विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन निवडणुकीबाबतची अधिसूचनाही प्रसिद्ध झाली.
राजापूर – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन निवडणुकीबाबतची अधिसूचनाही प्रसिद्ध झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीखही जवळ येऊ लागली असताना अद्याप आघाडी आणि युतीबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या शहरांतील संपर्क कार्यालयांत मात्र सामसूम दिसून येत आहे.
प्रशासकीय कामकाजाची लगीनघाई निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालय आणि राजापूर तहसीलदार कार्यालयात सध्या सुरू असून, सोमवापर्यंत १३ इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करून ४१ नामनिर्देशन पत्रे नेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काहींनी आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठवून आपल्या नावे अर्ज स्वीकारले आहेत. आघाडी आणि युतीबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच शिवसेना भाजपमधील इच्छुकांसह काँग्रेस-राष्ट्रवादीतील इच्छुकांनीही नामनिर्देश पत्रे नेल्याने आता नक्की कोण कोण उमेदवारी अर्ज भरणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली व २० सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात निवडणुकीची अधिसूचनाही प्रसिद्ध झाली. तेव्हापासूनच उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रत्यक्षात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत मात्र शुकशुकाट आहे. शिवसेना-भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील जनसंपर्क कार्यालयांत गेले काही दिवस सामसूम आहे. आघाडी होणार का? युती होणार का? असे सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीबाबतही सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्यातच हा आघाडी आणि युतीचा निर्णय लांबणीवर पडत असल्याने प्रचारात काहीशी शिथिलता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठीचे मुदतीचे तीन दिवस उलटले मात्र गेल्या तीन दिवसांत राजापूर लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातून एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. सोमवारी सायंकाळपर्यंत १३ उमेदवारांनी आपली नाव नोंदणी करत ४१ नामनिर्देशन पत्रे घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सोमवारी एकाच दिवशी तब्बल २१ अर्ज वितरीत झाले आहेत.
यात शिवसेना-भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांचा समावेश असून, काहींनी अपक्ष लढण्यासाठी अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर असून, सध्या पितृपक्ष सुरू असल्याने उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले नसल्याचे समजते. त्यामुळे २५ ते २७ या तीन दिवसांच्या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे. आघाडी आणि युतीबाबत संभ्रम असतानाच व या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याने भविष्यात आघाडी आणि युती झाली व झाली नाही तर कोण कोण रिंगणात उतरणात याबाबतही जनतेला उत्सुकता आहे.