महाराष्ट्राचे आजचे सर्वश्रेष्ठ नेते शरद पवार यांचा वारसदार कोण? हे काळ ठरवील, असे सुप्रिया सुळे यांनी सांगून टाकले आहे. विविध चॅनलवाल्यांनी शरद पवारांचे वारसदार सुप्रिया सुळे यांनाच घोषित करून टाकले. शरद पवार यांच्या वारसदाराची चर्चा आज तरी निर्थक आहे. दिवसाचे १५ तास काम करणारे शरद पवार यांच्या वारसदाराची चर्चा होऊ शकत नाही. ते घरात बसलेले नाहीत. राजकारण थांबलेले नाही. पक्ष नेतृत्वातून बाजूला नाहीत. राज्यसभेत सक्रिय आहेत. महाराष्ट्रातील शेतक-यांची त्यांना काळजी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट फोन करून विविध प्रश्नांवर चर्चा करणारा हा एकमेव नेता आहे. अशी भेट भाजपामधील नेत्यांनाही सहज शक्य होणार नाही. पंतप्रधानांची भेट शरद पवारांना सहज मिळते. त्यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या सत्काराला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, १६ राज्यांचे मुख्यमंत्री, नेते अशी दिग्गज माणसे उपस्थित होती. तो शरदरावांचा निरोप समारंभ नव्हता.
विनोबा सांगायचे, ‘७५नंतर अनुभवामुळे निर्णय क्षमता परिपक्व होते.’ आज ७७ र्वष लागल्यानंतर महाराष्ट्रभर फिरणारा दुसरा नेता कोण? वाहिनीवाल्यांनी शरद पवारांच्या वारसदाराची चर्चा घडवली किंवा सुप्रियाताईंनी काळाचा निर्वाळा दिला, तरी ही चर्चाच अप्रस्तुत आहे. शरद पवारांची ऊर्जा अशी विलक्षण आहे की, सकाळी आठ वाजता सर्वाच्या भेटीसाठी ताजेतवाने होऊन ते तयार असतात. दिल्लीत मंत्री असतानासुद्धा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतानासुद्धा आणि आता नुसते खासदार असतानासुद्धा त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेटावयास आलेल्यांसाठी त्यांची बेल वाजली की, घडय़ाळात आठ वाजले हे समजावे. पहाटे ५ वाजता उठून व्यायाम, स्नान वगैरे आटोपून, आलेली वृत्तपत्रे वाचून काही बातम्यांवर खुणा करून महाराष्ट्रात लवकर उठणारे कोण, याची पूर्ण माहिती असल्याने ७ वाजता त्यांच्याशी फोनवर संपर्क करून दिवसभराच्या कार्यक्रमावर नजर टाकून, हलका आहार व औषधे घेऊन ८ वाजता खुर्चीत बसून, भेटावयास आलेल्या इतर कोणत्याही नेत्याचे नाव सांगा? भेटावयास आलेल्यांची विचारपूस, गावाकडचा आला असेल तर कधी आलात, कुठे थांबलात? गावात काय चाललंय? अशी ३-४ मिनिटांची माहिती घेऊन त्या माणसांची भेट ते संपवतात. उगाच चकाटय़ा पिटीत बसले आहेत, असे पवारसाहेब कधीच कोणाला दिसले नाहीत.
पटपट निर्णय, भेटीची माणसे मार्गी लावणे. बाजूला एखादे पुस्तक असते, त्यामध्ये खूण घालून ठेवलेली असते. फावल्या वेळात वाचन करणारा असा हा आगळावेगळा नेता आहे. ते जर अजून राजकारणातून निवृत्त झालेले नाहीत तर त्यांच्या वारसदाराची चर्चा होऊ तरी कशी शकते? उलट पुढची ३ वर्षे शरद पवार अधिक सक्रिय होणार आहेत आणि त्यांना सक्रिय व्हावेच लागेल.
लोकसभा निवडणुकीला अडीच वर्षे आहेत. २०१९च्या मे महिन्यात त्या होतील. विधानसभा निवडणुकीला ३ वर्षे आहेत. ऑक्टोबर २०१९ला त्या निवडणुका होतील. त्यामुळे २०१९ ऑक्टोबपर्यंत जरासुद्धा स्वस्थ न बसणारे नेते पवारसाहेब हेच असतील. त्यामुळे शरद पवारांच्या वारसदार पदाची चर्चा निर्थक आहे. पवारसाहेब दिवसाला जेवढे काम करतात आणि दिवाळीचे चार दिवस सोडले तर वर्षाचे ३६१ दिवस २४ तास राजकारण, समाजकारण, त्या तुलनेत या पदावरील नेत्यांनी अर्धे काम केले तरी महाराष्ट्रात सत्ताधा-यांना पराभूत करणे अवघड नाही. त्यामुळे सुप्रियाताईंना विनंती की, त्यांनी २०१९ पर्यंत आता शरद पवार यांच्या वारसदाराची चर्चा करू नये.
तीन वर्षानंतर काय होईल ते बघू. एक गोष्ट नक्की आहे की, सत्ताधा-यांविरोधातील लढाई तीन वर्षे त्यांना लढावी लागणार आहे. तरच महाराष्ट्रात ते परिवर्तन करू शकतील. ते परमेश्वराला फारसे मानत नाहीत. तोच परमेश्वर त्यांना १०० वर्षाचे चांगले निरोगी आरोग्य देणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या वारसदाराची चर्चा करण्यापेक्षा शरद पवारांच्या ताकदीने काम करणा-या कार्यकर्त्यांना घडवणे, हे जास्त महत्त्वाचे आहे. सुप्रियाताई म्हणाल्या, ‘यशवंतराव चव्हाणांचे वारस शरद पवार आहेत आणि पवारांचा वारस काळ ठरवेल’ ताईंचे वाक्य अर्धसत्य आहे. यशवंतरावांचे वारसदार शरद पवार हे खरेच, पण ‘माझा वारस शरद असेल’ असे ना कधी यशवंतराव चव्हाण म्हणाले, आणि ‘मी यशवंतरावांचा वारस आहे’ असे ना कधी शरद पवार म्हणाले!
वारस हा वारसा हक्काने ठरत नाही. कर्तृत्वाच्या हक्काने ठरतो. त्यामुळे शरद पवारांच्या वारसाची चर्चा आज करू नये. जर तशी चर्चा झाली तर पवारसाहेब राजकारणातून बाजूला गेले, असा त्याचा अर्थ होईल. शिवाय पुढच्या तीन वर्षासाठी शरद पवारसाहेबांवर फार मोठी जबाबदारी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराचे राज्य असायलाच हवे यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचं एकमत आहे का? ते आधी ठरवा. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी तोडली म्हणून महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव झाला. पवारसाहेबांनी अजितदादांना आवरले असते तर आघाडी तुटली नसती. ६४ जणांना एकमेकांनी थोडय़ा मतांनी पाडले नसते तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले असते.
आता विधान परिषदेत मानपानाचा घोळ घालून आघाडी तोडली याची किंमत दोघांना चुकवावी लागेल. विधान परिषदेची जागा ती केवढीशी? आणि दोन्ही पक्षांचे अहंकार केवढे? या दोन्ही पक्षांना विधान परिषदेत एकमेकांना पाडण्यात जास्त रस दिसतो आहे. २०१९ची चर्चा किंवा त्याची चिंता कोणालाच नाही. प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, काँग्रेसने आम्हाला बुडवले. आता काँग्रेसविरुद्ध लढून तुम्हीही बुडाल आणि काँग्रेसलाही बुडवाल. थोडासा राजकीय शहाणपणा हे राजकीय पक्ष दाखवू शकत नाहीत. तर तीन वर्षानंतर ही मंडळी काय प्रभाव दाखवणार आहे? विनाशकाले विपरित बुद्धी अशीच काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था आहे. खरे म्हणजे शरद पवारांच्या वारसदाराची चर्चा न करता, पुरोगामी विचाराच्या रखवालदाराची चर्चा व्हायला हवी.