29 ऑगस्ट हा हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय मुंबई युनिव्हर्सिटीचा वार्षिक क्रीडा महोत्सव मुंबईतल्या ठाकूर कॉलेज(कांदिवली), वालिया कॉलेज(अंधेरी), मुंबई विद्यापीठ स्पोर्ट्स पॅवेलियन(मरिन ड्राइव्ह) या कॉलेजेसमध्ये ही नुकताच सुरू झालाय. खेळाडू म्हणून करिअर करणा-यांसाठी हा महोत्सव म्हणजे आपल्या कारकीर्दीची पहिली पायरी असते. कारण याच खेळातून पुढे जाऊन खेळाडूंना जागतिक स्तरावर खेळण्याची संधी मिळते. राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धामधील घडामोडींचा आढावा
ऑलिंपिकवारीत भारताला हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पदकं मिळाल्यावर ज्या खेळांची कधी गणनाच केली जात नव्हती त्यांचं महत्त्व आता आपल्याला पटू लागलंय. लहानपणापासूनच मूल बॅट-बॉल घेऊन क्रिकेटर होण्यासाठी धडपडतात. अशा वेळी कुस्ती, मल्लखांब, खो खो, बॅडमिंटन अशा खेळांची फक्त तोंडओळख देऊन भागत नाही. त्यासाठीचा पाठिंबा, प्रोत्साहन शालेय जीवनापासून मिळणं गरजेचं आहे. चीनसारख्या देशात किशोरवयातच मुलांना मारून धोपटून त्यांची शारीरिक-मानसिक तयारी करून घेतली जाते. ऑलिंपिकमधल्या यशाचं हेच कारण ते मानतात. मारहाण, प्रेशराइज करण्याचा भाग वगळला तरीही खेळाची मैदानं उपलब्ध करून चांगले प्रशिक्षक किंवा प्रशिक्षण देऊन भारतीय खेळाचा दर्जा आपण उंचावू शकतो.
महाराष्ट्राच्या मातीतले खेळ
मुंबई विद्यापीठाच्या सांघिक खेळामधील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे कबड्डी. हा खेळ खेळणा-या तरुण वर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एशियन्स गेम्समध्ये गेल्या वर्षीपासून कबड्डीचा समावेश झालाय. त्यामुळे नॉन महाराष्ट्रीय कॉलेजियन्सनेही कबड्डीला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. महाविद्यालयीन वर्तुळात सध्या कीर्ती आणि एम.डी या दोन महाविद्यालयांचा दबदबा आहे. अनेक महाविद्यालय या खेळाकडे वळू लागल्यामुळे आता कबड्डीच्या मैदानात चुरशीची स्पर्धा रंगणार एवढं नक्की. महाराष्ट्राच्या मातीमधल्या खो-खो खेळालाही सध्या सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेत खेळाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या स्पर्धेमधून या सांघिक खेळात अनेक अष्टपैलू खेळाडू आपली वैयक्तिक चुणूक दाखवतील.
मुख्य म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या खो-खो संघाने आपला दबदबा कायम राखलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांपेक्षा मुलींचा अधिक सहभाग दिसतो. मल्लखांब हा आपला पूर्वापार चालत आलेला खेळ. तरीही आपल्यातल्या अनेक कॉलेजिअन्सना याची केवळ तोंडओळखच आहे. शारीरिक क्षमतेच्या कस लागणा-या या मातीतल्या खेळाला मुंबई विद्यापीठानेही आपल्या क्रीडा महोत्सवात स्थान दिलंय. या खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा हाच त्यामागचा उद्देश आहे. यात किती कॉलेजिअन्स सहभागी होतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मल्लखांब या खेळामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना पुढे जाऊन जिमनॅस्टिक खेळात चमकण्याची संधी मिळते.
लंडन ऑलिंपिकमधील भारतीय कुस्ती खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरचीच कुस्ती पाहायला मिळते. मात्र विद्यापीठाच्या खेळांमध्ये मॅट आणि मातीतली कुस्तीही पाहायला मिळते. हे वैशिष्टय म्हणावं लागेल. तरीही कुस्ती खेळाडूंसाठी मॅट आणि माती उपलब्ध करून देणारी कॉलेजही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. कबड्डी, खो-खो, मल्लखांब, कुस्ती या महाराष्ट्रीय खेळांना विद्यापीठाच्या स्पर्धेत नेहमीच भरघोस प्रतिसाद मिळतो.
क्रेझ मार्शल आर्ट्सची
तरुणांमध्ये मार्शल आर्ट्सची जबरदस्त क्रेझ आहे. स्वसंरक्षणाकरता का होईना आजकाल प्रत्येक जण यातला एक तरी प्रकार शिकण्याचा प्रयत्न करतोय. विद्यापीठाच्या स्पर्धेत किक-बॉक्सिंग, तायक्वांदो, ज्युडो या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. काही वर्षापूर्वी कराटेचा यात सहभाग होता. मात्र काही अडचणींमुळे कराटेला या स्पर्धामधून बाहेरची वाट दाखवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळांमधला भारताचा प्रेझेन्स नगण्यच आहे. परंतु महाविद्यालयातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने हा खेळ शिकतात. त्यामुळे विद्यापीठांमध्ये या खेळांच्या स्पर्धाना तोबा गर्दी झालेली दिसून येते. बहुधा विद्यापीठांनी अशा खेळांना पाठिंबा दिल्यामुळेच भविष्यात आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकू.
विद्यापीठ स्पर्धामधून कराटेला बाहेर राहावं लागलं ही दु:खाची गोष्ट आहे. युनिव्हर्सिटी लेव्हलला मार्शल आर्ट्स खेळण्यासाठी कॉलेजमधील अनेक मुलं उत्साहित असतात. बहुतेक तरुण हे स्वसंरक्षण किंवा फिटनेससाठी आज मार्शल आर्ट्सला अधिक पसंती देत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत गेली तर या खेळांचा पाया आपल्याकडे भक्कम होईल.’’
संदीप गाडे (मार्शल आर्ट्स प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय खेळाडू)
मुलींचा सहभाग
नेहमी अभ्यासात आणि लायब्ररीमध्ये रमणा-या मुली खेळाच्या मैदानावरही आपलं कौशल्य दाखवू लागल्या आहेत. याचा प्रत्यय आपल्याला विद्यापीठाच्या स्पर्धा पाहताना येतो. क्रिकेट, बॉक्सिंग, बॅडमिंटन, अॅथलेटिक्समध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचाच सहभाग जास्त दिसून येतो. सायना नेहवाल, मेरी कोम यांच्या ऑलिंपिक यशानंतर यांनाच आदर्श मानून विद्यापीठात खेळणाऱ्या मुली थेट ऑलिंपिकची स्वप्नं पाहू लागल्या आहेत.
विद्यापीठाच्या खेळांमध्ये मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. रोजगाराची संधी मुलांच्या तुलनेत मुलींकडे कमी आहे. त्यात वाढ झाल्यास घरातूनही मुलींना चांगला पाठिंबा मिळेल. त्यामुळे कबड्डीकडे फक्त खेळ म्हणून न बघता करिअर म्हणून पाहिलं जाईल.’’
सुवर्णा बारटक्के (कबड्डी विश्वचषक विजेत्या संघाची सदस्या)
मॅनेजमेंटचा खेळखंडोबा
विद्यापीठ क्रीडा महोत्सवात प्रत्येक खेळाची स्पर्धा वेगवेगळ्या महाविद्यालयांत आयोजित होते. मात्र या ठिकाणांबद्दल किंवा स्पर्धेच्या तारखांबाबत सॉलिड अपटुडेट राहावं लागतं बरं का! कारण स्पर्धा दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही त्या स्पर्धेचे ठिकाण, तारखा बदललेल्यांची अनेक प्रकरणं गेल्या काही वर्षापासून सातत्याने घडतायेत. यामुळे आपल्या खिलाडू दोस्तांची मेहनत वाया जाण्याचा धोका असतो. या समस्येवर विद्यापीठानं वेळीच तोडगा काढायला हवा. मात्र या स्पर्धामध्ये कुठलीही गोष्ट वेळेवर सुरू होईल तर शप्पथ, खरं तर आपली स्पर्धा कुठे आणि किती वाजता सुरू होणार आहे याची प्रत्येक खेळाडूला स्पर्धेच्या काही दिवस आधी इत्यंभूत माहिती मिळायलाच हवी. पण तसं कधीही होत नाही. अनेक स्पर्धामध्ये गट ठरवण्यासाठी आवश्यक असणा-या वजन, उंची, शारीरिक पात्रता यांची चाचणी स्पर्धेच्याच दिवशी सकाळी सुरू होते. त्यामुळे प्रत्येक सहभागी खेळाडूला सकाळी ठरलेल्या ठिकाणी हजर राहावं लागतं. त्यातल्या कित्येक स्पर्धा संध्याकाळी भरवल्या जातात. तोपर्यंत बिचारे ‘मेरा नंबर कब आयेगा’ म्हणत बसून राहतात. काही वेळा तर संपूर्ण दिवस बसून काढल्यावर आपली मॅच दुस-या दिवशी ढकलण्यात आल्याचं सांगितलं जातं.
या स्पर्धामधला सर्वात कंटाळवाणा प्रकार म्हणजे सहभागी स्पर्धकांची यादी. तुम्ही वेळेवर फॉर्म भरला असेल तरी यादीमध्ये तुमचं नाव असेलच असं खात्रीने सांगू शकत नाही. यादीत नाव आलंच तर स्पर्धकांच्या नावात, आडनावात, जन्मतारखेत घोळ झालेला असतो. मग आयत्या वेळी इतकी धावपळ करावी लागते की आपण इथे खेळायला आलो आहोत की चौकशा करायला, हेच कळत नाही. मग भीतीपोटी खेळाडूंचं मानसिक संतुलन ढासळतं. त्यांची तक्रार ऐकून घ्यायला, त्यांना मार्गदर्शन करायला विद्यापीठाचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नसतो.
बहुतांश महाविद्यालयात स्पर्धा भरवण्याइतपत जागाही नसते. मात्र स्पर्धेच्या निमित्ताने येणा-या भरघोस अनुदानाच्या लोभापायी कित्येक कॉलेजेस कुठल्या ना कुठल्या खेळाचं आयोजन करण्यासाठी धडपडतात. स्पर्धेच्या दिवशी स्पर्धकांची संख्या नेमकी जास्त झाली की एकूण वेळापत्रकाचा बोजवारा उडतो. मग जागा मिळेल तिथे, जमेल त्या कोप-यात सामने घेत स्पर्धा एकदाची कशीबशी संपवली जाते. प्रथमोपचाराच्या पेटया स्पर्धेच्या ठिकाणी नजरेस पडतात. पण प्रथमोपचार करणाऱ्या डॉक्टरांची वानवा असते.
एकंदरीत विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात मॅनेजमेंटचा पुरता खेळखंडोबा झालेला दिसतो.
स्पर्धाना उशीर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्घाटनाचा कार्यक्रम. प्रमुख पाहुण्यांना यायला उशीर होतो. नंतर त्यांचं आदरातिथ्य करण्यात स्पर्धा बाजूलाच राहतात. लांब ठिकाणाहून येणा-या मुलांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. स्पर्धा उरकण्याच्या नादात अनेक वेळा खेळाचे नियमच धाब्यावर बसवले जातात. दहा वेळा अर्ज तपासून भरला तरी स्पर्धेच्या ठिकाणी आपल्या नावाचा पत्ताच नसतो. विरोध केलाच तर खेळण्याची संधी मिळते पण नंतर अर्ज न मिळाल्याचं कारण सांगून पुढे जाण्यासाठी अपात्र ठरवलं जातं. पन्नास मुलांना धड उभं राहता येत नाही अशा ठिकाणी शंभर-दोनशे मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात. विद्यापीठाच्या या स्पर्धामुळे या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळतेय हे कौतुकास्पद आहे. पण त्यासोबत कॉलेज व संघटनाच्या मॅनेजमेंटवरही विद्यापीठाने नजर ठेवायला हवी.’’
चिन्मय सप्रे, विद्यार्थी
वैयक्तिक खेळांची बाजी
मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल अशा टीम गेम्सकडेही तरुण मोठया संख्येने वळतायेत. कॉलेज टीमच्या तुलनेत ऑल इंडिया खेळासाठी संधी मिळणा-या खेळाडूंची सरासरी कमीच दिसून येते. यामधून नियमित सराव, खेळासाठी उपलब्ध असलेली मैदाने अशा गोष्टी प्रमुख्याने पुढे येतात. म्हणूनच या सांघिक खेळांच्या तुलनेत वैयक्तिक खेळ खेळणारे खेळाडूच जास्त दूरदृष्टीने भाग घेऊन आपल्या वैयक्तिक खेळाची दखल घेण्यास भाग पाडतात. बुद्धिबळाच्या खेळात भाग घेणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणेच बॅडमिंटनचा स्तरही विद्यापीठ स्पर्धामध्ये उंचावताना दिसतोय. बॉक्सिंगसाठीही अनेक महाविद्यालयांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. ट्रॅक फिल्डवरच्या धावणे, गोळाफेक यांसारख्या स्पर्धामध्ये मुंबई विद्यापीठाचे खेळाडू दमदार कामगिरी करत असल्याने अटीतटींची स्पर्धा पाहायला मिळते. शूटिंग हा खेळ तसा खर्चिक समजला जातो. एनसीसीमधील विद्यार्थी यात हिरिरीने भाग घेत असतात.
समस्याच अधिक!
विद्यापीठाचे खेळ सुरू होणार म्हटलं की आपल्या स्पोर्ट्समनना टेन्शन येतं ते सरावाचं. सराव करायचा तरी कसा आणि कुठे? मुंबईतल्या कॉलेजेसचा हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. कारण खेळाडू आहेत पण त्यांना सरावासाठी मैदानंच नाहीत. मोठमोठय़ा हायफाय कॅम्पसच्या नावावर फुशारकी मारणा-या कॉलेजांमध्ये साधी इनडोअर गेम्सच्या प्रॅक्टिसपुरतीही जागा उपलब्ध नाही. काही महाविद्यालयांत तर खेळांसाठी आवश्यक असलेल्या बजेटचीही बोंबच आहे. युनिव्हर्सिटी आयोजित करतेय म्हणून मुलांची नावं पाठवायची इतकंच त्यांना ठाऊक! या काळात काही कॉलेजेस् दोन-तीन दिवसांसाठी, दोन-चार तास मैदानं भाडय़ानेही घेतात. पण इवल्याशा सरावानं काय साध्य होणार? स्वीमिंगच्या सरावासाठी तर स्पर्धकांनाच मोठमोठय़ा स्वीमिंग क्लबमध्ये भरमसाट फी मोजावी लागते.
खेळासाठी आवश्यक असणारी सामग्री तरी कॉलेजने पुरवावी ही मुलांची किमान इच्छा असते. पण कॉलेजेस याला खेळाडूंचे चोचले संबोधतात आणि ती इच्छा कधीही पूर्ण होत नाही. जिमखान्यातल्या खेळांच्या सामग्री शोभेच्या वस्तूच बनतात. परिणामी न मिळणा-या सोयी-सुविधांमुळे अनेक गरीब पण गुणवान खेळाडूंना ही वाटच सोडून द्यावी लागते.
आजच्या घडीला भारतात एकाच खेळाच्या अनेक संघटना आहेत. त्यांच्यात नेहमीच वादविवाद, साटेलोटे यांसारख्या गोष्टी सुरू असतात. त्यामुळे इथेही इतर कुठल्याही स्पर्धेप्रमाणे पॉलिटिक्स पाहायला मिळतं. काही वेळा यासाठी गैरमार्गाचा अवलंब करून नंतर त्या प्रकरणाला सदोष पंचगिरीचं रूप दिलं जातं.
ऑलिंपिकसारख्या जागतिक स्पर्धाही याला अपवाद नाहीत. काही वेळा कोणाच्या तरी फायद्यासाठी अचानक नियमांत बदल केले जातात. गेल्या वर्षी अशाच एका आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेची फायनल अनिर्णित ठरल्यावर नाणेफेकीवर संघाला विजयी घोषित करण्यात आलं. सहभागी स्पर्धकांमध्ये होणारी भांडणं, मारामा-या या गोष्टीतही काही नवलाई नाही. पण महाविद्यालयांची संबंधित संघटनांची प्रतिष्ठा रखडण्याच्या नादात खेळाडूंमध्ये द्वेषाची, क्रोधाची, मानापमानाची भावना निर्माण केली जाते. ही खेळांच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे.
आज खेळाला ग्लॅमर प्राप्त झालंय. कित्येक तरुण या क्षेत्रांकडे करिअर म्हणून पाहतायेत. आता त्याचं स्वरूप गल्लीबोळातल्या टाइमपासपुरतं उरलेलं नाही. स्पर्धेत जिंकणा-यांना सरळ राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धेत सहभागी होता येतं. खेळ हे खेळ या भावनेनेच खेळायला हवेत. त्याला युद्धाचे स्वरूप देता कामा नये. स्पर्धा क्रीडांगणाच्या ऐवजी राजकीय पटलांवर खेळली जाऊ लागली की त्यात अनेक स्वप्नांचा, आयुष्याचाच खेळ मांडला जातो. म्हणूनच या अनिष्ट वादळांना या क्षेत्रापासून दूर ठेवलेलंच बरं!
विद्यापीठाच्या स्पर्धासाठी कॉलेज आम्हाला दोन-तीन तासांसाठी मैदानं उपलब्ध करून देतात. पण मैदानाची अवस्था पावसामुळे अत्यंत बिकट झाली आहे. काही वेळा दोन-तीन टीम एकत्र सरावासाठी येतात. त्यावेळी जागा अपुरी पडते. स्पर्धेसाठी लागणारं सामना सहसा आम्हीच खरेदी करतो. मात्र प्रत्येक मुलाला हे जमतंच असं नाही. काही मुलं गरीब घरातली असतात अशा मुलांना तरी नवीन सामान घेण्यासाठी कॉलेजने आर्थिक मदत करायला हवीच.’’
प्रथमेश माळवदे, विद्यार्थी
काय आहेत फायदे?
विद्यापीठाच्या स्पर्धेत गोल्ड मेडल, काही वेळा सिल्व्हर मेडल पटकावणा-या स्पर्धकाला सरळ ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळते. मात्र सांघिक खेळांसाठी अनेक विजयी संघांतून दर्जेदार खेळाडूंची निवड करून संघ ऑल इंडिया स्पर्धेसाठी पाठवण्यात येतो. या स्पर्धेच्या प्रमाणपत्रांना आज सगळीकडे मान्यता आहे. याच्या बळावर कोणत्याही महाविद्यालयात तुम्हाला मार्क्स कमी असले तरी स्पोर्ट्स कोटय़ाच्या माध्यमातून सरळ प्रवेश दिला जातो. अनेक कॉर्पोरेट कंपन्या सध्या विविध खेळांच्या स्पर्धा भरवत असल्याने अनेक कंपन्या खेळाडूंना पर्सनल कोचिंगसाठी नोकरी देतात, अशा वेळी विद्यापीठ स्पर्धामधला तुमचा परफॉर्मन्स पहिल्यांदा तपासला जातो. आजकाल महाविद्यालयही विद्यापीठ स्पर्धामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करतात.
विद्यापीठांच्या स्पर्धामध्ये आपण राष्ट्रीय पातळीवर खेळू शकतो. त्यामुळे बँका, रेल्वे, पोलिस खात्यात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. पीएसआयसारख्या सरकारी परीक्षेमध्ये तुमच्याकडे नॅशनल लेव्हल सर्टिफिकेट असेल तर 5% अधिक पकडले जातात. तसंच तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवला तर तुम्ही स्वत:चे कोचिंग क्लासही घेऊ शकता.
रक्षा महाराव
(पोलिस निरीक्षक, 1986 आणि 2011चा महाराष्ट्र राज्य सरकारचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार)
लक्षात ठेवा
- महाविद्यालयाचा शिक्का आणि प्राचार्याची सही असलेला अर्ज दिलेल्या अवधीतच भरावा.
- संपूर्ण भरलेल्या अर्जाची एक झेरॉक्स प्रत विशेषत: स्पर्धेच्या दिवशी आपल्याकडे बाळगावी.
- स्पर्धेशी संबंधित आयोजक, प्रतिनिधींचे दूरध्वनी क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करावा.
- स्पर्धेच्या एक-दोन दिवस आधी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून नियोजित वेळ, ठिकाण यांच्यात काही बदल झाला आहे का? याची चौकशी करावी.
- स्पर्धेस जाताना शक्य असल्यास कॉलेजमधल्या क्रीडाविभाग प्रमुखांना सोबत घ्यावं.
- महाविद्यालयाचं ओळखपत्र आणि तुमचा जन्मदाखला सोबत असायलाच हवा.
- नियोजत स्थळी वेळेआधीच पोहोचावं.
- वजन, उंची, शारीरिक चाचणी यांच्या झालेल्या नोंदी स्वत:कडेही लिहून ठेवाव्यात.
- खेळाचे नियम आयोजकांकडून आधीच जाणून घ्यावेत.
- आपल्या खेळाच्या दृष्टीने आवश्यक प्रथमोपचाराच्या वस्तू स्वत:सोबत ठेवायला हव्यात.
- तुमच्यावर अन्याय होत असल्यास आयोजनस्थळी गदारोळ न माजविता आयोजकांकडे त्याची तक्रार करावी.
महाविद्यालयाचा संघ स्पर्धेत खेळत असल्यास संघातल्या जबाबदार व्यक्तीने वरील गोष्टींची जबाबदारी घ्यायला हवी.
संकलन : वैभव महाडिक आणि प्रवीण दाभोळकर