सरकारची निष्क्रियता लोकासमोर मांडण्याकरता ‘महाराष्ट्र समिती’ या सामाजिक संघटनेतर्फे शुक्रवारी आझाद मैदानात दाभोलकर-पानसरेच्या मारेक-यांना नागरिकांतर्फे लिहिण्यात आलेल्या विनंतीपत्राचे जाहीर वाचन करण्यात आले.
मुंबई- डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना महाराष्ट्र सरकार अजूनही पकडू शकलेले नाही. सरकारची ही निष्क्रियता लोकासमोर मांडण्याकरता ‘महाराष्ट्र समिती’ या सामाजिक संघटनेतर्फे शुक्रवारी आझाद मैदानात दाभोलकर-पानसरेच्या मारेक-यांना नागरिकांतर्फे लिहिण्यात आलेल्या विनंतीपत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. या पत्रात सरकार आणि गृहमंत्रालयाला दाभोलकर आणि पानसरेच्या मारेक-यांना पकडण्यात आलेल्या अपयशाबद्दल ताशेरे ओढण्यात आले आहेत.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून होऊन जवळपास १८ महिने झाले, मात्र अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात सरकारला यश आलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचादेखील कोल्हापुरात खून झाला. या खुनासंदर्भातही कोणाला अटक झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सरकारची निष्क्रियता आणि सामान्य जनतेच्या मनात असलेली हतबलता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र समितीचे संस्थापक सदस्य गिरीश ढोके, पूर्यकांत घारकर, अमित जठार, सिद्धी ढोके, शिल्पा जाधव, सतीश बेलोसे, राजू चवले, राजू जोशी, विनायक मुणगेकर आदी कार्यकर्त्यांनी हे पत्रवाचन केले.