडा, रेंगेपार या गावांतील शेतपिकांची मोठी हानी झाली. २७ घरांसह दोन गोठे पडले असून, अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. पवनी, लाखांदूर व अन्य तालुक्यातही पावसाने अत्याधिक नुकसान केले असून, अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत.
विक्रमी १६५ मिमी पाऊस
सोमवारी भंडारा तालुक्यात १६५.६ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. या वर्षीच्या पावसाळ्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे. एक जून ते सहा ऑगस्ट या सुमारे सव्वादोन महिन्याच्या कालावधीत पावसाने भंडारा जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२३५.९ मिमीच्या सरासरीने ८६५१.२ मिमी पाऊस पडला. भंडाराखालोखाल लाखनी तालुक्यात ११६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक १५०२.२ मिमी पाऊस लाखांदूर तालुक्यात कोसळला आहे.
वीज पडून दोन महिलांचा मृत्यू
तुमसर तालुक्यातील चुल्हाडा या गावात शेतात काम करणा-या दोन महिलांचा वीज पडून मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. या महिलांची अद्याप ओळख पटलेली नाही.