त्याचा जन्म झाला कोलकात्यात. २० डिसेंबर १९५५ रोजी. जागतिकीकरण, खासगी विमानसेवा, उदारीकरण, बॉलिवूड, भ्रष्टाचार, मोबाईल, लॅपटॉप हे शब्दही ज्या काळात कुणी ऐकले नव्हते, त्या काळात.
त्याचा जन्म झाला कोलकात्यात. २० डिसेंबर १९५५ रोजी. जागतिकीकरण, खासगी विमानसेवा, उदारीकरण, बॉलिवूड, भ्रष्टाचार, मोबाईल, लॅपटॉप हे शब्दही ज्या काळात कुणी ऐकले नव्हते, त्या काळात. स्वातंत्र्य मिळून नुकतीच ८ वर्षे झाली होती. राष्ट्र उभारणीच्या स्वप्नात सारे भारतीय नेते आणि जनताही दंग होती. त्या काळात कोलकात्यात विठ्ठल मल्ल्या यांच्या घरात विजय मल्ल्याचा जन्म झाला. अत्यंत सामान्यपणे त्याचे बालपण गेले. कोलकाता विद्यापीठातून त्याने पदवी घेतली.
वडिलांशी त्याचे नेहमी खटके उडायचे, कारण वडील त्याला पैसेच देत नसत. त्याच्या वडिलांच्या मालकीची कंपनी होती बिअर बनवणारी. युनायटेड ब्रुअरीज हे तिचे नाव.
आज या नावाला वलय आहे. तेव्हा त्याचा मागमूसही नव्हता. विजयला बाहेर फिरायचे असले तर त्याला ट्राम आणि बसने फिरावे लागायचे. अखेर आपल्या वडिलांच्या कंपनीत त्याने ट्रेनी म्हणून पहिली नोकरी स्वीकारली. तेव्हा त्याला पगार दिला जायचा ४०० रुपये महिना. पॉकेटमनी वगैरेचे तर नावच नको. १९८३ हे वर्ष विजय मल्ल्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरले. त्या वर्षी त्याचे वडील विठ्ठल मल्ल्या यांचे अचानक निधन झाले. त्याच्या आयुष्यातील हा वळणबिंदू होता. १९८३मध्ये विजय मल्ल्या यूबी कंपनीचा अध्यक्ष झाला. त्यानंतर कंपनीचे दिवस पालटले. रडतखडत चालणारी कंपनी विजय मल्ल्याने कमालीच्या आत्मविश्वासाने वर आणली. वाटाघाटी करण्याची त्याची अफाट क्षमता त्याच्या कामी आली. बिअर मार्केटमधील आघाडीची कंपनी बनली. तिच्यापुढे लंडन पिल्सनरसारख्या कंपन्यांना गाशा गुंडाळावा लागला. बाजारात मल्ल्याच्या कंपनीच्या बिअरचा वाटा होता ५० टक्के. म्हणजे अर्धी बाजारपेठ मल्ल्याच्याच मालकीची होती.
जगभरातील ५२ देशांत आज ही बिअर विकली जाते. मल्ल्याने आपले सारे वाटाघाटींचे कौशल्य पणाला लावले आणि डावपेच लढवले. त्यामुळे कंपनीची उलाढाल अवघ्या काही वर्षात गेली १२ अब्ज डॉलरवर. त्याच्या चैतन्यदायी नेतृत्वाखाली कंपनीचा विस्तार ६० कंपन्यांमध्ये झाला. त्याने परदेशातील अनेक कंपन्याही विकत घेतल्या आणि फक्त बिअरपुरतेच न राहता जैवविज्ञान, अभियांत्रिकी, कृषी, रसायन, माहिती-तंत्रज्ञान आणि मनोरंजन आदी क्षेत्रांत हातपाय पसरले.
२००५ मध्ये हवाई वाहतूक बाजारपेठेत इंडियन एअरलाईन्स आणि जेट एअरवेज तसेच एअर सहाराचे वर्चस्व होते. तेव्हा मल्ल्याने नेहमीप्रमाणे धडाकेबाज निर्णय घेत किंगफिशर एअरलाईन्सची घोषणा केली. द किंग ऑफ गुड टाईम्स ही त्याची स्लोगन होती. किंगफिशरने बाकीच्या विमानसेवांना मागे टाकत प्रवाशांना नवाच हवाई प्रवासाचा अनुभव दिला. त्याच्या कंपनीचा थाट काय वर्णावा? अनेक आकर्षक सवलती देत त्याने प्रवाशांना किंगफिशरकडे येण्यास भाग पाडले. त्याच्या विमानसेवेसाठी हवाई सुंदरी आणि स्टेवार्डसच्या मुलाखती त्याने स्वत: घेतल्या. असे आजवर कोणत्याही उद्योगपतीने केलेले नाही. किंगफिशर सुरू झाल्यापासून कंपनीला तब्बल ३० पुरस्कार मिळाले. बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनसाठी त्याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली आहे. सर्व नव्या को-या चकचकीत विमानांच्या ताफ्याने कंपनी चालवणारा एकमेव उद्योजक मल्ल्याच होता. ए-३८० ही एअरबस खरेदी करणाराही तो पहिलाच मालक. सुरुवातीला मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथेच त्याची विमाने उडत असत. नंतर १५ देशांत त्याची विमाने झेप घेत होती.
मल्ल्याने जशी बिअर कंपनी भरभराटीला आणली तसेच किंगफिशरला आणले असते. त्याच्या विमानात प्रवाशांना प्रवासी म्हणायची बंदी होती. त्याच्या दृष्टीने प्रवासी हे पाहुणे होते. विमानसेवा बाजारपेठेत त्याच्या कंपनीचा वाटा होता ९ टक्के. हेही यश तसे उत्तुंगच. एअर डेक्कनला त्याने आपल्या कंपनीत सामावून घेतले. हीच त्याच्या अस्ताची सुरुवात होती. व्यावसायिकरित्या विमानसेवा चालवण्याऐवजी त्याने सरळ लक्झरीकडे मोर्चा वळवला. त्याने स्वत:च आपल्या विनाशाची कबर खोदली होती. जगभरातील जवळपास सर्व शहरांत सेवा सुरू केली. तसे करणारी त्याची खासगी कंपनी एकमेव होती. कंपनीची वार्षिक उलाढाल होती २ अब्ज डॉलर्स. मल्ल्याने त्याच्या विमान कंपनीत इतके लक्ष घातले की त्याच्या कर्मचा-यांचा गणवेष त्यानेच ठरवला होता. कर्मचा-यांच्या मुलाखतीही तो स्वत:च घ्यायचा.
त्याच्या विमान कंपनीचा थाट एवढा होता की त्याच्या प्रवाशांसाठी त्याने प्रत्येक सीटसमोर टीव्ही बसवला होता. त्याची ही कल्पना जबरदस्त यशस्वी झाली. त्याशिवाय अनेक सवलतींची उधळपट्टी त्याने केली. त्याच्या स्वत:च्या ऐषारामी जीवनाशी सुसंगत असेच त्याचे निर्णय होते. त्याचे कपडे अगदी निवडून काढलेले असत. त्याच्या विमानातून प्रवास म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गप्राप्तीचा आनंद असायचा. परंतु त्यात मल्ल्याने आपले व्यावहारिक नुकसान किती होते आहे, ते पाहिले नाही. बाकीच्या विमानसेवा जेव्हा फायद्यात होत्या, तेव्हा त्याची किंगफिशर तोटय़ात चालली होती. ५५० कोटींचा तोटा त्याच्या कंपनीला झाला. असे का होते, याचा अभ्यास करायच्या ऐवजी मल्ल्या बुडतच चालला होता. तेव्हा इंधनाच्या किमती गेल्या होत्या १५० डॉलर प्रति बॅरल इतक्या आणि २००८ मध्ये जागतिक मंदीने विमान कंपन्यांना खड्डय़ात घातले. तरीही त्याला आपण पुन्हा कंपनीला वर आणू असा दुर्दम्य आत्मविश्वास होता. खरे तर तो फाजील विश्वास होता.
कारण तोपर्यंत त्याच्या कंपनीचे आकर्षण संपले होते. मल्ल्याने दुसरी गंभीर चूक केली ती आपला शून्य अनुभव असलेला मुलगा सिद्धार्थ मल्ल्याला कंपनी भेट म्हणून दिली. सुंदर पोरींना घेऊन फिरणा-या पोराला अख्खी कंपनी चालवायला दिल्यामुळे कंपनीची वाट लागणे ठरलेलेच होते. स्पाईस जेट, जेट एअरवेज वगैरे अनेक खासगी कंपन्या कमी भाडय़ात प्रवाशांना नेत होत्या. त्यात किंगफिशरकडे लोक वळेनासे झाले. मल्ल्याने विविध बँकांकडून कर्जे घेण्याचा सपाटा लावला. शिवाय व्यवस्थेला आपण झुकवू शकतो, याची त्याला खात्री होती. (तो कर्ज बुडवून पळाला, यात त्याचा विश्वास खरा असल्याचे सिद्ध झालेच.) त्याची पत पाहून आधी बँकांनी त्याला कर्ज दिलेही. मात्र त्याच्या किंगफिशरने एका तिमाहीत कधीही नफा मिळवला नाही. तरीही बँकांना त्याच्याबद्दल अतिविश्वास होता आणि मल्ल्याकडून मिळणा-या भेटींची लालूचही होती. एसबीआयने त्याला ७ हजार कोटींचे कर्ज दिले. त्यावेळी बँकेच्या बोर्डरुममध्ये जोरदार वाद झाला.
काही संचालक मल्ल्याला कर्ज देऊ नये, या मताचे होते. परंतु बँकांचा आशावाद आणि हतबलता यांचा विजय झाला. कारण मल्ल्याला कर्ज दिले नसते तर त्याला आधी दिलेल्या कर्जाची फेड होणे त्याच्याकडून शक्य नव्हते. अखेरीस सात हजार कोटी कर्ज घेऊनही मल्ल्याची कंपनी बसलीच. २०१२ मध्ये तिने अखेरचे उड्डाण केले. आज मल्ल्याची विमाने भंगारात पडली आहेत. त्याचे हजारो कर्मचारी पगाराविना भटकत आहेत. मल्ल्या इतका निर्ढावला की त्याने कर्मचा-यांच्या नावे पगार देऊ शकत नाही,असा फक्त मेल निलाजरेपणे पाठवला आहे. मल्ल्याकडे कर्मचा-यांच्या पगाराकरता पैसा नसला तरी त्याच्याकडे रॉयल चॅलेंजर्स हा टी-२० क्रिकेट संघ, फॉर्म्युला वन रेसिंग संघ, लिलावात महात्मा गांधीजींच्या वस्तू, जगभरातील २५ ठिकाणी विशाल वास्तू आणि २५० व्हिंटेज कारचा ताफा, मेगायाट खरेदी करण्यासाठी कुठून पैसा आला, याचे उत्तर कुणाकडेच नाही.
मल्ल्याचा आज अस्त झाला आहे. तो इंग्लंडला पळून गेला असला तरीही कधी ना कधी त्याला अटक केली जाईलच. त्याच्या नावे लुक आऊट नोटीस जारी केली आहे. मल्ल्याला अटक झाली तरीही त्याच्याकडून बँकांना आपले कर्ज वसूल करता येईल का, याची शंका आहे. मल्ल्याची स्वत:ची इच्छा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बँका हात चोळत बसणार आहेत. त्याची मालमत्ता विकूनही तेवढी रक्कम होत नाही. आज मल्ल्या किंग ऑफ बॅड टाईम्स झाला आहे. त्याचे आयुष्य वादळी आहे. अलिशान गाडय़ा, सुंदर देखण्या मॉडेल्स आणि सदोदित पत्रकारांचा ताफा यामुळे तो प्लेबॉय म्हणून ओळखला गेला. मध्ये तो राज्यसभेत खासदार म्हणूनही बसला होता. तेही जनता दलाचा. ज्या पक्षाचा लौकिक साधेपणे जगण्यासाठी आहे. त्या पक्षाचा खासदार अय्याश मल्ल्या असणे, ही नियतीची अजब खेळी होती. आता मल्ल्याचा अस्त झाला असला तरीही राजकीय आशीर्वादाने एखादा उद्योगपती व्यवस्थेला आपल्या हातातील बाहुले कसे बनवतो, याचे एक आदर्श उदाहरण म्हणून त्याचे नाव इतिहासात अमर होईल.