भारत सर्वबाद २७४; इंग्लंडची मजल २८७ धावांची
बर्मिगहॅम – डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम कुरॅनसमोर भारताच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मात्र कर्णधार विराट कोहलीने (१४९) दणकेबाज शतक ठोकले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने दुस-या दिवशी सर्वबाद २७४ धावा केल्या. पाहुण्या कर्णधाराचे हे कसोटीतील २२वे शतक आहे. इंग्लंडने पहिल्या डावात २८७ धावा केल्या आहेत.
कोहलीने २२वे शतक झळकावताना इंग्लंड दौ-याची आश्वासक सुरुवात केली. त्याने २२५ चेंडूंत १४९ धावा केल्या . त्याच्या संयमी आणि जबाबदारीपूर्वक खेळीमध्ये २२ चौकारांसह १ षटकार समावेश आहे. विराटने जवळपास अडीच सत्रे मैदानावर थांबताना इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला केला.
तत्पूर्वी, मुरली विजय (२० धावा) आणि शिखर धवन (२६ धावा) यांनी अर्धशतकी सलामी देत भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर पाहुण्यांचा डाव गडगडला. कुरॅन याने एकाच षटकात मुरली विजय आणि लोकेश राहुलला बाद केले. चेतेश्वर पुजाराच्या जागी संघात स्थान मिळालेल्या राहुलला (४) जेमतेम खाते खोलता आले. ३ बाद ५९ धावा अशा बिकट अवस्थेतील भारताला कर्णधार विराट कोहलीने सावरले.
विराटने अजिंक्य रहाणेसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावा जोडताना भारताचे धावांचे ‘शतक’ पूर्ण केले. मात्र कोहली याला अन्य सहका-यांची साथ मिळाली नाही. उपकर्णधार अजिंक्यला १५ धावा करता आल्या. यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा खातेही उघडू शकला नाही. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने (२२ धावा) थोडा प्रतिकार केला तरी आर. अश्विन (२२ धावा) आणि मोहम्मद शमी (२ धावा) लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था आणखी वाईट झाली.
इंग्लंडचा पहिला डाव ९ बाद २८५ धावांवरून २८७ धावांमध्ये संपला. यजमानांच्या शेवटच्या जोडीने आणखी केवळ २ धावांची भर घातली. भारतातर्फे ऑफस्पिनर आर. अश्विन (६२-४) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (६४-३) सुरेख साथ लाभली. उमेश यादव आणि इशांत शर्मा या तेज जोडगोळीने प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडतर्फे कर्णधार ज्यो रूट याने सर्वाधिक ८० धावा केल्या. त्याच्यानंतर सर्वाधिक योगदान अष्टपैलू जॉनी बेअस्टरे (७० धावा) याचे आहे. सलामीवीर कीटन जेनिंग्ज याने ४२ धावा केल्यात.