राज्यात लवकरच होणा-या विधान परिषदेच्या आठ जागांच्या निवडणुकीत भाजपाला बिहारप्रमाणेच धूळ चारण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत.
मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, जनता दल आणि जनता दल युनायटेड या महाआघाडीला मोठे यश मिळाल्याचे पडसाद राज्यात उमटले असून; राज्यात लवकरच होणा-या विधान परिषदेच्या आठ जागांच्या निवडणुकीत भाजपाला बिहारप्रमाणेच धूळ चारण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी यासाठीचे संकेत दिले. यासाठी जानेवारी महिन्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होणा-या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत प्राथमिक चर्चा झाली असल्याचेही पवार यांनी सांगितले.
बिहारच्या निवडणुकांतील परिणामांवर समीक्षा करण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. केंद्रातील मोदी सरकारची प्रतिमा आणि लोकप्रियता वेगाने घटली असून; त्यांना बिहारच्या जनतेनेही नाकारले. या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत सोमवारी राष्ट्रवादी नेत्यांच्या झालेल्या बैठकीत पवार यांनी व्यक्त केले.
पुढील वर्षात राज्य विधान परिषदेच्या ३० सदस्यांचा कार्यकाळ संपत असून; त्यातील ८ जागांसाठी जानेवारी २०१६ मध्ये निवडणुका होणार आहेत. या रिक्त जागांपैकी सर्वाधिक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपाच्या नेतृत्वात असलेल्या सरकारचा मुकाबला करण्यासाठी राज्यात काँग्रेससह समान विचारधारा असलेले पक्ष एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यासाठी जानेवारी महिन्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होणा-या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. पुढील वर्षात विधान परिषदेच्या ३० जागांवरही निवडणुका होणार असून; काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढलो तर सर्वाधिक जागांवर विजय मिळवता येईल.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विधिमंडळाच्या नागपूर येथे पुढील महिन्यात होणा-या हिवाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांसह काँग्रेसनेही एकत्र येऊन एक रणनीती तयार करावी, अशी सूचना पक्षप्रमुख शरद पवार यांनी केली असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.
या वेळी पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करताना पवार यांनी देशात मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले असून; याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन विरोधकाची भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे सांगितले.
जानेवारीत या जागांवर होणार निवडणूक
येत्या १ जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून आलेले आठ सदस्य निवृत्त होणार असून यात काँग्रेसचे चार, राष्ट्रवादीचा एक, शिवसेनेच्या दोन आणि एक अपक्ष सदस्य आहेत. यात मुंबईतून निवडून गेलेले काँग्रेसचे भाई जगताप, सेनेच रामदास कदम, धुळे-नंदुरबारमधून निवडून गेलेले काँग्रेसचे अमरीश पटेल, कोल्हापूरहून निवडून गेलेले महादेव महाडिक, नागपूरमधून निवडून गेलेले राजेंद्र मुळूक, सोलापूरमधून निवडून गेलेले राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे, अकोला-वाशिममधून निवडून आलेले सेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि अहमदनगरमधून निवडून आलेले अपक्ष उमेदवार अरुण जगताप यांचा निवृत्त होणा-यांमध्ये समावेश आहे.