राज्यात झालेली अतिवृष्टी, महिला अत्याचाराच्या घटना, दरोडय़ाचे वाढलेले गुन्हे, वीजटंचाई असे स्फोटक विषय विरोधकांकडे असताना त्याबाबत सभागृहात चर्चा करण्याऐवजी शिवसेना-भाजपचे आमदार राजकारण करण्यात गुंतलेले आहेत
राज्यात झालेली अतिवृष्टी, महिला अत्याचाराच्या घटना, दरोडय़ाचे वाढलेले गुन्हे, वीजटंचाई असे स्फोटक विषय विरोधकांकडे असताना त्याबाबत सभागृहात चर्चा करण्याऐवजी शिवसेना-भाजपचे आमदार राजकारण करण्यात गुंतलेले आहेत. विदर्भात अधिवेशन होत असताना स्थानिक प्रश्नांना महत्त्व देणे आवश्यक होते. मात्र विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघावर नेमलेल्या प्रशासकाला देण्यात आलेल्या मुदतवाढीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दोन दिवस सभागृहातील वातावरण तापत ठेवले. तीन कोटी रुपये दूध उत्पादक संघाच्या कर्मचा-यांच्या पगारासाठी दिलेले असताना त्यालाच भ्रष्टाचार म्हणून सभागृहात गोंधळ घालण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील तीन कोटींच्या एका प्रकरणासाठी सभागृहाचे अडीच दिवस वाया गेले. मुळातच नागपूर येथे होणारे अधिवेशन दोन आठवडय़ाचे. म्हणजे कामकाजाचे दिवस एकूण दहाच. पहिल्या दिवशी नेल्सन मंडेला व इतर नेत्यांना श्रद्धांजली वाहून सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले. विदर्भातील चर्चेसाठी सभागृहाचे कामकाज एक दिवस बंद पाडण्यात आले. त्यामुळे पहिल्या आठवडयातील दोन दिवस वाया गेले. तर दुस-या आठवडय़ात जळगाव दूध संघाच्या किरकोळ विषयावर विरोधकांनी अत्यंत महत्त्वाचे असणारे अडीच दिवस वाया घालवले. राज्याच्या हिताच्या दृष्टीने विविध खात्याच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येक सदस्याला आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या कामांना या चर्चेच्या निमित्ताने निधीची मागणी करता येते. काही कामे सुचविता येतात. मात्र पुरवणी मागण्याच्या चर्चेच्या दोन्ही दिवशी विरोधकांनी गोंधळ घातल्याने ही चर्चेविनाच पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी विरोधी पक्षांचे सदस्य कसे लोकांच्या प्रश्नांवर उदासीन असून केवळ राजकारण करण्यात गुंतले आहेत, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. दहा दिवसांच्या अधिवेशनातील महत्त्वाचे दिवस असे वाया जाणे किती चुकीचे आहे, हे राणे यांनी मंगळवारीच ठणकावून सांगितले. म्हणूनच की काय आज विरोधकांत फूट पडल्याचे चित्र होते.
विरोधी पक्षांबरोबर असलेल्या मनसे आमदारांनी त्यांच्यापासून फारकत घेतली. किरकोळ प्रश्नावर सभागृह बंद पाडण्यापेक्षा जनहिताच्या प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवले जावेत, अशी मागणी मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केली. जळगाव दूध संघावरून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे पुरते उघडे पडल्यानंतर बुधवारीही आपली अब्रू वाचवण्यासाठी व आक्रमकता दाखवण्यासाठी सभागृह बंद पाडण्याच्या पवित्र्यात होते. मात्र मनसे आमदारांनीच विरोधी पक्षनेत्यांविरोधात विधान भवनाच्या दारात घोषणाबाजी केली. इतकेचं नव्हे तर सभागृहातही मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी विरोधकांना धारेवर धरले. विदर्भ-मराठवाडयातील जनतेचे प्रश्न सुटावेत म्हणून नागपूर येथे अधिवेशन घेतले जाते. खरे तर हे अधिवेशन किमान एका महिन्याचे असण्याची आवश्यकता आहे. मात्र ते दोन आठवडय़ात उरकण्यात येते. या दोन आठवडय़ातील प्रत्येक क्षण तरी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वापरला गेला पाहिजे. मात्र विरोधी पक्षांचे लोक गोंधळ घालून सभागृह बंद पाडून वेळ वाया घालवत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नांदगावकर यांनी मांडलेली वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. म्हणूनच त्यांनी नांदगावकर यांना उत्तर देताना बोचरी टीका केली. यापुढचे सर्व निर्णय मी आता नांदगावकर यांना विचारूनच घेईल, असे ते उपाहासाने म्हणाले.
एकंदर विरोधकांत फूट पडल्याचे चित्र बुधवारी सभागृहात पाहायला मिळाले. खरे तर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याबाबत अशी भूमिका घेण्याची मनसे आमदारांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे अधिवेशनापूर्वी अनेक प्रकरणे मांडणार असे जाहीर करतात व प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाशी सेटलमेंट करून ते सभागृहात येऊच देत नाहीत, असा आरोप करत मनसेने यापूर्वी एकदा खडसे यांना आपले लक्ष्य केले होते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे पुन्हा विरोधी पक्षांसोबत बसत होता. बुधवारी पुन्हा त्यांच्यात उभी फूट पडल्याचे दिसून आले. ही फूट किती दिवस राहते तेच आता पाहायचे.