जनतेच्या जेवणातील रोजच्या कांद्याच्या भावाने आता प्रचंड उसळी घेतली असून कांद्याचे आगार समजल्या जाणा-या नाशिक जिल्ह्यांतील सर्व बाजारपेठांमध्ये घाऊक कांद्याचे भाव शुक्रवारी क्विंटलमागे ५ हजार २०० रुपयांवर धडकले.
मुंबई – जनतेच्या जेवणातील रोजच्या कांद्याच्या भावाने आता प्रचंड उसळी घेतली असून कांद्याचे आगार समजल्या जाणा-या नाशिक जिल्ह्यांतील सर्व बाजारपेठांमध्ये घाऊक कांद्याचे भाव शुक्रवारी क्विंटलमागे ५ हजार २०० रुपयांवर धडकले. हा कांदा शहरी भागात पोहोचेपर्यंत त्याच्या किमतीत दीड पटीने वाढ होत असल्याने मुंबईतील किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव ६५ ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचले. सरासरी कांद्याचे भाव मुंबई आणि शहरी विभागात ७० रुपयांवर येऊन स्थिरावल्याने ‘हेच का अच्छे दिन’ असा सवाल आता जनता करू लागले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या २० टक्केच चांगल्या प्रतीचा कांदा विक्रीला येत आहे. त्यामुळे गेल्या आठवडयातील ३ हजार ४०० ते ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दर असलेल्या कांद्याची आवक घटली. त्यामुळे या आठवडयात १ हजार ७०० रुपयांनी प्रति क्विंटल वाढ होऊन शुक्रवारी किमान ४ हजार ८००, तर कमाल ५ हजार ५०० आणि सरासरी ५ हजार २०० रुपये भावाने कांद्याची घाऊक बाजारात विक्री झाला. हा कांदा मुंबई आणि शहरी भागात येईपर्यंत ६५ ते ७५ रुपये प्रति किलो दरापर्यंत पोहचला आहे.
मुंबईच्या किरकोळ मंडईमध्ये सरासरी ७० रुपये किलोवर कांदा विकला जात आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. मात्र यावर्षी कांद्याच्या मुख्य उत्पादक क्षेत्रालाच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले.
त्यामुळे कांदा उत्पादनामध्ये ३० ते ३५ टक्के परिणाम झाल्याने बाजार समितीमध्ये जुलै महिन्यापासूनच आवक घटली आहे. सध्या चांगल्या प्रतीचा कांदा केवळ २० टक्के येत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात वाढ होऊ लागली आहे. या वर्षी पाऊस लांबल्याने नवीन कांद्याची रोपे तयार आहेत. मात्र अद्याप लागवड होऊ शकलेली नसल्याने पुढील काही काळ तरी कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे.
सध्याची कांद्याची स्थिती
» कांदा दरवाढीची परिस्थिती अजूनही वीस ते पंचवीस दिवस राहण्याचा अंदाज व्यापारी आणि तज्ज्ञ वर्तवत आहेत.
» सध्या कर्नाटकमध्ये कांद्याची आवक वाढत असल्याने महाराष्ट्रातील कांदा दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा एक आशेचा किरण आहे.
» पावसाच्या ओढीमुळे पुढील हंगामालाही फटका बसण्याची शक्यता आहे. कांदा लागवडीसाठी सध्या रोपे तयार असून पाऊसच नसल्याने कांदा लागवड होऊच शकत नसल्याने शेतक-यांची रोपे वाया जाण्याची भीती आहे.
» केंद्राने दहा हजार टन कांद्याची त्वरित आयात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, देशाची मागणी आणि आयात यांचे गणित जुळण्याची शक्यता कमी असल्याने नजीकच्या काळात कांद्याचे भाव कमी होणे अवघड असल्याची चर्चा कांद्याच्या घाऊक व्यापा-यांमध्ये आहे.