रत्नागिरी शहरापासून अवघ्या १२ कि. मी. अंतरावर केळय़े गाव वसलेले आहे. या गावाला पेशवेकालीन वाडय़ाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावातील हिंदू-मुस्लीम समाजातील एकजूट हे गावचे खास वैशिष्टय़ आहे. केळय़े गावचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवलाई-वाघजाई गावचे ग्रामदैवत आहे. पूर्वी केळय़े गाव फार दुर्लक्षित होते.
रत्नागिरी- रत्नागिरी शहरापासून अवघ्या १२ कि. मी. अंतरावर केळय़े गाव वसलेले आहे. या गावाला पेशवेकालीन वाडय़ाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावातील हिंदू-मुस्लीम समाजातील एकजूट हे गावचे खास वैशिष्टय़ आहे. केळय़े गावचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवलाई-वाघजाई गावचे ग्रामदैवत आहे. पूर्वी केळय़े गाव फार दुर्लक्षित होते. परंतु, बदलत्या जगासोबत बदल घडवून केळय़े गावाने स्वत:चा विकास घडवून आणला. गावापर्यंत रस्ता आणून दुर्लक्षित केळय़े गाव आता शहरासमीप आले आहे.
केळय़े गावाची निर्मिती झाली तेव्हा गावची लोकसंख्या अवघी ३०० ते ४०० इतकीच होती. सध्या गावची लोकसंख्या दोन हजाराच्या घरात पोहोचली आहे. बदलते राहणीमान आणि गावापर्यंत पोहोचलेल्या सोयीसुविधा यामुळे गावातील तरुण आता गावातच स्थिरावू लागला आहे. याचा परिणाम गावचे राहणीमान आणि दरडोई उत्पन्नातही भर पडली आहे. केळय़े गाव धार्मिक वारसा जपणारा गाव समजला जातो. म्हणूनच गावात नवलाई, लक्ष्मीकांत, काशी विश्वेश्वर, गणपती, मारुती, सूर्य मंदिर, विठ्ठल-रखुमाई, राधाकृष्ण, महालक्ष्मी यांची देवस्थाने आहे. प्रत्येक सण गावात मोठय़ा उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येतो. याशिवाय गावातील शिमगोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्याची परंपरा फार वर्षापासून जपली जात आहे. श्रावण महिन्यात लक्ष्मीकांत मंदिरात तीन दिवसांचा सप्ताह साजरा करण्यात येतो. तसेच केळय़े गावातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला उरूस हे देखील या गावचे एक वैशिष्टय़ आहे. पाळंदे वाडीतील ग्रामदैवतेचे मंदिर जागृत असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
गावाच्या निर्मितीनंतर काहीकाळ शैक्षणिक सुविधांची वानवाच होती. परंतु, वाढत्या लोकसंख्येसोबत शैक्षणिक सुविधांमध्येही मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. गावातील विद्यार्थ्यांसाठी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा, एस. वाय. गोडबोले हायस्कूल यासह केळय़े पडय़ारवाडी, बौद्धवाडी आणि केळवाडी या तीन ठिकाणी अंगणवाडय़ांची उभारणी करण्यात आली आहे.
१९५७ साली केळय़े ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. १९६५ साली ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या सरपंचांनी कामकाजाची प्रत्यक्ष सुरुवात केली. निसर्गसंपन्न आणि डोंगरद-यांमध्ये वसलेला केळय़े गावाला प्राथमिक सुविधांसाठी थोडी प्रतीक्षाच करावी लागली. आजी-माजी सरपंचांनी दिलेल्या योगदानामुळे गाव सध्या विकासाच्या वाटेवर आले आहे. आजही गावातील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय बागायती शेती हाच आहे. यामध्ये आंबा, काजूसह गावात भातशेतीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. आजही गावात पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. एप्रिल आणि मे महिन्यात गावात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवतो. निम्म्या गावात या टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होतो. केळय़ेवाडी गावचा केंद्रबिंदू समजला जातो. या ठिकाणी मशीद आणि उर्दू शाळा आहे. पडय़ारवाडीत शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय आणि विविध मंदिरे आहेत.
गावात सहाशे वर्षापूर्वीचा पेशवेकालीन वाडा आहे. वाडा जुना झाल्याने सध्या जीर्ण झाला आहे. गावातील टिळक आळीत मोठय़ा प्रमाणावर शेती करण्यात येते. लिली फुलांच्या शेतीसह आंब्याच्या बागा आणि गांडूळ खत निर्मितीचा व्यवसायही याच आळीत आहे. याशिवाय सोनचाफा शेतीचा प्रकल्प देखील टिळक आळीत आहे. या ठिकाणी तयार होणारी उत्पादने गावातून रत्नागिरी शहराकडे आणून विकली जातात. केळय़ेतील बौद्धवाडीत बौद्धविहार आहे. डोंगरामध्ये नवलाई देवीचे माहेरघर आहे. केळय़ेपासूनच जवळ रामेश्वराचे मंदिर आहे. गावाजवळच नदी असून ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जात अरबी समुद्राला मिळते. आंबेकोंड येथे गणपती मंदिर आहे.
गावात तीन अंगणवाडय़ा आहेत; परंतु जागांची उपलब्धता नसल्याने या अंगणवाडय़ा आजही भाडय़ाच्या जागेतच भरतात. तसेच शाळेची इमारत व्हावी यासाठी ग्रामस्थांनी जोरदार मागणी सुरू केली आहे. गावात बचत गटांची संख्या मोठी आहे. या बचतगटांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न गावाकडून सुरू आहेत.