अलिबाग – भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प असलेल्या ‘विज्ञान एक्सप्रेस अर्थात सायन्स एक्सप्रेस’ १८ जुलै रोजी रोहा रेल्वेस्थानक येथे एक दिवसासाठी दाखल होत आहे. या वातानुकुलित गाडीत जिल्हावासीयांना ‘जलवायु परिवर्तन’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन पाहण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. भारत सरकारच्या विज्ञन तंत्रज्ञान मंत्रालय, वन मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि जैव तंत्रज्ञान मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
रोहा रेल्वे स्थानक येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. दरम्यान हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी उपलब्ध असेल. यावेळी महाविद्यालयीन – शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी, नागरिक समाजातील सर्व घटकांसाठी हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य असेल, असे सायन्स एक्सप्रेसचे व्यवस्थापक नितीन तिवणे यांनी कळविले आहे.
सायन्स एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा (डीएसटी) विशेष प्रकल्प आहे. ही १६ डब्यांची वातानुकूलित प्रदर्शनी ट्रेन ऑक्टोबर २००७ पासून भारत भ्रमण करीत आहे. आतापर्यंत १ लाख ५६ हजार किमीचा प्रवास पूर्ण करणा-या या गाडीने आठ वेळा देशाचा प्रवास पूर्ण केला आहे. देशभरातील ५१० स्थानकांवर या गाडीने आपली उपस्थिती नोंदवली आहे. आत्तापयर्ंतच्या १७५० प्रदर्शन दिवसांमध्ये या प्रदर्शनास अति प्रचंड असा १.७१ करोड दर्शकांचा प्रतिसाद लाभल्याने ‘विज्ञान एक्सप्रेस’ हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक दर्शक लाभलेले प्रदर्शन बनले असून त्यासाठी तब्बल १२ वेळा लिमका बूक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये या विज्ञानाच्या राणीची दाखल घेतली गेली. सायन्स एक्सप्रेसने आपल्या पहिल्या चार पर्वामध्ये जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दखल घेतली. भारतातील समृद्ध जैवविविधतेचा मागोवा घेणारे प्रदर्शन त्या पुढील तीन पर्वामध्ये सायन्स एक्सप्रेस जैवविविधता विशेष या नावाने प्रदर्शित झाले. सायन्स एक्सप्रेस आठवे पर्व हे जागतिक तापमान वाढ आणि संबंधित आव्हानाना दर्शवणारे होते जे सायन्स एक्सप्रेस जलवायु परिवर्तन विशेष या नावाने प्रदर्शित केले गेले. सध्याच्या पर्वाकरिता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्राद्यान विभाग (डीएसटी), वन, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन विभाग जैवतंत्रज्ञान विभाग, रेल्वे मंत्रालय, भारतीय वन्य जीव संस्था आणि विक्रम ए साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर या सा-यांनी मिळून अथक प्रयत्न केले आहेत. १९ हजार किमीचा प्रवास १७ फेब्रुवारी ते ८ सप्टेंबर या कालावधीत सायन्स एक्सप्रेस करणार असून ६८ स्थानकांवर गाडीचा मुक्काम असेल.
‘जलवायु परिवर्तन’ ही एक महत्त्वाची समस्या असून तिचे अनेक दीर्घकालीन तसेच लघुकालीन परिणाम आहेत. हवामाच्या रचनेत होणा-या बदलांमुळे शेती उत्पादनवर होणारे परिणाम असोत वा समुद्राच्या स्तरात होणारी वाढ असो, जल वायु परिवर्तन ही आता गोर गरिबांवर भयावह परिणाम करू शकणारी जागतिक समस्या बनली आहे. पण तरीही जलवायु परिवर्तन आणि त्याचे परिणाम याबद्दल जन सामान्याना फारच थोडे ज्ञान आहे. तेव्हा जलवायु परिवर्तनबाबत जन जागृती करणारे हे प्रदर्शन म्हणजे चर्चा आणि मंथनाची सुसंधी म्हणावी लागेल. ४ नोव्हेंबर २०१६ पासून पॅरिस कराराची अंबलबजावणी सुरू झाली आहे. जलवायु परिवर्तन विरुद्धच्या लढ्यासाठी जागतिक प्रयत्नांना बळकटी प्राप्त करून देणे हे पॅरिस कराराचे मुख्य ध्येय आहे.