चला, एक फार छान झाले. जे जे संघाचे विरोधक असतील, त्या त्या सर्वांना मारून टाकायचा एक कार्यक्रम संघाच्या आणि भाजपाच्या नेत्यांनी जाहीर करून टाकला.
तो माणूस कट्टर संघवाला आहे. इंदूर येथे बोलताना त्याने जाहीरपणे सांगून टाकले की, ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे आणि भाजपाचाही आहे.’ अर्थात जो संघाचा आहे तो पूर्वीचा जसा जनसंघाचा आहे, तसा आता प्रत्येक जण भाजपाचा आहे. हे ओघानेच आले. भाजपामधील जे मूळ संघवाले आहेत, त्यांची पक्षात मोठी बडदास्त आहे. भाजपाला सत्ता मिळाल्यामुळे सत्तेच्या गुळाभोवती मुंगळे जमतात, तसे भाजपा सत्तेवर येताच इतर पक्षांतून जमा झालेले जेवढे मुंगळे आहेत ते उपरे आहेत. त्यांना भाजपामध्ये भाव नाही. संघाच्या आता ते ओळखीचेच नाहीत. जो संघशाखेत जातो त्याला ओळखणारे जेवढे आहेत तसे उप-यांना ओळखणारे नाहीत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अनेक पक्षांतल्या आजी-माजी आमदारांनी आणि अन्य कार्यकर्त्यांनी पटापट उडय़ा मारून भाजपामध्ये जागा पकडण्याचा प्रयत्न केला. संगीत खुर्ची सुरू झाली आणि जे मूळचे संघवाले, भाजपावाले आहेत ते खुर्चीजवळ आले की, संगीत थांबायचे. त्यामुळे संघवाल्या, भाजपावाल्यांना खुर्च्या मिळाल्या. काँग्रेसमधून गेलेले २७ आणि राष्ट्रवादीतून गेलेले ३७ असे दोन्ही मिळून ५४ रांगेत लटकत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळायला चार चार दिवस लागतात. कारण उपरा आणि घरचा असा भाजपामध्ये फरक आहे. बहुमत नसल्यामुळे थोडी किंमत उप-यांना आहे एवढेच. एकदा बहुमत झाले की, मग उपरे ‘चले जाओ.’
अशा या कट्टर भाजपावाल्यांनी आणि मूळच्या संघवाल्यांनी आता जाहीर करून टाकले आहे की, आमच्याविरुद्ध बोलाल तर खबरदार. ताबडतोब तुमचा शिरच्छेद करू. आता जेवढे भाजपाविरोधात बोलतील, संघाविरोधात बोलतील, ते सगळे मुख्यमंत्री नसल्यामुळे एक कोटी रुपयांचे बक्षीस काही मिळायचे नाही. विरोधातील मुख्यमंत्र्यांना मारून टाकले तर त्याचे शीर घेऊन भाजपाच्या कचेरीत ते आणून ठेवा आणि एक कोटी घेऊन जा. अशी अगदी सरळ साधी ऑफर आहे. किती राज्यांचे मुख्यमंत्री बिगर भाजपाचे आहेत. केरळचा आहे, तामिळनाडूचा आहे, तेलंगणाचा आहे, आंध्रचा आहे, बिहारचा आहे. उत्तर प्रदेशचाही आज विरोधी पक्षातीलच आहे, बंगाल आहे, ओरिसा आहे. दिल्ली आहे, अशा ज्या ज्या राज्यात बिगर भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, त्या सर्वांचा शिरच्छेद करून त्यांची मुंडकी भाजपाच्या कार्यालयात आणून द्या आणि एक कोटी रुपये घेऊन जा. अगदी सोपी ऑफर आहे. बाकी संघवाल्यांच्या आणि भाजपाविरोधातील कोणाबद्दल काही बोललात तर तुमचा मुडदा पडू शकेल. तुम्हाला राष्ट्रद्रोही ठरवले जाऊ शकेल. पण त्यावर बक्षीस नाही. सध्यातरी फक्त मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटींचे बक्षीस आहे.
तर संघाचा एक कार्यकर्ता म्हणतो, ‘माझी प्रॉपर्टी विकून मी एक कोटी रुपये उभे करीन आणि ती रक्कम शिरच्छेद करणा-याला देईन.’ आता हा जो कोणी धमकावणारा आहे. त्याची प्रॉपर्टी विकल्यानंतर पैसे मिळणार आहेत. म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजय यांचा शिरच्छेद करून आणल्यानंतर लगेच पैसे मिळतील का? लगेच पैसे मिळणार नाहीत. तेव्हा ही जी खुली ऑफर दिली आहे, ती थोडीशी उधारीवरच आहे. प्रॉपर्टी विकली गेली तर एक कोटी मिळणार आहेत. विकली गेली नाही तर अंगठा. बरं.. एखाद्या ‘अ’ व्यक्तीला मारायला गेल्यानंतर.. समजा पैशासाठी एखाद्याने मारले तर त्याचे पैसे देणार कोण? त्याची हमी पाहिजे. रोजगार हमीचे काम ठरवताना पहिले काम मागेल, त्याला काम असे होते. यशवंतराव मोहितेंच्या आग्रहाने हमी शब्द आला. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात पुढाकार घेऊन पैशाची हमी दिली पाहिजे. जे कोणी मागायला पुढे येतील ते पैशासाठीच पुढे येणार. मग त्या पैशाची हमी कोण देणार? बँकांमधून कर्ज घेताना काही वेळा कर्जदाराची पत नसते किंवा एखाद्या संस्थेची पत नसते. मग अशा संस्थेला किंवा व्यक्तीला सरकार हमी राहते. त्यावेळी तो पैसा बुडणार नाही, अशी खात्री असते. आता संघवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे बिगरभाजपा मुख्यमंत्र्यांना मारायचे ठरवले तर प्रत्येकी एक कोटी रुपयांप्रमाणे पैसे मिळण्याची हमी कोण घेणार आहे? राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येक सभेत असे म्हणत होते की, ‘मी शब्द देतोय..’ म्हणजे मी हमी देतोय, असाच त्याचा अर्थ. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून सातत्याने हमी शब्द मिळत गेला. त्यामुळे संघवाले आणि भाजपावाले या सगळय़ांना खात्री पटली की, आता आपण विरोधकाला मारले तर बक्षिसाची काही अडचण नाही. तेवढय़ा बक्षिसाची हमी कोणीतरी घेईल. आता हिशेब असा सुरू झाला आहे की, किती जणांना मारायचे त्याची पहिली यादी काढा.. संघ आणि भाजपाचे विरोधक देशात खूप आहेत. जरी मोदींना मते टाकली असली तरी सगळेच काही भाजपावाले नाहीत. मग प्रत्येक जिल्हावारी याद्या काढून जे जे भाजपाचे आणि संघाचे विरोधक आहेत त्यांचा ‘गेम’ करण्याकरिता यादी बनवण्याचे काम सुरू झालेले आहे. भाजपाच्या कार्यालयातून अशा याद्या आता बनतील. मग एवढय़ा लोकांना मारण्यासाठी घाऊक ठेकेदार बघितला जाईल. आणि शिरच्छेदाला सुरुवात होईल. काय मस्त कल्पना आहे.. जे विरोधक आहेत त्यांना मारून टाकणे. त्यांना मारा आणि एक कोटी रुपये मिळवा.. वा.. रे वा.. शाब्बास.. विरोधक संपले की, राज्य करायला आपण मोकळे. काय भाजपावाल्यांची आयडिया मस्त आहे की नाही?