मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास अनेक कारणांमुळे रखडत असल्याने सरकारने इमारतींचा सामूहिक पुनर्विकास…
मुंबई– मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास अनेक कारणांमुळे रखडत असल्याने सरकारने इमारतींचा सामूहिक पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजना राबवण्यास पाच गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मात्र यापैकी करी रोड येथील हाजी कासम चाळ वगळता एकही प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेलेली नाही. क्लस्टर डेव्हलपमेंटमधील पहिला प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून हाजी कासम चाळीचा पुनर्विकास करण्यास निश डेव्हलपर्सना यश आले आहे. एका चाळीचा पुनर्विकास करताना, त्यातील रहिवाशांचे रुसवे, फुगवे तसेच विरोधकांची षड्यंत्रे यातून मार्ग काढताना पुरती दमछाक होते, परंतु या ठिकाणी तब्बल सहा चाळींचा एकत्रित पुनर्विकास करण्यात आला असून लोकांच्या संघर्षानंतरही तो यशस्वीपणे पूर्ण केला गेला आहे.
करी रोड आणि लालबाग आंबेडकर मार्ग येथील हाजी कासम चाळ आणि न्यू हाजी कासम चाळ अशा एकूण सहा चाळींचा पुनर्विकास क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत हाती घेण्यात आला. या उपकरप्राप्त चाळींमध्ये राहणा-या ५७९ भाडेकरू व इतर २२ याप्रमाणे तब्बल ६०१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. काही नाममात्र भाडेकरूंचे पुनर्वसन वगळता उर्वरित सर्व कुटुंबे टॉवरमधील घरात राहायलाही गेली आहेत. ८० ते १२० चौरस फुटाच्या या घरात राहणा-या या कुटुंबांना आता नव्या टॉवरमध्ये ४४० चौरस फुटाचे प्रशस्त, आलिशान आणि हवेशीर असे घर मिळाले आहे. चाळीतील कोंदट आणि अपुरी जागा, पहाटे चार वाजता उठून पाणी भरण्याची कटकट या सर्वातून येथील रहिवाशांची सुटका झाली आहे. त्यामुळेच चाळीतील ते जीवन म्हणजे नरक आणि टॉवरमधील हे जीवन म्हणजे स्वर्ग मानणा-या भाडेकरूंकडूनच ‘नरकातून स्वर्गापर्यंतचा अनुभव या टॉवरमधील घरामध्ये अनुभवतोय’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
सात एकर जागेत राबवण्यात आलेला हा पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प पर्यावरणाला अनुकूल असा आहे. या ठिकाणी हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) तसेच पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प (वॉटर रिसायकल प्लांट) यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पामुळे येथील रहिवाशांची वीजबिलापोटी ३५ टक्के एवढी बचत होणार आहे.
दरम्यान, आजही येथील अनेक कुटुंबे केवळ सरकारने अधिनियमांमध्ये सुधारणा न केल्यामुळे जुन्या चाळींमध्येच राहत आहेत. या इमारती धोकादायक असल्याने माहीम, डॉकयार्डसारखी इमारत दुर्घटना बनून आमचे जीव जातील, अशी भीती भाडेकरूंना आहे. आज टॉवरमधील घरात जायची भाडेकरूंची इच्छा असली तरी अधिनियमांमध्ये सुधारणा झालेली नसल्यामुळे या उर्वरित भाडेकरूंना प्रकल्पात सामावून घेताना घरांचा ताबा द्यायचा तरी कसा, असा प्रश्न विकासकाला पडलेला आहे. तर आम्हाला धोकादायक इमारतीतून संक्रमण शिबिरात राहायला जायचे नाही, टॉवरमध्येच जायचे आहे. त्यामुळे सरकारने या धोकादायक इमारतींचा विचार करून यात सुधारणा केली तर संक्रमण शिबिराऐवजी आमच्या नशिबी टॉवरमधील जिणे येईल, अशी प्रतिक्रिया भाडेकरूंकडून व्यक्त केली जात आहे.
डिसी रुल्समध्ये राज्य सरकारने सुधारणा करावी
क्लस्टर डेव्हलपमेंटसारख्या प्रकल्पांना राज्य सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(नऊ) मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. राज्य सरकारने जर यामध्ये सुधारणा केली तर उर्वरित भाडेकरूंना नव्या घरांचा ताबा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात सुधारणा करून द्यावी, जेणेकरून उर्वरित भाडेकरूंच्या घराचे स्वप्न लवकर साकारणे सोपे जाईल, असे निश डेव्हलपर्सचे कैलाश अगरवाल यांनी सांगितले.
संघर्षाचे फळ मिळाले
हाजी कासम चाळीतील भाडेकरू टॉवरमध्ये राहायला गेल्यानंतर आम्हाला तिकडे घर कधी मिळेल, असे वाटायचे. काही लोकप्रतिनिधींनी आम्हा भाडेकरूंची दिशाभूल करून विकासकाच्या विरोधात आम्हाला भडकवले. त्यामुळे टॉवरमधील घराचे स्वप्न लांबले. परंतु या संघर्षानंतरही चांगले फळ मिळाल्याचे समाधान आहे. नव्या टॉवरमधील ‘ई’ विंगमध्ये घरांचे वाटप झाले आहे. घरांचा ताबा तांत्रिक बाबींमुळे अडकला असला तरी दिवाळीनंतर नव्या घरात आमचा प्रवेश होणार आहे. खरं तर मुंबईत दोन इमारती पडल्यानंतर जुन्या चाळीत राहण्यास आम्हालाच आता भीती वाटू लागली आहे. त्यामुळे टॉवरमधील घर आता आम्हाला खुणावू लागले आहे. त्यामुळे मी एवढेच म्हणेन की, आम्हाला संघर्षाचे फळ मिळाले. – सचिन मनोहर जाधव, न्यू हाजी कासम चाळ, रूम क्रमांक १६
चाळीतली ही आमची शेवटची दिवाळी
मोठया टॉवरमध्ये राहायला जाईन, असे वाटले नव्हते. पण आता जे घर मिळाले, ते अपेक्षेपेक्षाही मोठे आहे. विकासक कैलाश अगरवाल यांचे आभार मानावे तेवढे कमी. त्यांनी आम्हा लोकांच्या संघर्षानंतरही आमच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. जरी आम्ही संघर्ष करत असलो तरी त्यांच्यावर आमचा विश्वास होता. ते आमच्यावर अन्याय करणार नाहीत, याची खात्री होती. त्यामुळेच आज आमचे टॉवरमधील घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३(नऊ)मध्ये काही सुधारणा सरकारने केल्यानंतर आम्हाला ही घरे त्वरित दिली जाणार आहेत. यंदाची आमची चाळीतली शेवटची दिवाळी असेल आणि पुढच्या वर्षी टॉवरमध्ये दिवाळी साजरी करू, असा आम्हाला विश्वास आहे.- प्रमोद विश्वनाथ डिचवलकर, न्यू हाजी कासम चाळ, रूम क्रमांक ६७
स्वप्नातले घर मिळाले
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या चाळीत राहतो. आमचे काही शेजारी यापूर्वीच टॉवरमध्ये राहायला गेले. पण आम्ही आजही चाळीतल्या या दहा बाय बारा फुटाच्या घरातच राहत आहोत. पुरेसे पाणी नाही, शौचालयाची कमतरता आणि घरातील कोंदट वातावरण या तुलनेत आम्हाला टॉवरमध्ये हवेशीर घर मिळाले आहे. घरात खेळती हवा आहे. आमच्या स्वप्नातील घर आम्हाला मिळाले आहे. आंबेडकर मार्गावरील न्यू हाजी कासम चाळ ही धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. त्यामुळे माहीमची अल्ताफ मंझिल आणि डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक चाळीतील आम्हा भाडेकरूंना संक्रमण शिबिरात न जाता थेट तिथल्या तिथेच नव्या घरात जायला मिळतेय याचा आनंद अधिक आहे.- प्रणाली मालोजी पोफळे, न्यू हाजी कासम, रूम क्रमांक सहा
शेवटचे दिवस टॉवरमध्ये
१९४४ साली सानेगुरुजींसह विभागातील स्वच्छता करण्यासाठी आम्ही गटार साफ केले होते. सानेगुरुजींचा सहवास आम्हाला लाभला होता. तेव्हापासून या चाळीत राहतोय. पण आता नव्या घराचा ताबा मिळणार हे ऐकून आनंद झालाय. पूर्वी छोटय़ाशा घरात १५-१५ माणसे राहायचो. आता मोठे घर मिळणार असल्यामुळे तिथे कधी राहायला जातोय असे वाटू लागले आहे.- अंकुश रामचंद्र सातार्डेकर, न्यू हाजी कासम चाळ
आम्ही स्वत:ला नशीबवान समजतो
साडेतीन वर्षे संघर्ष केल्यानंतर घराचे स्वप्न पूर्ण होते आहे, हे ऐकून आनंद झाला. आता आम्ही टॉवरमध्ये राहायला जाणार आहोत. त्यामुळे निश्चित आनंद आहे. अपेक्षेपेक्षा विकासकाकडून अधिकच मिळत असून त्यांचे धन्यवाद मानावे लागतील. मात्र मुंबईतील पहिल्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये आमच्या चाळीचा सामावेश झाला आहे, हा एक मानाचा तुराच आहे. त्यामुळे आम्ही स्वत:ला नशीबवान समजतो.- प्रथमेश प्रवीण खामकर, न्यू हाजी कासम चाळ, रूम क्रमांक २०
लाइफस्टाइल बदलली
पूर्वी न्यू हाजी कासम चाळीत राहताना त्या छोटय़ा घरात रोज पहाटे चार वाजता पाण्यासाठी उठावे लागायचे. बसायला जागा नाही, की मुलांना अभ्यास करण्यासाठी शांतता नाही. त्या तुलनेत आज टॉवरमध्ये राहताना २४ तास पाणी, घरात शौचालय, मोकळी हवा, प्रशस्त जागा यामुळे चाळीतले ते जीवन बदलून आता टॉवर संस्कृतीतील जीवनाला सुरुवात झाली आहे. जुन्या चाळीत मी दुस-या मजल्यावर राहायचो. एका अपघातात माझ्या पायाला दुखापत झाली होती. मात्र त्या अवस्थेतही दोन मजले चढून जावे लागे, शौचालयाला जाताना गैरसोय होत होती. पण इथेच लिफ्ट आहे, घरातच शौचालय आहे. प्रशस्त जागा आहे. मुख्य म्हणजे आता पहाटे चार वाजता उठण्याची गरज नाही. २४ तास पाणी असल्यामुळे पाण्याची तर चिंताच मिटली आहे. शिवाय मुलांना अभ्यासासाठी वेगळी जागा मिळाली आहे. चाळीप्रमाणे अशांतता नाही. महत्त्वाचे म्हणजे चाळीतल्या घरात बायकोच्या घरची मंडळी आली तरी अध्र्या-पाऊण तासात निघून जायची. पण आता तेही या ठिकाणी राहायला येऊ लागले, यापेक्षा अधिक काय हवेय. एखाद्या विक्रीच्या इमारतीमध्ये घर घेऊन ज्या सुविधा मिळतात, त्या आम्हाला पुनर्वसनाच्या इमारतीत दिल्या गेल्या आहेत. पॅसेजमध्ये लाइट आणि त्याची स्वतंत्र व्यवस्था, स्वयंचलित अग्निप्रतिबंधक यंत्रणा, सिंडलर कंपनीची स्वयंचलित लिफ्ट, टॉवरमधील ही आमची खऱ्या अर्थाने दिवाळी असून माझ्या आणि बायकोच्या घरचेही दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहेत. – शंकुतला आणि व्यंकटेश हनुमंत घनाते, न्यू हाजी कासम चाळ (पुनर्वसन : विघ्नहर्ता को-ऑप. सोसायटी)
नरकातून स्वर्गात आल्याचे समाधान
जुन्या चाळीत ८० चौरस फुटाच्या घरात राहायचो. आता आहे त्या सामानासह टॉवरमधील घरात राहायला आलो. एका पैशाचे काम केले नाही. विकासकाने फ्लोरिंगसह, किचन आणि रंगरंगोटी एवढय़ा चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे, की नूतनीकरण न करताही राहू शकतो. नाही तर पुनर्वसनाच्या इमारतीत नूतनीकरणाचे काम केल्याशिवाय राहण्याची इच्छा होत नाही, पण आमच्या टॉवरमध्ये तसे नाही. ज्याची खर्च करायची ऐपत नाही, ते कुटुंबही एकही पैसा खर्च न करता आलिशान फ्लॅटचा आनंद घेत संसार करू शकते. महत्त्वाचे म्हणजे मी देवी महालक्ष्मीचा भक्त आहे. त्यामुळे महालक्ष्मीच्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय माझा दिवस उजाडत नाही. पण आता तर घरातून महालक्ष्मीचे देऊळ दिसते. सकाळ झाली की त्या देवळाच्या दिशेने नमस्कार करतो. खरंच विकासकाचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांनी आम्हाला नरकातून या स्वर्गात आणून ठेवले आहे. – सुधीर गणेश तेंडुलकर, न्यू हाजी कासम चाळ (पुनवर्सन : विघ्नहर्ता को-ऑप.सोसायटी)
टॉवरमधील पहिला भाडेकरू
या टॉवरमध्ये पहिला येऊन राहण्याचा मान मला मिळाला आहे. आज संपूर्ण मुंबई मी फिरलो आहे. अनेक पुनर्विकासांत वाद आहेत. त्यामुळे त्यांच्या योजनाही रखडलेल्या आहेत. परंतु आजवर बांधण्यात आलेल्या पुनर्वसनाच्या इमारतींमध्ये भाडेकरूंना विक्रीच्या इमारतीप्रमाणे सोयी-सुविधा देणारी ही एकमेव योजना आहे. अनेक वेळा विकासक अॅग्रीमेंट करताना भाडेकरूंना अनेक आश्वासने, वचने देतात, पण प्रत्यक्षात तशी कृती करतातच असे नाही. पण या विकासकाने आश्वासने दिलीच नाही, तर त्याप्रमाणे घरेही बांधून दिली. त्यामुळे दिलेल्या शब्दाला जागणारा असा हा विकासक आहे. – जनार्दन राघोबा सावंत, न्यू हाजी कासम चाळ (पुनर्वसन : विघ्नहर्ता को-ऑप. सोसायटी)