उन्हाळयाचा कडाका वाढला की मन आणि पाय आपोआपच थंड हवेच्या प्रदेशाकडे वळतात. गेल्या काही वर्षामध्ये राज्याबाहेरील पर्यटन व्यवसाय वाढीस लागल्याने मोठया संख्येने पर्यटक कुलू मनालीपासून अगदी काश्मिर ते परदेशातील थंड हवेची ठिकाणे फिरायला बाहेर पडतात. ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी महाबळेश्वर हे अगदी जवळचे थंड हवेचे ठिकाण आपलेसे वाटते.
उन्हाळयाचा कडाका वाढला की मन आणि पाय आपोआपच थंड हवेच्या प्रदेशाकडे वळतात. गेल्या काही वर्षामध्ये राज्याबाहेरील पर्यटन व्यवसाय वाढीस लागल्याने मोठया संख्येने पर्यटक कुलू मनालीपासून अगदी काश्मिर ते परदेशातील थंड हवेची ठिकाणे फिरायला बाहेर पडतात. ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी महाबळेश्वर हे अगदी जवळचे थंड हवेचे ठिकाण आपलेसे वाटते. परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवासीयांसाठी त्याहीपेक्षा जवळचे एक ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे, स्वत:चं निसर्ग सौंदर्य जपताना आपले वेगळेपण टिकवून आहे, मात्र त्याकडे आजही पर्यटकांसह राज्यकर्त्यांचे म्हणावे तितक्या गांभीर्याने लक्षच गेलेले नाही हि खंत आहे.
लांजा तालुक्यातील माचाळ या समुद्रसपाटीपासून ४०००फूट उंचीवर असलेल्या ठिकाणाचा विकास दीड किलोमीटर रस्त्यासाठी खुंटला आहे, तो रस्ता पुर्ण झाला तर हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांसाठी खुले होणार आहे. मात्र त्यासाठी लागणारी मानसिकता आणि त्यामागे दडलेली केवळ व्यावसायिक वृत्ती या विकासाच्या आड येत आहे. माचाळ परिसराची श्रीमंती जगासमोर यावी यासाठी लांजाचे माजी आमदार कै. स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव सावंत आणि त्यांच्या पश्चात त्यांचे सुपूत्र विवेक सावंत अग्रक्रमाने प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या या धडपडीला राज्यकर्त्यांची म्हणावी तशी साथ अद्याप मिळालेली नाही..
आंबा, काजू, मासे हे कोकणचे आर्थिक स्त्रोत आहेत. याच मुख्य व्यवसायावर कोकणातील बहुतांश पिढ्या सुखनैव राहात आहेत. मात्र मोजक्याच मंडळींच्या हातात हे व्यवसाय स्थिरावले असल्याने येथील आर्थिक विषमता नक्कीच आहे. त्यातही हा व्यवसाय हवामानावर अवलंबून असल्याने त्याच्या लहरीपणाचा मोठा फटका व्यावसायिकांना दरवर्षी बसत असतोच. यावेळी कोकणात सर्वाधिक संधी असलेला पर्यटन व्यवसाय अधिकाधिक विकसित होणे अधिक गरजेचे झाले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. नारायण राणे यांनी जसा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय विकसित केला आहे तशा प्रकारच्या पर्यटन विकासापासून रत्नागिरी जिल्हा फारच दूर राहिला आहे.
श्रीक्षेत्र गणपतीमुळे पाठोपाठ पावस, दापोली, गुहागरचे समुद्रकिनारे इतपतच हा पर्यटन व्यवसाय स्थिरावला असून हळूहळू त्याचा विकास होत असला तरीही त्याचा वेग मात्र अत्यंत कमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक अशी स्थळे आहेत जी अद्यापही विकासापासून खूपच दूर राहिली आहेत. त्यातीलच एक आणि रत्नागिरीतील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेले लांजा तालुक्यातील माचाळ होय! महाबळेश्वर, माथेरान ते सिंधुदुर्गच्या आंबोलीच्या मध्येच रत्नागिरीमध्ये हे माचाळ स्थिरावले आहे.
निसर्गाने इथे भरभरून वरदान दिले आहे. इथला सुर्योदय, सूर्यास्त, इथला मेघझिम्मड पाऊस, इथल्या श्रावणधारा, अंगाला झोंबणारा वारा, डोंगरकपारीतुन डोकावणारे धुके सारे काही पर्यटकांना खुणावणारे आणि स्वर्गाचा आनंद देणारे आहे. समुद्रसपाटीपासून जवळजवळ ४००० फूट उंचीवर असलेले हे माचाळ म्हणजे माळरानच आहे. सह्याद्रीच्या एका सपाट माळपट्टीवर हे ठिकाण वसले आहे. याच्या समोरच ऐतिहासिक विशाळगड असून सह्याद्रीच्या मूळ डोंगररांगेतून अवघ्या एका दरीने माचाळ आणि हा गड वेगळा झाला आहे. याच्या माथ्यावर साडेतीन मैल लांब आणि दिड मैल रूंद एवढे प्रचंड पठार असून १५०० एकरचा सडा आहे. इथे बाराही महिने स्वच्छ आणि थंड हवा वाहते, भरपूर मुबलक पाण्याची इथे उपलब्धता आहे.
शहरी भागापासून लांब असलेल्या या ठिकाणची गुढ निरव शांतता पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाची गोष्ट आहे. केवळ निसर्ग सौंदर्यानेच नव्हे तर या स्थळाला पौराणिक महत्त्वही अधिक आहे. ही भूमी श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे असे मानले जाते. येथे मुचकुंद ऋषींची असलेली गुहा पर्यटकांसाठी आकर्षण आहे. पुराण कथेपासून माचाळ पठाराच्या पश्चिमेला असलेल्या या गुहेमध्ये मुचकुंदी ऋषि योगसाधना करत असे मानले जाते. त्यांच्या साधनेवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण इथे अवतरले आणि त्यांना दर्शन दिले असे मानतात. त्यामुळे भगवंतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आहे.
मुचकुंदी ऋषिंचे पौराणिक देऊळ गुहेच्या तोंडाशी उभे आहे. विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे इथे पहाता येतात. विविध प्रकारची दुर्मिळ वनस्पती, झाडे येथे असून लोकांनी इथे पारंपरिक देवराई जपली असून त्याचे एकही पान तोडले जात नाही. माचाळ येथे गहू हे पीक होते हे विशेष आहे. सर्वाधिक कुणबी समाज येथे वसलेला असून भात, नागली ही पिके आहेत.
काजळी आणि मुचकुंदी या दोन नद्या लांजा तालुक्यातून वाहतात. मुचकुंदी नदीचं उगमस्थान माचाळच्या माथ्यावर आहे. नैसर्गिक उतारामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीचा या परिसराला कोणताही धोका संभवत नाही. लांजा तालुक्यातील झापडे, बेर्डेवाडी, व्हेल, पन्हाळे अशा धारणांमुळे येथे बाराही महिने मुबलक पाणी असते. निसर्गाने या परिसरावर कृपादृष्टी केली आहे. माचाळला आंबा घाटातून जाता येते. माचाळ ते लांजा हे अंतर अवघं ३२ कि.मी. आहे तर तळवडे रेल्वे स्टेशनपासून हे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानक माचाळच्या दक्षिण- पूर्वेला ८० किमी वर आहे आणि रत्नागिरी- कोल्हापूर हायवेवरून १२-१३ कि.मी. एवढे अंतर आहे. चारही बाजूंनी या ठिकाणी जाणे सहज सोयीचे आहे.
निसर्गाने इथे भरभरून दान दिले आहे म्हणूनच इथे पर्यटनाच्या नवनव्या संकल्पना रूजविता येणे शक्य आहे. इको टूरिझमसाठी हे स्थळ उत्तम असून सह्याद्रीच्या सान्निध्यात इथे पर्यटक नक्कीच रमणार आहे. कृषी आणि ग्रामीण पर्यटन वृध्दीसाठी माचाळ हे ठिकाण अत्यंत योग्य ठिकाण म्हटले पाहिजे. इथला अगत्यशील ग्रामस्थ त्यांच्या शेतात पिकलेल्या ताज्या भाज्या आणि फळे यांची चव तुम्हाला नक्कीच चाखायला देईलच परंतु त्यांच्या लोककलांचा अनोखा आनंदही इथेच मिळेल. यातूनच इथल्या जनतेला, युवकांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे.
गिर्यारोहण, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग राफ्टींग सारखे साहसी खेळ येथे सुरू करता येऊ शकतात. माचाळचे पठार हे नैसर्गिक गोल्फ कोर्सच आहे. त्याशिवाय पूर्वापार सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशात घोडेस्वारी हे प्रवासाचे साधन होते. तेच साधन पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. मुचकूंदी ऋषिंचे देऊळ पौराणिक महतीचे काम करेल.
याचे खरे महत्त्व ओळखून या परिसराचा विकास व्हावा यासाठी माजी आमदार माजी स्वातंत्र्यसैनिक कै. शिवाजीराव सावंत यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपूत्र विवेक सावंत यांच्यासह दिलीपभाऊ पळसुलेदेसाई, सुधीर जोशी, श्रीकृष्ण हेगिष्टे, आत्माराम चव्हाण, चंद्रकांत पांचाळ, रवींद्र खामकर, हं.श. सप्रे, सुरेश शिगम आणि त्यांच्या सहका-यांनी यासाठी प्रयत्न केले. हे शासन पातळीवर या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी अद्यापपर्यंत प्रयत्नशील आहेत.
सन १९७२ साली कै. आ. सावंत यांच्या प्रयत्नाने रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम सुरू झाले होते. मात्र ते अर्धवट राहिले. तेव्हापासून अद्यापपर्यंत इथले दळणवळण हा मुद्दा ऐरणीवरच राहिला आहे. ७ एप्रिल १९९९ च्या शासन निर्णयानुसार पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्यात आला. सन २००० मध्ये झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये शासनाने व्हिजन २००० या कार्यक्रमाद्वारे वेगवेगळया विषयांवरील संस्था करण्यास उद्युक्त केले होते. याच उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सहकारी संस्था स्थापन झाली. माथेरान, महाबळेश्वर यानंतर आखीव रेखीव गिरिस्थान नव्हते म्हणून ३००० फूटांवरील विशालगडाची पार्श्वभूमी असलेल्या माचाळ या दुर्गम गावाची पर्यटन स्थळ म्हणून निवड केली गेली. सुरूवातीला ‘क’ वर्गीय पर्यटन स्थळाला पर्यटन संस्थेमार्फत पाठपुरावा केल्यानंतर ‘ब’ वर्गीय गिरीस्थान म्हणून या स्थळाला मान्यता मिळाली.
जिल्हा नियोजन मंडळाकडून १७ कोटींचा विकास आराखडाही मंजूर झाला. त्यातील साडेचार कोटी रूपये विविध योजनेतून माचाळ विकासावर खर्च झाले. २००५ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाला माचाळ येथे वृक्षलागवडीचे आदेश तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी दिले. त्यानंतर या स्थळाला हिलस्टेशनचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत या स्थळाचा समावेश व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अद्यापपर्यंत या योजनेत माचाळचे नाव समाविष्ट केले गेलेले नाही. अद्यापही या स्थळाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. येथे राहणारे ग्रामस्थ आजही या प्रगत काळामध्ये रस्त्यासारख्या मूलभुत व्यवस्थेसाठी झगडत आहेत.
माचाळ येथे रस्ता प्रस्तावित करण्याचा आग्रह करण्यात आला. तेथे अर्धवट रस्ताही बांधण्यात आला. तो तसाच पडून राहिला आहे. आजही इथले ग्रामस्थ अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. त्यांच्या मुलभूत हक्कांसाठी झगडत आहेत.
असे असले तरीही जिल्ह्यातील हे एकमेव पौराणिकदृष्ट्या, नैर्सगिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले स्थळ विकसित व्हावे यासाठी येथील लोकप्रतिनिधी आणि शासन, प्रशासन फारसा पुढाकार घेताना दिसत नाही. जितक्या मंद गतीने जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांचा विकास होत आहे त्याहीपेक्षा कमी गतीने माचाळचा विकास होत आहे. वास्तविक हे पर्यटनस्थळ हिलस्टेशन म्हणून मान्य झाले आणि येथे विकास केला गेला तर लांजासह जिल्ह्याचा पर्यटन चेहरा विकसित होणार आहे.