होळीचे रंग उधळताना वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवणा-या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
मुंबई – होळीचे रंग उधळताना वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवणा-या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, विनाहेल्मेट, ट्रिपल सिट यांसारख्या विविध कारणांस्तव गुरुवारी ही विशेष कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे नियम मोडल्याने होणा-या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
रंगपंचमीला सकाळपासूनच अनेक ठिकाणी विविध पाटर्य़ाचेदेखील आयोजन करण्यात येते. त्यामुळे अनेक जण मद्यप्राशन करून वाहन चालवतात. तर काही जण विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, सिग्नल मोडणे आणि इतर वाहतुकीचे नियम सर्रास मोडतात. अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मुंबई आणि उपनगरातील मुख्य रस्त्यांसह चौकाचौकात सापळे रचले होते. यात सकाळी ८ ते सायंकाळी ४ दरम्यान केलेल्या तपासणीत तब्बल ४ हजार ९४६ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.
यात विनाहेल्मेट प्रवास करणा-यांची संख्या सर्वाधिक ३६३५ एवढी होती. ट्रिपल सिट २८५, मद्यप्राशन करून वाहन चालवणारे २१७, बेदरकारपणे गाडी चालवणारे ३० आणि इतर ७७९ जणांनी वाहतुकीचे विविध नियम तोडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती. दरम्यान, या कारवाईत नियम मोडणा-या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र वारंवार कारवाई केली जात असतानादेखील नियम मोडणा-यांची संख्या घटत नाही. यात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.