वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघत नसल्याने जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी १० वाजता करळ फाटा येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.
उरण – वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघत नसल्याने जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी १० वाजता करळ फाटा येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे येथील वाहतूक ठप्प झाल्याने जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना मात्र ऐन हिवाळ्यात चांगलाच घाम फुटला.
राष्ट्रीय महामार्ग ४ ब आणि राज्य महामार्ग ५४ चा रस्त्यांतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून वारंवार सांगूनही जेएनपीटी प्रशासनाला जाग येत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. जेएनपीटीतील तीन पोर्टमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पाìकगची सुविधा नसल्याने ट्रेलर रस्त्यावर उभे राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते.
ट्रेलरसाठी एक लाइन व मोटारसायकल, रिक्षा इत्यादी वाहनांसाठी दुहेरी लाईन असावी, सिंगल लाइनमधून ट्रेलर वाहतूक व्हावी, ट्रेलरने ओव्हरटेक करता कामा नये, ट्रेलर रस्त्यावर उभे राहता कामा नयेत, याची खबरदारी जेएनपीटीने घ्यावी किंवा पर्यायी पार्किंगची सोय करावी, अशी मागणी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केली.
तर ट्रेलरला एकेरी मार्ग जेएनपीटीने केला नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असे उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी जेएनपीटी प्रशासनाला सांगितले.
या आंदोलनामुळे जेएनपीटीची वाहतूक ठप्प झाल्याने अखेर जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी नमते घेतले. जेएनपीटीचे मुख्य सचिव शिबेन कौल, मॅनेजर कुलकर्णी व नॅशनल हायवे अॅथोरिटीचे बारोटे यांनी करळ येथील आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेत चर्चेची तयारी दर्शवली.
नवीन क्रेनची व्यवस्था केली जाईल, सध्या ठिकठिकाणी पुलावर बॅरेकेट्स लावून वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घेऊ, लवकरच पाìकगची सोय पीओबी असलेल्या ठिकाणी करू, येत्या सात दिवसांत वाहतूक कोंडीची समस्या दूर केली जाईल, वाहतूक समस्येविषयी समन्वय समिती नियुक्त केली जाईल व त्यात तिन्ही पोर्टचे अधिकारी, सीआयएफचे अधिकारी व स्थानिक प्रतिनिधी एकत्र येऊन लवकरच जेएनपीटीत बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन सिबेन कौल यांनी या वेळी दिले.
या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, इंटकचे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र घरत, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील आदींनी सक्रिय सहभाग घेतला होता.