तब्बल दीड महिने दडी मारलेल्या पावसाचे मंगळवारी पुनरागमन झाले. झालेल्या या संततधारेने दोन दिवस मुक्काम ठोकला आहे.
बीड- तब्बल दीड महिने दडी मारलेल्या पावसाचे मंगळवारी पुनरागमन झाले. झालेल्या या संततधारेने दोन दिवस मुक्काम ठोकला आहे. यामुळे मराठवाडयात ब-याच ठिकाणी रिमझिम सुरू आहे. तसेच पावसाअभावी माना टाकलेल्या पिकांनी उभारी घेतली आहे. तर आटलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठयात पाच टक्क्याने वाढ झाली आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक असला तरी टंचाईचे मात्र अद्याप कायम आहे.
बीडमध्ये दिवसभरात ९.९ मिलीमीटर पाऊस
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून संततधार चालू होती. तर बुधवारी दिवसभर पावसाची रिमझिम होती. पावसाच्या पुनरागमनाने पिकांना तात्पुरते जीवन मिळाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माजलगाव तालुक्यात झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत २४ तासांत ९.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वडवणी तालुक्यात १५.५, त्याखालोखाल बीड, धारूर, परळी या तालुक्यांत १२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जालन्यात सलग पाऊस
जालन्यात सलग ३६ तास बरसणा-या संततधारेने शेतकऱ्यांच्या चेह-यावर हसू उमटले आहे. या पावसाचा कापूस, सोयाबीन, मका, बाजरी या पिकांना चांगला फायदा होणार आहे. आंतरमशागतीची कामे केलेल्या पिकांची वाढ झपाटयाने होईल, असा कृषीतज्ज्ञांचा अंदाज आहे. मंगळवारी ५४ मिमी एवढा पाऊस झाला तर बुधवारी रिमझिम सुरूच होती.
अकोला जिल्ह्यात गावांचा संपर्क तुटला
विदर्भातील दमदार पाऊसामुळे अकोला जिल्ह्यातील उमा, निर्गुणा, काटेपूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले यामुळे नद्यांना पूर आला असून त्यात बाळापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांतील तिघे जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यातील अकोट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
तळेगाव डवला व तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, जुनी उमरी, पिवंदळ, धामणा व अंदुरा अशा आठ गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जळगावमध्ये महिला वाहून गेली
जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग केला जात होता. ऐनपूर येथील श्यामाबाई राजाराम महाजन (७०) या वृद्धेचा बुधवारी तापी नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
रावेर तालुक्यातील अजनाड, विटवे, िनबोल, ऐनपूर या गावांचा संपर्क तुटला होता. तसेच या पावसात केळी, कापूस आदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यातील रावेर, विवरा, खानापूर, खिरोदा, सावदा, विटवा येथील राहत्या घरांची पडझड झाली आहे. यातील जखमी व्यक्तींवर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अमरावतीत पावसाचा कहर
अमरावतीमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधारेने चार जणांच्या जीवावर बेतले. कोंडण्यपूर ते अंजन चिंगी मार्गावरील पुलावरून जात असलेली गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून बरसणा-या पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती आहे.
यवतमाळमधून वध्र्यातील आरळीला लग्नासाठी जात असलेल्या आजनकर कुटुंबाची कार पूल ओलांडत असताना पाण्याच्या दाबामुळे पाण्यात वाहून गेली. रात्रभर त्यांचा शोध सुरू होता. अखेर गुरुवारी सकाळी चारही जणांचे मृतदेह सापडले. मृतांमध्ये दोन ते तीन वर्षाच्या लहान मुलीचाही समावेश आहे.