महापौरांच्या अधिकारात अर्थसंकल्पात करण्यात येणा-या ५० कोटी रुपयांच्या विकास निधी वाटपात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप केल्याची स्पष्ट कबुलीच महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमक होत स्थायी समितीत गोंधळ घातला.
मुंबई- महापौरांच्या अधिकारात अर्थसंकल्पात करण्यात येणा-या ५० कोटी रुपयांच्या विकास निधी वाटपात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप केल्याची स्पष्ट कबुलीच महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमक होत स्थायी समितीत गोंधळ घातला. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या सर्व वृत्तांची कात्रणेच समितीच्या बैठकीत फडकावून शिवसेनेने उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली.
परंतु या गोंधळातच अध्यक्षांनी कामकाज आटोपून घेतल्यामुळे संतप्त विरोधकांनी कात्रणांच्या प्रतीच अध्यक्षांच्या अंगावर भिरकावून निषेध नोंदवला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर महापौर दालनावर ही कात्रणे चिकटवून जोरदार घोषणाबाजी करतच त्यांनी संपूर्ण मुख्यालयात फिरून शिवसेनेच्या कारभाराची शोभा काढली.
मुंबई महापालिकेच्या २०१६-१७च्या अर्थसंकल्पात महापालिका सभागृहाच्यावतीने तरतूद करण्यासाठी ५० कोटी रुपये आयुक्तांनी दिले. या विकास निधीचे वाटप महापौर स्नेहल आंबेकर यांनी करताना शिवसेनेला ३४ कोटी रुपये आणि भाजपाला १० कोटी अशा प्रकारे तब्बल ४४ कोटी रुपये लाटले आणि विरोधकांची मांडवली केवळ ६ कोटींमध्ये केली. त्यामुळे विरोधी पक्षाने टक्केवारीचे आरोप केले होते. त्यावर महापौरांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना या विकास निधीचे वाटप पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निकषानुसारच केले असल्याचे सांगितले.
याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सर्व वृत्तपत्रांमधील वृत्तांच्या कात्रणांची जम्बो झेरॉक्स फडकावत ‘पैसा बोलता है’ असा आरोप केला. या वेळी विरोधी पक्षनेत्यांनी ही सर्व कात्रणे अध्यक्षांना भेट दिली. मात्र, या प्रकरणी खरे काय ते शिवसेनेने सांगावे, निधी वाटपासंदर्भात महापौरांनी माफी मागावी, अशी मागणी करत विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, सपाचे रईस शेख, काँग्रेसचे आसिफ झकेरिया, वकारुनिस्सा अंसारी, राष्ट्रवादीचे सुनील अहिर, मनसेच्या अनिषा माजगावकर आदींनी उभे राहत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळात अध्यक्षांनी विषय पुकारत प्रस्ताव मंजूर केले.
या गोंधळानंतर या सर्वानी महापौरांच्या कार्यालयावर हल्लाबोल करत सर्व कात्रणे महापौर दालनातील दरवाजावर चिकटवत जोरदार घोषणाबाजी केली. ‘ये ऑफिस नहीं, दुकान है’ अशा घोषणा देत दालनाबाहेरच सर्वानी ठिय्या मारला. त्यानंतर प्रत्येक समिती अध्यक्षांची दालने, अतिरिक्त आयुक्तांची कार्यालये आणि खात्यांच्या कार्यालयांमध्ये ही कात्रणे झळकावत महापौर आणि शिवसेनेच्या प्रतापाचा डंका पिटला.
निधी वाटपात असमानता ही केवळ टक्केवारीसाठीच झालेली आहे. त्यामुळे जर हे उद्धव ठाकरेंनी दिलेल्या निकषानुसार झाले असेल तर त्याचा निषेध असून वृत्तपत्रांमधील या बातम्यांबाबत त्यांनी स्वत: उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली.
उद्धव ठाकरेंचा हस्तक्षेप भाजपाला अमान्य
महापौरपद हे सर्वोच्च असून ते सार्वभौम आहे. त्यामुळे त्या पदाचा आदर आणि सन्मान राखला पाहिजे. अर्थसंकल्पात विकास निधीचे वाटप करण्याचा अधिकार हा महापौरांचा आणि सभागृहाचा आहे. त्यामुळे या निधी वाटपात जर कुणा बाहेरच्या व्यक्तीने हस्तक्षेप केला असेल तर आम्हाला तो मान्य नाही, अशा शब्दांतच भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधले. विकास निधी हा सेवा-सुविधांच्या कामांसाठी दिला जातो. त्यावर नगरसेवकांचा अधिकार आहे. तो कोणत्याही टूरटूरसाठी दिला जात नाही, असाही टोलाही त्यांनी मारला.
सभागृहनेत्यांकडून केवळ सारवासारव
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठरवून दिलेल्या निकषानुसारच विकास निधीचे वाटप झाले, असे विधान करणा-या महापौरांची पाठराखण पुन्हा एकदा सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी करून सारवासारवीचा प्रयत्न केला. विरोधकांच्या गोंधळाला उत्तर द्यायची आमची तयारी होती.
त्यासाठी आम्ही काँग्रेससह विरोधकांना हरकतीचा मुद्दा घेण्यास सांगितले होते. जर त्यांनी हरकतीचा मुद्दा घेतला असता तर याचे उत्तर आम्ही दिले असते. पण ते उत्तर ऐकण्याची मानसिकता नाही. त्यांना केवळ गोंधळच करायचा असतो, असे सांगत विश्वासराव यांनी पक्षप्रमुख म्हणून आम्हा सर्वच नेत्यांना ते सूचना करत असतात. आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कामकाज करत असल्याचे स्पष्ट केले.