विक्रमी मतदानामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत.
श्रीनगर/रांची- विक्रमी मतदानामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. या दोन्ही राज्यात तब्बल पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली.
दहशतवादी हल्ले, सीमा भागात होणारा गोळीबार आणि १०० वर्षातील सर्वात मोठ्या महापूरामुळे न खचता जम्मू-काश्मीरमधील मतदारांनी विक्रमी मतदान केले. तर नक्षलग्रस्त असलेल्या झारखंडमधील मतदारांनी देखील बुलेटला नकार देत मोठ्या प्रमाणात मतदान केले. दोन्ही राज्यात जवळ जवळ ६६ टक्के मतदानाची नोंद झाली. जम्मू काश्मीरमधील विधानसभेची मुदत १९ जानेवारी रोजी तर झारखंड विधानसभेची मुदत तीन जानेवारी रोजी संपणार आहे.
जम्मू काश्मीरमध्ये तर ८७ जागांवर गेल्या २७ वर्षातील विक्रमी मतदानाची नोंद झाली. राज्यात सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स, मुख्य विरोधी पक्ष असलेला पीडीपी, बीजेपी आणि काँग्रेस या पक्षांमध्ये मुख्य स्पर्धा आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होतात की पीडीपी बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. पीडीपीकडून मुफ्ती मोहम्मद सय्यद हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. राज्यातील ८२१ मतदारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मंगळवारी होणार आहे.
२००८च्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक २८ जागांवर विजय मिळवला होता. तर पीडीपीने २१ जागा मिळवल्या होत्या.
झारखंड-
नक्षलग्रस्त झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांसाठी ६६.०३ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी राज्यातील एक हजार १३६ जणांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.
२०००मध्ये बिहारपासून स्वंतत्र झालेल्या या राज्याने गेल्या १४ वर्षात नऊ सरकारे पाहिले आहेत. तर तीन वर्ष राष्ट्रपती राजवटही पाहिली आहे. २००५ आणि २००९मध्ये स्पष्ट बहुमताअभावी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास आहे. पण त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असणार आहे ते भारतीय जनता पक्षाचे.
८१ जागांपैकी सत्ताधारी जेएमएमने ७९, भाजपने ७२, त्याचा मित्रपक्ष एजेएसयूने सहा, काँग्रेसने ६२, राजदने २२ आणि जेडीयूने ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपने प्रत्येकी १८ जागा, काँग्रेसने १३, जेव्हीएन(पी)ने ११ जागांवर विजय मिळवला होता. तर एजेएसयुने सहा, राष्ट्रीय जनता दलाने पाच व जनता दल संयुक्तने दोन जागा मिळवल्या होत्या.