कल्याण-डोंबिवली महापालिकेत मृत कर्मचारी जगन्नाथ स्वामी यांच्या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे भलत्याच महिलांना नोकरी व निवृत्तीवेतन दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेत मृत कर्मचारी जगन्नाथ स्वामी यांच्या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे भलत्याच महिलांना नोकरी व निवृत्तीवेतन दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दुस-या एका प्रकरणात खरा वारसदार दाखवून भलत्याच मुलाला नोकरी दिल्याची तक्रार अंबरनाथ पालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक पी. सिद्धार्थन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. जगन्नाथ स्वामी यांच्या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर तीन वर्षानी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. या कुटुंबाला शनिवारी पालिका मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासनाचे उपायुक्त गणेश देशमुख या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणातून काय उलगडतेय, याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
पालिकेत काम करणारा सफाई कामगार जयपाल सुब्रमण्यम हा मृत कामगाराचा खरा वारसदार नाही. त्याचे नाव जयपाल असे दुसरेच आहे. मृत कामगाराचा खरा वारसदार जयपाल हा दक्षिण भारतातील मूळ गावी राहत असून तेथे नोकरीला असल्याची तक्रार नगरसेवक पी. सिद्धार्थन यांनी २००९ रोजी पालिकेत केली होती. मागील तीन वर्षापासून ही चौकशी प्रशासनाच्या फायलीत बंद होती. २००३ रोजी मृत पावलेला पालिकेचा कर्मचारी जगन्नाथ स्वामी याच्या वारसा हक्काच्या जागेवर त्याच्या पत्नीला नोकरीला न लावता बनावट कागदपत्रांच्या आधारे इतर दोन महिलांना नोकरीला लावल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते.
मृत कामगार जगन्नाथच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतल्यानंतर याप्रकरणी अरसन पेरूमलसह धनकोडी कल्लुमूर्ती व मंजू पेरिस्वामी तंगवेल या तिघांना अटक केली होती. तत्कालीन उपायुक्त अजिज शेख, ‘ड’ प्रभाग अधिकारी अनिल लाड, विधी अधिकारी आनंद सूर्यवंशी, लिपिक अरुण बडेकर व पालिकेचे वकिल राव यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. जगन्नाथ स्वामी याच्या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर नगरसेवक पी. सिद्धार्थन यांच्या तक्रार अर्जाची चौकशी पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे खरा जयपाल केाण, याची सखोल चौकशी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. जयपालच्या प्रकरणातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
२०० प्रकरणांची झाडाझडती
मृत कर्मचारी जगन्नाथ स्वामी यांच्या प्रकरणानंतर पालिका प्रशासनाने मागील दोन वर्षापासून वारसाहक्काच्या आधारे नोकरीवर घेतलेल्या सुमारे दोनशे प्रकरणांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. वारसा हक्काच्या सर्व प्रकरणांची नव्याने तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला पालिकेत बोलावून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांचे छायाचित्रही काढण्यात येणार असल्याचे उपायुक्त देशमुख यांनी सांगितले. सरकारच्या नियमानुसार एका महिन्यात वारसाला नोकरी दिली जाते. पालिकेत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे वारसांना नोकरी देण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्यास पोलिस पातळीवर तपास करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.