विदर्भातील काही जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील जमीन पाण्याखाली गेल्याने पिके वाया गेली आहेत. पावसाने अनेक तालुक्यांतील घरे कोसळल्याने शेकडो कुटुंब बेघर झाली आहेत. एकंदर स्थिती पाहता भंडारा, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोलीत ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.
भंडारा –जिल्ह्यात रविवारी झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरू असल्याने 100 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 12 घरांचे पूर्णत: तर 88 घरांचे अंशत: नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नदी, नाले व तलावाचे पाणी गावातील अनेक घरांत शिरल्याने बाधित कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी स्वत: पूरग्रस्त भागाचा दौरा करीत आवश्यक ते निर्देश दिले.
लाखांदूर तालुक्यातील दोन घरे पूर्णत: कोसळली तर 66 घरांचे अंशत: नुकसान झाले. नदी, नाल्याचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने बोरगाव, ओपारा, डोकेसरांडी या गावांचा संपर्क तुटला होता. कन्हाळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील तलावाची पाळ सुमारे 15 फुटापर्यंत फुटल्याने पाणी लगतच्या शेतात शिरून भातपिकाचे नुकसान झाले. पवनी तालुक्यातील प्रधान ढोरप आणि खोकरी ढोरप या दोन गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने तेथील 7 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तालुक्यातील पाहुणगाव, मालगाव, परसोडी, कोटलापार, निलज या गावांनाही पुराच्या पाण्याने वेढले होते. मरू नदीच्या पुरामुळे पवनी ते नागपूर मार्ग बंद झाला होता.
वाही येथील तलावाची पाळ फुटल्याने पावसाचे पाणी चार घरात शिरले. अतिवृष्टीमुळे पवनी तालुक्यातील 32 घरांचे नुकसान झाले. येथील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलवण्यात आले आहे. भंडारा तालुक्यातील टेकेपार येथील अरुण रामटेके यांच्या घराचे छप्पर व भिंत कोसळल्याने रामटेके जबर जखमी झाले आहेत. त्यांना नागपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाखनी तालुक्यात नाल्याच्या पुरात अशोक उईके (रा. मोरगाव) हा तरुण वाहून गेला.
नद्यांनी गाठली धोक्याची पातळी
अमरावती : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून सोमवारी व मंगळवारी दुपारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पावसाने पुराची स्थिती निर्माण केली नसली, तरी अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा 75 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत्या काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास धरणाची दारे उघडावी लागतील, अशी स्थिती आहे. मेळघाटात पावसाचा जोर अधिक होता. आतापर्यंत चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक 1294.6 मि.मी. म्हणजे सरासरीच्या 125 टक्के पावसाची नोंद झाली असून सिपना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. हरिसाल येथे सोमवारी दुपारी नदी जुन्या पुलावरून वाहू लागली होती. अनेक भागात इतर नद्यांवरील छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मेळघाटातील अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले असल्याने पर्यटकांनी या भागात गर्दी केली आहे. सलग सुटया आल्याने चिखलदरा गर्दीने फुलून गेले आहे. जिल्ह्यातील चंद्रभागा, पूर्णा, शहानूर आणि सापन या मध्यम प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा झाला आहे.
लालनाला व नांद धरणाचे दरवाजे उघडले
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील उमरेड येथील नांद शेंडेश्वर धरणाचे 6 दरवाजे उघडल्याने तीन गावांमध्ये पाणी शिरले आहे. 20 दिवसांत दुस-यांदा धरणाचे दरवाजे उघडावे लागल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लालनाला प्रकल्पातूनही पाणी वाहू लागल्यामुळे 5 दरवाजे उघडल्याने आसोला, मंगरूळ, डोंगरगाव या तीन गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर हिंगणघाट तालुक्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरालगतच्या वणा नदीला पुराचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांद हे धरण उमरेड तालुक्यात असले तरी समुद्रपूर तालुक्यातील गावांसाठी वरदान ठरले आहे. या धरणाचे सहा दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याने आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या सहा दरवाज्यातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असून 3 गावांत पाणी शिरले आहे. त्यातच समुद्रपूर तालुक्यातील लालमाळा प्रकल्पातून पाणी वाहू लागल्याने 5 दरवाजे उघडण्यात आले. पुराची माहिती समुद्रपूरचे तहसीलदार पू. एस. ताडेसाम यांना मिळताच त्यांनी इतर अधिका-यांसह गावांना भेट दिली. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत हिंगणघाटमध्ये 62 मिमी, समुद्रपूर 49 मिमी आणि देवळी 28 मिमी असा एकूण 22.7 मिमी इतका पाऊस पडला.
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी
गडचिरोली : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले असून पावसामुळे जिल्ह्यातील 194 घरे अंशत: तर 7 घरे पूर्णत: पडली आहेत. यात अतिवृष्टीमुळे कुरखेडा तालुक्यात 128, आरमोरी तालुक्यात 6 घरे अंशत: पडली आहेत. चामोरी तालुक्यात 25 घरे अंशत: तर एक घर पूर्ण पडले. फोफुर्डी गावातील 5 घरांत पाणी शिरले आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, बोडधा, वडधा, नरोटी माल या गावांतील घरांची पडझड तर कुकर्डी, बोरी या गावांतील घरामध्ये पाणी घुसले. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील घरांची पडझड व बक-यांचा गोठा पडल्याने 5 शेळ्या जागीच ठार झाल्या. एटापल्ली तालुक्यातील तामडा येथील रहिवासी पत्रू राजू होकी पुरात वाहून गेला. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक बंद झाली. तर शेतात पाणी घुसल्याने पीक पाण्याखाली बुडाले आहे. अमिर्झा येथील गावतलावाची पाळ आठ दिवसांपूर्वी फुटली त्यामुळे 100 एकर शेतजमीन पाण्याखाली आली होती. ती पाळ बुझविल्यानंतर काल-परवाच्या पावसामुळे रात्री पुन्हा तलाव फुटला त्यामुळे धानपिकात पाणीच पाणी झाले आहे.