राज्यातील भाजप सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने काढलेल्या जन आक्रोश मेळाव्याला जनतेचा प्रतिसाद मिळत असतानाच विदर्भात काँग्रेसमध्ये दुफळी माजली आहे.
नागपूर- राज्यातील भाजप सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने काढलेल्या जन आक्रोश मेळाव्याला जनतेचा प्रतिसाद मिळत असतानाच विदर्भात काँग्रेसमध्ये दुफळी माजली आहे. चंद्रपूरात झालेल्या जनआक्रोश मेळाव्याला अशोक चव्हाण विरोधकांनी दांडी मारली. या गटाचे नेतृत्त्व नरेश पुगलिया यांनी केले. चंद्रपूरात झालेल्या आजच्या मेळाव्याचे आयोजन आमदार विजय वड्डेटीवार यांनी केले, तर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा विभागीय शेतकरी मेळावा भरवला.
चंद्रपुरातील जनआक्रोश सभेसाठी विदर्भातील अनेक काँग्रेस नेते अनुपस्थित राहिले. विजय वड्डेटीवार आणि नरेश पुगलिया यांच्यातील वादामुळे प्रदेश काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरोधातील गट आता एकत्र येत असल्याचे चित्र दिसून आले. हा गट पुगलिया यांच्या बाजूने उभा आहे. यामध्ये माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, नागपूरमधील एकमेव विद्यमान काँग्रेस आमदार सुनील केदार आदी नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी तीन दिवसांपूर्वी सर्व नेत्यांची बैठक घेतली होती. मात्र, तरीही यातून काहीही साध्य झालेले दिसले नाही. अशोक चव्हाणांच्या मध्यस्थीनंतरही चंद्रपुरातच दोन कार्यक्रम झाले.
या प्रकरणी नरेश पुगलिया यांनी आपणही एकच कार्यक्रम घेण्याची तयारी दर्शवली होती, मात्र, दोन्ही कार्यक्रम रद्द करुन एकच तारीख ठरवण्याची आमची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे काँग्रेसचे दोन कार्यक्रम चंद्रपुरात झाले, असे सांगितले.
काँग्रेसच्या जनआक्रोश मेळाव्याला लोकांनी हजेरी लावली. मागील तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली. नोटाबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली. महागाईने कळस गाठला. या परिस्थितीत जनतेला जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील जनता या सरकारला विटली आहे, त्यांच्या मनात कमालीचा आक्रोश दिसत आहे, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.